Sunday, December 10, 2023

अर्बन रुरल कनेक्ट

अनेकदा आपले शिक्षण आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन यात तफावत जाणवते, त्यामागे अनेक कारणे असतील, पण काहीवेळा यातील सूक्ष्म फरक दृष्टिकोनच बदलून टाकतात..

असाच काहीसा अनुभव सिटी प्राईड निगडी व न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या निवडक विद्यार्थी व शिक्षक गटाने घेतला..

सातारा जिल्ह्यातील आय ऑफ सी (Initiative of Change) संस्थेच्या पाचगणी येथील ग्रामपरी विभागातर्फे, ग्रामीण शहरी  विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दुवा साधण्यासाठी, अर्बन रुरल कनेक्ट नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो..

याचा पहिला टप्पा शिक्षकांचे मत परिवर्तन होता..

(त्याविषयी सविस्तर https://abhigandhashali.blogspot.com/2023/10/blog-post_42.html 

https://abhigandhashali.blogspot.com/2023/10/blog-post_15.html )

मत परिवर्तन..? कोणते मत..?

भाषा शिकताना, आपण अनेक व्याकरण संकल्पना शिकवतो, त्यातील एक म्हणजे विरुद्धार्थी शब्द..

त्यात अनवधानाने गाव × शहर असे नकळत सांगतो, आणि तेच रुजते, त्याची पाळेमुळे खोलवर गेली की परिणामी आपण फक्त या जागांना नाही, तर तेथे राहणाऱ्या माणसांना सुद्धा आपल्या विरुद्ध समजू लागतो..

खरे तर या दोन भिन्न जागा असल्या तरी भौगोलिक, वैज्ञानिक, शास्त्रीय किंवा मानवी गरजांनुसार त्या पूर्णतः भिन्न नाहीत.. 

त्यात काही गोष्टी वेगळ्या, काही सामाईक तर काही परस्परपूरक आहेत..

उदाहरणार्थ कप-बशी आकार, आकारमान वेगळे पण उपयोग सारखाच..

दिवस रात्र यात वेळ, दृश्य स्वरुप वेगळे पण त्याची निसर्गातील आवश्यकता समान..

अगदी तसेच गाव आणि शहर यांच्यात बदलत जाणाऱ्या काळानुसार कमी जास्त भिन्नता आली असेल, पण दोन्ही मानवी वस्तीच्या जागा आहेत..

दोघांच्या प्राथमिक गरजा समान आहेत, त्यांच्या इच्छा, स्वप्ने सारखी आहेत, दोघांच्या भाव भावना देखील सारख्याच आहेत..

फरक असेल तर तो राहणीमान, आहार, सोयी सुविधा यात..

पण दोघांना एकमेकांच्या दिनक्रमाचे कुतूहल वाटते, ते शमावण्याचा प्रयत्न यातील वेगवेगळ्या कृती उपक्रमातून झाला..

आणि त्यातूनच गाव आणि शहर हे एकमेकांपेक्षा काही बाबतीत वेगळे आहेत, पण विरुद्ध नाहीत, हे मत तयार होत गेले..

दुसऱ्या टप्पा दिनांक ८ शुक्रवार व ९ शनिवार डिसेंबर रोजी पूर्ण झाला..

पहिल्या दिवशी सकाळी  शहरी शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रामीण शाळेस भेट होती, त्यानुसार सिटी प्राईड निगडीच्या निवडक सतरा विद्यार्थ्यांनी बामणोलीच्या शाळेस भेट दिली..

ढोल हलगीच्या गजरात स्वागत, पारंपरिक लेझिम नृत्य, लाठी काठी, मल्लखांब सादरीकरण इ. कार्यक्रम बघितले, शाळा पाहिली, बैलगाडीत बसण्याचा आनंद घेतला..

त्यानंतर बहुतांश ग्रामीण लोक जो व्यवसाय करतात, तो शेती व्यवसाय अंतर्गत पीक, स्ट्रॉबेरी, गहू, मिरची लागवड याची माहिती प्रत्यक्ष शेतात जाऊन घेतली, कांद्याच्या पातीची लागवड प्रत्यक्ष अनुभवली..


स्थानिक विद्यार्थ्यांच्या घरी ग्रामीण चवीच्या जेवणाचा आनंद घेतला..

