Monday, February 02, 2026

श्रवण

 

श्रवण, संभाषण, वाचन आणि सर्वात शेवटी लेखन हे भाषा आत्मसाद करण्याच्या पायऱ्या आहेत.. 

भाषेची ओळख होते तेच, श्रवण म्हणजेच ऐकण्यातून..

सामान्य मूल खूप लहान वयातच विशेष प्रयत्न न करता, फक्त ऐकणे आणि निरीक्षण करणे यातून घरात, परिसरात बोलल्या जाणाऱ्या एक वा त्यापेक्षा अधिक भाषा सहज शिकते..

त्यात अधिक नेमकेपणा, समृद्धता हवी असेल, तर त्यासाठी तशा पद्धतीचे ऐकावे लागते..

मी लहान असताना म्हणजे साधारण ३५-४० वर्षांपूर्वी, भाग्य म्हणावे की काय माहित नाही, पण प्रसार माध्यमे नेमके आणि उत्कृष्ट दर्जाची होती..

दूरचित्रवाणी ( फक्त दूरदर्शन), आकाशवाणी आणि टेपरेकॉर्डर, इतक्याच साधनांच्या मार्फत दैनंदिन कामाव्यतिरिक्त गोष्टी ऐकण्यास उपलब्ध होत्या..

त्याद्वारे लहानपणी छान छान गोष्टी, नंतर थोडे मोठे झाल्यावर चित्रपट गीते, कथाकथने भरपूर ऐकली, त्यांची पारायणे केली..

त्यात निखळ मनोरंजन होते, नि सोबतच येता जाता चांगल्या विचारांची पेरणी होती..

आज स्टँडअपचे आलेले खूळ.. अत्रे, पुलं, वपु यांच्या सारख्या दिग्गज मराठी साहित्यिकांनी फार पूर्वीपासून यश शिखरावर नेऊन ठेवले आहे..

त्याचा दर्जा इतक्या उच्च प्रतीचा आहे की शिव्यांच्या जागी फक्त फुल्या फुल्या हे शब्द देखील अचूक भावना सांगतो, त्याकरता जिव्हा आणि वाणी दूषित करण्याची गरजच नाही..

अशा उत्तम श्रवणाने फक्त कान नाही, तर आचार.. विचार.. वृत्ती सर्वांवर संस्कार झाले..

पुलं आणि वपु यांचे कथाकथन त्या वयात पूर्णतः कळले नसले तरी, मनोरंजना सोबतच भाषेची गोडी लागली, समृद्धता लाभली..

आजही ती कथाकथने ऑडीओ, व्हिडिओ स्वरूपात युट्यूब व इतर माध्यमात उपलब्ध आहेत आणि त्यांचे संदर्भ तितकेच काल सुसंगत आहेत..

नव्या वा बदलत जाणाऱ्या श्रवणीय गोष्टींना कडाडून विरोध नसला तरी, जुन्या सुवर्णाची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठीच आजचा लेखन प्रपंच..

असे उत्तम दर्जाचे ऐकण्यास मिळाले तर फार आटापिटा न करता, हसता हसता माय मराठी अनेकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय बनेल असे देखील मनापासून वाटते..

म्हणूनच लेखना सोबत पुलं ( पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) आणि वपु (वसंत पुरुषोत्तम काळे) यांच्या निवडक कथाकथांची लिंक देत आहे..

https://www.youtube.com/watch?v=AyBmI61Jrus&list=PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm

https://www.youtube.com/watch?v=JflwJiPw4LU&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=TcmLHaJaEnI&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=nhf2odF8h1Y&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl

https://www.youtube.com/watch?v=kbpoczrrVeQ&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl0gcJCZEKAYcqIYzv

https://youtu.be/XoVzdHsKdr0?si=ZAOGB0sgTHTq1ykC 

यांनतर क्रोनोलोजी अजून भरपूर पर्याय देईलच..

शिवाय आता एआयच्या जमान्यात प्रत्येकाने आपल्या आवडीचे, सोयीचे काहीही ऐकले तरी चालेल, त्यातून भाषा शिकण्यास, रुजविण्यास आणि वृद्धिंगत करण्यास मदतच होईल, हे नक्की..

तुम्ही काय ऐकता, सांगण्यास विसरू नका..

आणि नेहमीचे अभिप्राय, सुधारणा यांचे स्वागत..

Wednesday, January 21, 2026

विश्रांती







विश्रांतीची कहाणी..


ऐका महाराजा, तुमची कहाणी


आटपाट नगरात सुरू झाली शाळा, नाव तिचे सिटी प्राईड. बघता बघता नगरातील प्रमुख शाळांपैकी एक बनली. शाखा विस्तार होत, १ एप्रिल २०२५ रोजी चौथे अपत्य नावारूपास येऊ लागले..


