गुढीपाडवा
ना हा फक्त हिंदू सण, ना हे फक्त मराठी नववर्ष..
अगदी आजही कलियुगात आपल्या आराध्य देवांचा दूत बनून चराचरात सूक्ष्म रूपात सर्वांच्या सहकार्यासाठी सुशक्ती बनून असणाऱ्या, भक्त हनुमंताच्या प्रभू श्रीरामांच्या वनवास संपवून घर वापसीचा विजयोत्सव आहे..
त्रेतायुगी श्रीराम अवतरला कारण ज्याचा संहार आवश्यक होता, असा शत्रू असूर वीर रावण, तशी ताकद, भक्ती आणि युक्ती असणारा होता..
लहान मोठ्या दुष्शक्ती हरणासाठी अनेक सद् विचारी नि आचारी शक्ती सर्वत्र असतात, पण जेंव्हा आदिदेव शिवशंभूंचा परम प्रिय भक्त, महातपस्वी दशग्रंथी ब्राह्मण फक्त मी असूर आहे, असा अविचार अग्रस्थानी ठेवून उन्मत्त होऊन मिळालेल्या वरदानाचा वापर करत वर्तनाच्या सर्व पायऱ्या सोडून उन्माद माजवतो, त्यावेळी त्याला विवेक देत त्याच्यात असणारा पवित्र आत्मा पुन्हा जागृत करण्यासाठी प्रभू श्रीराम जन्म झाला..
अति प्रचंड ताकदवान असूर रावण या शरीर रूपाचा वध नि सोबतच्या अनेक अविचारी वृत्तींचा संहार करण्यासाठी फक्त श्रीविष्णु अवतरून पुरणार कसे, तर ब्रह्मा नि महेश यांचेही सहकार्य हवे..
अर्थात त्यांच्यासह मग सारा स्वर्गलोक, साऱ्या देवीदेवता आपल्या शक्तीनुसार रूप धारण करून पृथ्वीवर अवतरल्या होत्या, कारण पुन्हा तेच असूर धर्म पालन करणारा रावण महातपस्वी होता..
आणि म्हणूनच त्याची अविचारी शक्ती संपविण्यासाठी, जन्माने तू असुर असला, तरी तुझा अंतिम प्रवास माझ्यात एकरूप होण्यासाठी व्हावा लागेल हे सांगण्यासाठी श्रीराम अवतार होता..
असा शत्रूवर प्रेम करत त्याला वंशासह मोक्ष देणारा राम हवा असेल, रामराज्य हवे असेल तर साऱ्या सृष्टीने गुढी पाडवा जल्लोषात साजरा करावा लागेल..
रोज नवा वनवास संपवून, स्वतःमधल्या असुरी शक्ती नामोहरम करत त्या विजय पताका घराघरावर फडकत्या दिसाव्या लागतील..
नि आठव येईल, की संत चोखामेळा सहज अभंग रचुनि गेले..
टाळी वाजवावी, गुढी उभारावी..
फक्त एक टाळी वाजवता, मी नेहमी योग्य तेच वर्तन करेन, माझ्या हातून अनवधानाने देखील दुष्कृत्य, पातक होणार नाही, कशाचाही अवमान होणार नाही, असा संयत तरी सहज संकल्प करावा लागेल..
त्यासाठी लागणाऱ्या शक्ती माझ्यामध्ये येण्यासाठी विविध अभ्यास, कृती, संशोधने नकळत पूर्ण होऊन, माझ्यातील आत्मभान जागृत करण्यासाठी रोज नव्याने नवनवीन गुढी मला माझ्या अंतःकरणात उभी करावी लागेल..
माझ्यासारख्या य:किंचित मानवास कर्ममार्ग महाकठीण, खडतर नि अशक्यप्राय आहे, म्हणून संत चोखामेळा सोपा मार्ग सांगतात, नाम जपाचा..
वाट ही चालावी पंढरीची..॥१॥
जेंव्हा सर्वत्र धर्मांधता माजली होती, अंधारयुग म्हणावे इतकी अराजकता फोफावली होती, तेंव्हा संतांनी जन्म घेतले..
सर्व धर्म, सर्व वर्ण, सर्व जाती इतकेच का तर पशुपक्षी साऱ्या रूपात अवतरीत होऊन फक्त नामजपाची माळ हाती दिली, ही माळ हाती आल्यावर वाट पंढरीचीच धारावी लागेल ना..!
कारण तो विठुरायाच तर लेकुरवाळा आहे, त्याच्यात सर्वांना सामावून घेण्याची स्वस्थता, स्थिरता नि शीतलता आहे..
त्याच्या पायावर मस्तक ठेवले की अंत:करणात राहणाऱ्या कलीस जागेवर शांत करत, कलकी जागे करण्याची ताकद आहे..
पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
अशी ही माझ्या विठुरायची पंढरी आहे, कशी..?
तर एकमेकांच्या लोटांगणी जाणाऱ्या वारकऱ्यांची हाट म्हणजे बाजाराचे सुंदर रूप ..
जसा बाजारात असणारा आवाज हा अर्थजनासाठी एकमेकांना बोलवून माझ्याकडे काय उत्तम आहे हे सांगत असतो, जणू तसेच हे वारकरी नामजपाची महिमा एकमेकांना सांगताना, त्या निस्पृह शक्तीच्या अनुभवांचे हाट भरवत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याकडील ठेवा प्रसाद समजून विना मोबदला देत आहेत..