मग दोन्ही शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामपरी संस्थेत आले, तिथे एक रात्र निवासी शिबीर अनुभवले..

तेथील वेगवेगळ्या खेळातून मुलांचा एकमेकांशी परिचय झाला, स्व शोधन, वेगवेगळ्या विषयांवरील विचारांचे आदान प्रदान झाले..

तर विविध कृती उपक्रमातून गाव आणि शहर यात फरक आहे, पण विरोधाभास नक्कीच नाही हेच नकळत रुजले..

We are different but not opposite..

शेवटच्या सत्रात दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळून सण-उत्सव, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, तंत्रज्ञान, स्त्री - पुरुष दिनक्रम या विषयांचे तक्ते बनवून त्याचे सादरीकरण केले, यात ग्रामीण गटाने शहराविषयी तर शहरी गटाने गावाबद्दल सांगितले, यातून आपोआप ज्या एकमेकांविषयी कौतुक, आदर भाव तयार झाले..

 

   
 


  

गावात अधिक प्रमाणात शेती होत असली तरी त्यावर आधारित व्यवसाय शहरात असतात, तंत्रज्ञान विकास शहरात झाला तरी त्यातून ग्रामविकास होऊ शकतो..

आरोग्य, शिक्षण याच्या सुविधा गावात होण्यासाठी ही भावी पिढी काम करु शकते, असे अनेक मुद्दे मुलांनीच मांडले..

त्यातूनच आपल्याकडे असणाऱ्या जमेच्या बाजू दुसऱ्या गटाला कशा उपलब्ध करुन देता येतील, याचे बीज आपोआप पेरले गेले..

शहर आणि गाव परस्पर पूरक झाले पाहिजे, हा नवा विचार दोघांना मिळाला..

एकूणच फक्त पुस्तकात दिसणाऱ्या चित्रातून आपला देश, आपली माणसे अभ्यासण्यापेक्षा, प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहून, गप्पा मारुन, त्यांच्या दिनक्रमाचा अनुभव घेत विद्यार्थी अनेक गोष्टी शिकले..

यासाठी आय ऑफ सी, ग्रामपरी यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन..

या उपक्रमात मला मुलांसोबत सहभागी होता आले, त्यासाठी आयोजक व नियोजकांचे मनापासून आभार.. 

ही संधी प्रत्येकासाठी अनेक नव्या गोष्टींची, बदलांची सुरुवात होवो हीच सदिच्छा..





Sunday, December 03, 2023

हंपी

हंपी बदामीची ओळख शाळेच्या पुस्तकात होते ..











इतिहास सांगणारी हंपीची पवित्र भूमी, अनेक हिंसक घाव झेलून, त्या जखमा अंगावर मिरवतना अनुभवणे हा खरोखर सुखद अनुभव आहे..

हा अनुभव पाठ्यपुस्तकाच्या चार ओळीत सामावणारा नसून, त्या जागांना, वास्तूला स्पर्श करुन मिळतो..

या उदात्त, वैभवशाली आणि काळाच्या कैक शतके पुढे असणाऱ्या सांस्कृतिक भूमीत आपण जन्म घेतला आहे या जाणिवेने ऊर भरून येतो..

या साऱ्याचा विध्वंस करु पाहणाऱ्यांच्या अगतिकतेची कीव वाटते..

जेंव्हा गाईड सांगतात, की या पाशवी आक्रमणापासून वाचवण्यासाठी या वास्तू रेती खाली दडवण्यात आल्या, तेंव्हा असे काम नेमके कसे केले असेल ही कल्पनाच अचंबित करते..

आपल्या देवता, त्यांच्या रंजीत शक्ती अचानक खऱ्या वाटायला लागतात..

हनुमानाच्या जन्माने पवित्र झालेला पण तरीही त्याच्या मातेच्या नावाने ओळखला जाणारा अंजनाद्री पवर्त, मातृसत्ताक संस्कृती जपतो..