जुन्या शाखांमधील मोजके सदस्य वगळता, सर्वकाही नवीन होते. तरी प्रत्येकजण मनापासून कामाच्या पद्धती, प्रणाली समजून घेत होते.


जुन्यांना शाळेच्या पद्धतीचा अनुभव असला तरी परिसर, इतर सदस्य, विद्यार्थी आणि पालक सगळं नवीनच होत.. 


सारेजण हसत खेळत एकमेकांना सोबत आनंद, उत्साहात काम करत होते,  दिवसांमागून दिवस जात होते..


सुरुवातीच्या काळात नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी मिळणारा  वेळ, विचार , सुख दुःखाची देवाण घेवाण हळूहळू कमी होऊ लागली..


कामाचा पसारा, एकामागून येणारे एक पायाला चाक लावून येणारे उपक्रम, परीक्षा, इतर कामे यात सगळ्यांचे जणू यंत्र बनू लागले..


त्यामुळे वातावरण बदलू लागले, एक अस्वस्थता प्रत्येकाला त्रास देऊ लागली, काहीतरी हरवत आहे, निसटत आहे असे वाटले तरी नेमके काय हे लक्षात येत नव्हते..


त्यातच पालकांची मासिक बैठक, क्षेत्रभेट, स्पर्धा, परीक्षा, स्नेहसंमेलन असा एक संपण्यापूर्वी दुसरा अध्याय दत्त म्हणून उभा रहात होता..


विद्या प्रांगणाच्या वास्तू देवतेला हे सारे दिसत होते, आपल्या लेकरांची तगमग जाणवत होती, त्यावर हळूच फुंकर घालावी असे ठरवून, त्या अज्ञात शक्तीने जादूची कांडी फिरवली..


दिवस संक्रांत सणाचे, हेच निमित्त साधून सदस्यांना तिळगुळ समारंभ करण्याची बुद्धी दिली..


प्रस्ताव मांडला, परवानगी मिळाली, आवश्यक साहित्य, अर्थकारण साऱ्यावर चर्चा आणि नियोजन झाले..


इतक्यात मधे माशी शिंकली, नकार घंटा वाजवत विश्वव्यापी सायकल स्पर्धा आडवी आली, त्यासाठी मुलांना दोन दिवसाची सक्तीची सुटी जाहीर झाली..


तोंडावर आलेले सलग उपक्रम, त्यांचा सराव, राहिलेली ढीगभर कामे बघता, समारंभ रद्द करावा लागला..


पण देवतेला हे मंजूर नव्हते, तिने एका सदस्यास नकळत ऊर्जा दिली, येतील अनेक प्रश्न, अडचणी पण हे कार्य माझी इच्छा आहे, मनापासून काम करणाऱ्या माझ्या लेकरांना कामात थोडा बदल हवा आहे, (आजकाल काय म्हणतात ते आईस ब्रेक)..


कामाचा एकसुरीपणा, अडचणी यावर विश्रांतीची गरज आहे, जशी शरीराला झोप तशी मनाला उगाच हसण्याची, नाचण्याची गरज आहे..


अदृश्य शक्तीचा जणू आदेश झाला आणि सदस्य त्याच्या नकळत अनेक गोष्टी करून गेला..


२० जानेवारी मंगळवार, मुलांना सुटी असली तरी शाळेचे शिक्षक, कर्मचारी कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर आले..


सदस्याने वरिष्ठांना केलेली तयारी सांगितली, पुढच्या साऱ्या उपक्रमांची कामे मिळून करूया पण त्याआधी एक तास थोडा वेगळा अनुभव घेऊ या असे गाऱ्हाणे मांडले..


वेळ उपलब्ध होता आणि हा बदल खरच आवश्यक आहे, हे जाणवून वरिष्ठांनी लगेच परवानगी दिली..


झाले, आता देवता त्या एकाच नाही तर तेथील अनेक सदस्यांच्या अंगी संचारली, बघता बघता अवघ्या अर्धा पाऊण तासात एका सुरेख समारंभाची जय्यत तयारी झाली..


तिळगुळ समारंभाला शोभेशी आरास साऱ्यांना छायाचित्र काढण्यास प्रवृत्त करू लागली, सर्वांनी एकमेकांसोबत या सुखद आठवणी आपल्या भ्रमणध्वनीत मनसोक्त टिपल्या..


एक एक करून सारे जमा झाल्यावर विद्यादात्री देवी सरस्वतीचे पूजन झाले, सर्वांनी मिळून तिचे आवाहन केले, हे देवी, दैनंदिन कामात आलेली यांत्रिकता दूर सारून आनंद, मैत्री, उत्साहाचे वारे वाहू दे..