याने थकून जाणाऱ्या लेकरांना विश्रांती मिळण्यासाठी मातीची कौले, भिंती जी उन्हाळा शीतल आणि हिवाळा उबदार करण्याची क्षमता असणारी एक नव्हे अनेक घरांची पेठ आहे, कारण सद् वर्तन, विचार यानेही थकायला होते, याची जाणीव विठुरायाला आहे
पताकांचे भार मिळाले अपार ।होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥
पाया ज्ञानदेवांनी रचला, तुका कळस झाला असला तरी संत नि भक्त यांनी एकमेकांशी ना कधी स्पर्धा करायची ना मत्सर फक्त विश्वास ठेवायचा, जी शक्ती मुळातच निर्गुण, निराकार आहे, ती समभाव नजरेने प्रत्येकास बघणार आहे..
पायाशी बसवेल की खांद्यावर, कवेत घेईल की हृदयात याला शक्ती जबाबदार नाही, तर माझे जन्मोजन्मीचे कर्म कारणीभूत आहे याची जाणीव ठेवणारी गुढी हवी..
भूतकाळ तर बदलता येणार नाही, पण वर्तमान नि भविष्य चालताना वाट नेहमी योग्यच असण्यासाठी साऱ्या संतांच्या शब्द रुपातील अभंग, ओव्या, आरत्या एक ना अनेक रचना यांच्या पताकांचे भार मिळाले आहेत, फक्त ते सांभाळण्याचा विवेक दे अन्यथा रावण सारखा गर्व होऊन मी चुकीचे मार्गक्रमण करेन..
हे होऊ नये यासाठी नामघोषाचा जयजयकार भीमातीरीं चालू आहे..
तीरीं या शब्गंदात मत आहे, बरे इथल्या अनुस्वारात पंढरी ही एक नाही तर तुम्ही जिथे आता आहात त्या प्रत्येक जागेवर आहे आणि तिच्याकाठी जीवनदायिनी भीमा आहे हा विचार विश्वव्यापी आहे..
काम सोडून भक्ती करण्याची गरज नाही, हे सांगणारे सावता माळी, गोरा कुंभार, जनाबाई किती नावे घेऊ..!
जयघोष महत्त्वाचा भले वाल्या कोळ्याप्रमाणे मरा मरा म्हणलं, तरी त्याचा राम रामच होणार, ही निष्ठारूपी गुढी उभारावी लागेल..
हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
चुका, अपराध घडला की मी काहीच करत नाही, माझ्यातला हरी करतो, असे मूर्ख विचार माझ्या मनात जागा करणारा माझ्यातल्या कली, मला कुंभकर्णासारखा सदैव निद्रिस्त ठेवायचा असेल, तर अंगाईसारखा हरिनामाचा गजर करावा लागेल..
हे माझे नाही, भागवत म्हणजे एकनाथांचे विचार आहेत, हे सांगत प्रत्येक उत्तम असणाऱ्याची स्तुती कवने गाणारे व्हा, सांगणाऱ्या चोखोबांच्या स्थिरतेची गुढी हवी..
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥
समेवर येताना, अरे समाज किती का दंभाचार माजवेल, कारण कलियुग आहे, तो कलि तुझ्या माझ्या सर्वांच्या शरीरात वास करत आहे..
मग त्याने तुला क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय म्हणो किंवा ब्राह्मण त्याचा विलाप किंवा उन्मात व्हायचा नसेल, तर नामजप हाच सहज सोपा उपाय आहे..
मग तुझ्यातला खट म्हणजे नाठाळ, न ऐकणारे, सोपे म्हणून चुकीचा मार्ग निवडणारे बालक..
किंवा मीच का करू, त्याने काय होईल, यातून मिळणार काय.. असे सारखा का? का? का? विचारणारे धगधगते युवा रक्त नाटक रूपाने असेल..
नामजपाची गुढी हाती धरता शुद्ध, नितळ होऊन जाईल, सगळे प्रश्न, शंका आपोआप विरून जातील..
तन मन धन अर्पूनी भावरूपाने इ.स १२७३ जन्मलेल्या चोखोबांनी इ.स. १३३८ पूर्वीच ही दवंडी पिटली आहे..
त्यांच्या त्या हाकेला साद देणारी, नामजप रुपी गुढी रोज, निती नियमाने उभारायला हवी..
असे करताना जात, धर्म, लिंग असे अडथळे आले, तर रामाचे दोहे गाणारे कबीर व्हावे लागेल , नामाची दासी म्हणून मिरवणारी जनी स्मरावी लागेल..असे अनेक आहेत..
त्यासाठी आपल्याला आता थोडे गुगल करावे लागेल, त्याने कचऱ्यासारखी माहिती दिली की राजहंस होऊन फक्त रत्ने शोधावी लागतील..नि विवेकाची गुढी व्हावे लागेल..
असे होता, अंतःकरणात असूनही वनवास भोगणारा राम, हृदयस्थ न झाला तर नवल..
असे अनुभव प्रत्येकाला ,मिळाले , तर युग कोणतेही असो रामराज्यच येईल..
सुरुवात कुठून झाली नि समाप्ती कुठे, याचे पूर्णभान थोडे चुकले असेल..
रसिक वाचक म्हणून भावना समजून घेणार हा पूर्ण विश्वास आहे..
कली आणि कलकी या दोघांना एकाच शरीरात सांभाळणाऱ्या माझ्या साऱ्या विश्वाला नवं वर्षाचा अंनत शुभेच्छा..
आपण सारे मिळून विश्व सुंदर करण्याची प्रेरणा, जागृत ठेव हीच त्या निराकार शक्तीला प्रार्थना..
शब्द किर्तन करण्यासाठी धडपडत राहणारी.. अभिगंधशाली