इथल्या विशालकाय गोल आकाराच्या, एकमेकांवर रचल्या प्रमाणे असणाऱ्या रेतीच्या शिळा कधी कोड्यात टाकतात, तर कधी अंगावर पडतील की काय अशा घाबरवून सोडतात, या गुरुत्वाकर्षणाला अपवाद कशा याचे कोडे जेंव्हा कुणालाच उलगडत नाही, तेंव्हा अमूर्त विधात्याच्या कलाकारीचे कौतुक वाटते..
हे उत्खनन काही वर्षांपूर्वी झाले आहे, आम्ही लहान असताना या मोकळ्या जागांवर खेळायचो हे ऐकताना अंगावर रोमांच उभे रहातात..

  

विरुपाक्ष मंदिर सोडून कोणत्याही ठिकाणी पूजा होत नाही, कारण त्यापैकी अनेक ठिकाणी देवतांच्या मूर्ती नाहीत किंवा त्या भग्न केल्या आहेत..


   

तरीही त्या प्रेमात पाडतात, नतमस्तक करतात..

त्यांची भव्यता शाळेच्या दिनक्रमातील प्रतिज्ञेची आठवण होऊन हात नकळतजुळतात व मनोमन प्रार्थना घडते..

या समृद्ध परंपरांचा पाईक होण्याची पात्रता, माझ्या अंगी येण्याची प्रेरणा दे..

सुटीचे दिवस असूनही पहाटे लवकर उठून, काहीशा अंधारात काटेकुटे विशाल दगड यांनी वेढलेला, अनोळखी डोंगर चढून सूर्योदय बघायला जाताना वेगळीच मजा येते..

अशावेळी हवामान साथ देत नाही, आपण आपली साखर झोप सोडू आलो असलो तरी, खट्याळ भानूदेव मात्र ढगांची दुलई घट्ट धरुन ठेवतो तेंव्हा मन काहीसे खट्टू होते..

पण त्या टेकडीवरून दिसणारा हंपीचा गौरवशाली प्रदेश फार काळ उदास राहू देत नाही..

नमुन्या दाखल बघितलेला काही भाग, जेंव्हा नजर जाईल, तिथवर पसरला आहे हे लक्षात येते, तेंव्हा ते सारे वैभव बघत रहाणे अविस्मरणीय आहे..


तुंगभद्रा नदीच्या काठावरील मंदिरातून फिरताना, तिचा कानी गुंजणारा अवखळ प्रवाह मोहवून टाकतो..

राजा राणी बनून ज्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले, प्रजेचा सांभाळ केला, त्यांच्या संपत्ती, समृद्धच्या खुणा कमल महाल, राणीचे स्नानगृह, राज दरबार सारख्या वास्तू बघताना मिळतो..


 


  

अखंड दगडात कोरलेल्या अति विशाल लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती, सोन्या चांदीच्या बाजाराचे दाखले, हत्ती खाना ही सारी, कोणत्याही आधुनिक साहित्यशिवाय साकारलेली वास्तूशिल्पे, त्याकाळच्या पण आज अज्ञात स्थापत्य शास्त्राची चुणूक दाखवून नतमस्तक करतात..

त्रिमितीय कोरीव काम, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला थिटे करते..

पन्नास रुपयांच्या नोटेवरील पाषाण रथ, खऱ्या रथारुढ राजा, त्याचे कौतुक करणारी प्रजा याची  प्रतिकृती डोळ्यांसमोर आणते..

दगडी खांब जेंव्हा सूर छेडतात, तेंव्हा संगीत अधिक मनोहर होऊन जाते..

हे खांब विठ्ठलाच्या मंदिराचे आहेत, ज्याचे वास्तव्य पंढरपूरच्या मंदिरातही आहे, हे ऐकताना आपोआप ओळी स्मरतात,  

कानडाऊ विठ्ठलु, कर्नाटकु.. 

कानडा राजा पंढरीचा..







शहरातला झगमगाट, सिमेंटची जंगले, साऱ्या प्रकारचे प्रदूषण, कलह, मतभेद, स्पर्धा या साऱ्यापासून काहीसे दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत वसलेलं हंपी मनाला एक वेगळीच ऊर्जा देते..

Saturday, December 02, 2023

काफिला

लहापणापासूनच आई बाबांमुळे सुट्टी म्हणले की कुठेतरी फिरायला जाणे, नवीन जागा बघणे, अनुभवणे हे गणित पक्क ठरलेले..

आता वयाची चाळीशी ओलांडताना सुटीचे नियोजन स्वतःहून करावे लागते..

धावत्या काळाने नेटच्या मदतीने वैयक्तिक बुंकिग किंवा केसरी, वीणा, सचिन यासारख्या अनेक प्रवास कंपन्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत, तेही मोबाईलच्या एका बटणावर..

यातून निवड करताना उत्तम सोयी सुविधा, तत्पर सेवा, सुरक्षितता आणि अनेकदा आधीच्यांचे अनुभव याचा विचार आपण करतो..

पण कधीतरी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन अनुभव घेऊन बघण्यात अधिक गंमत असते..

म्हणूनच छोटीशी विश्रांती घेण्यासाठी काफिला ऍडवेंचर्स सोबत हंपी बदमीची अवघ्या तीन दिवसांची सफर अनुभवली..


शनिवारी शाळा करुन रात्रीच्या बसने प्रवास सुरु झालेल्या प्रवासापासून ते बुधवारी पहाटे परत येण्यापर्यंतची सर्व व्यवस्था काफिलाच्या आयोजकांनी केली होती..


हे आयोजक म्हणजे पंचविशीतली युवा मंडळी..

यातली काही नोकरी करतात तर काही अजूनही शिक्षण घेत आहेत..

मग अशा सहलींचे आयोजन हे का करतात..? पैसा, व्यवसाय..?

एकूण व्यवस्था आणि सहलीचे शुल्क बघता, या दोन्ही गोष्टी असतील, असे वाटले नाही..

इतर प्रवासी कंपन्या आणि काफिला यांच्यात हाच मुख्य फरक जाणवला..

एखादे नवीन ठिकाण बघताना, सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज हॉटेल निवडण्यापेक्षा काफिलाने घरगुती व्यवस्थेची निवड केली, त्यामुळे प्रेक्षणीय स्थळे बघताना तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधता आला.. 

त्यांचे अनुभव, दिनक्रम जवळून बघता आले, पारंपरिक चवीच्या जेवणाचा आस्वाद घेतला..

याचा दुसरा फायदा म्हणजे कमी पैशात उत्तम सोय झाली आणि तेथील स्थानिक लोकांना व्यवसाय मिळाला..

इथे बचत करण्यापेक्षा अनावश्यक खर्च टाळणे जास्त होते..

कारण आपली संस्कृती, इतिहास हा नुसता बघून समजत नाही, तर सोबत त्याचे उत्तम ज्ञान, अभिमान असणारी मार्गदर्शक(गाईड) व्यक्ती हवी..

याची व्यवस्था सर्व ठिकाणी होती..

सोबत आलेला गट कमी जणांचा असल्यामुळे, दिलेल्या वेळपेक्षा कमी वेळात सर्व गोष्टी पूर्ण व्हायच्या..

नियोजन करणारी सारी मंडळी युवा असल्यामुळे, अर्थातच सोबत आलेली सुद्धा युवा, माझ्यापेक्षा निम्या वयाची, त्यामुळे मीही त्या दिवसात फिरुन आले..

त्यांच्यासोबत सानपुरा तलावात क्लिफ जंपिंग (चारी बाजूंनी निसर्गाने वेढलेल्या तलावात एका उंच दगडावरुन उडी मारणे), 

 

कोरॅकल राईड (टोपलीच्या आकाराची बोट) हे वेगळे भन्नाट अनुभव घेतले..

 

एकूणच बघता बघता तीन दिवस कसे संपले कळलेच नाही..

आजची युवापिढी आळशी, मोबाईलमध्ये व्यस्त, फास्ट फूडच्या आहारी गेलेली, सर्व गोष्टी आयत्या हवी असणारी अशा एक ना अनेक तक्रारी असणाऱ्या साऱ्यांनी कधीतरी वेळ काढून त्यांच्यासोबत रहायला हवे..

काफिला ऍडवेंचर्स सारख्या नव्या गोष्टी करणाऱ्यांना अनुभवायला हवे, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे..

तरच दोन पिढीत वाढत जाणारी दरी कुठेतरी सांधता येईल..

एक वेगळा अनुभव देण्यासाठी काफिला ऍडवेंचर्सचे मनापासून आभार आणि त्यांच्या अशा मुशाफिरीसाठी खूप खूप शुभेच्छा..