उद्याचे भविष्य घडवू इच्छिणाऱ्या आम्हाला चैतन्य, नावीन्य, चिकाटीचे दान दे..


त्यानंतर सर्वांनी मिळून हसावे, खेळावे, बागडावे यासाठी गमतीशीर खेळ, बालगीतांवर नृत्य करण्यात आले..


त्यावेळी जी काही धम्माल, दंगामस्ती झाली की त्याच त्याच गोष्टी करून यंत्र होऊ बघणारे सारे सदस्य पुन्हा एकदा फुलपाखरासारखे रंगबेरंगी झाले..


सोबत अल्पोपहराचा आस्वाद घेताना मनमोकळ्या गप्पा झाल्या, शाळेचे नाव उखण्यात घेताना मनातले प्रेम, लटका राग व्यक्त करताना निरागाठी सुटल्या..


समारोप करताना प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ देऊन प्रेमाने मिठीत घेताना आपण सारे एक कुटुंब आहोत, इथले फक्त यश, आनंदच नाही तर प्रश्न, समस्या याही आपल्या साऱ्यांच्या आहेत आणि आपण मिळून त्यांना पार करणार आहोत असा आश्वासक आधार शब्दाविना दिला आणि मिळवला..


हा आणि असाच अनुभव सेवक कर्मचाऱ्यांनी देखील अनुभवला तेंव्हा   त्यास अधिक पूर्णत्व लाभले..


कामात थोडा बदल म्हणजे साऱ्यांनी एकत्र येऊन गप्पा टप्पा, खेळ, नाच याची अधून मधून फोडणी हवी तरच नित्य दिनक्रम अधिक आनंदी आणि उत्साही होईल हे एकमताने ठरले..


आपल्या लेकरांची काळजी घेणारी, ती अज्ञात शक्ती जशी सिटी प्राईड प्राधिकरण शाखेस लाभली, तशी ती तुम्हा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


अशी ही विश्रांतीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण..


अभिगंधशाली




Tuesday, January 13, 2026

ब्लॅक_ब्यूटी

 पुस्तक परिचय  

लेखिका - अँना सिवेल... अनुवाद - स्मिता लिमये.


ही एका घोड्याची आत्मकथा आहे. प्राचीन काळापासून जगभरच्या संस्कृतीचा भाग व मानवाचा लाडका प्राणी घोडा.. 

बुद्धीने तल्लख, प्रेमास उत्तम प्रतिसादी आणि ईमानी..

प्राणी जीवनावरील  एक यशस्वी कादंबरी..

घोडागाडीचे काम करणाऱ्या कथेच्या लेखिकेला, या प्राण्याविषयी कमालीची आत्मीयता वाटते.. 

स्वतःच्या आजारपणावर विरंगुळा म्हणून आपल्या घोड्याची आत्मकथा लिहावी, या कल्पनेतून पुस्तकाची निर्मिती झाली आहे..

पाळीव प्राण्यांना उत्तम मालक मिळाल्यास ते मृत्यू शय्येवरून बाहेर उठून, दीर्घायुष्यी कसे होतात, हे कथेत भावपूर्ण गुंफले आहे..

कथेच्या शेवटाकडे येताना घोड्याला पुन्हा एक नवा चांगला मालक मिळतो..
 
मरणासन्न ब्लॅक ब्युटी पुन्हा धट्टाकट्टा होऊन,अधिक वीस वर्षे कसा जगतो, यातून पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे अनेक संदर्भ लेखिका मांडते.

पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी

● पाळीव प्राण्यांचे जीवन व त्यांचे प्रश्न याची कथारूप मांडणी. 

● पाळीव प्राणी जीवनातील छोटे छोटे बारकावे.

 ● स्मिता लिमये यांनी इंग्रजी कथेचा अतिशय सुंदर केलेला भावानुवाद.

● पाळीव प्राण्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन.

● लेखिकेच्या लेखनाची एक वेगळीच शैली... घोड्याच्या जागी  स्वतःला ठेवून केलेले लिखाण.

● थोडक्यात प्राणी प्रेमिकांनी आणि ज्यांना प्राणी सांभाळायचे आहेत त्यांनी तर जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@

Saturday, April 05, 2025

श्रीराम


रामासी शरण निघा रे | राम होऊनी राम गा रे ॥१॥
राम कैसा हे विचारा | नका कर्म करू व्यभिचारा ॥२॥
हा दुस्तर भव हराया | तुम्ही जोडा सखा गुरुराया ॥३॥
म्हणे माणिक राम पहावा | तया लागी हृदयी जपावा ॥४॥

माणिक प्रभू यांची ही रचना दैनंदिन जीवनाची दिशा सुचवते.

रामासी शरण निघा रे 

राम म्हणजे परमेश्वराला शरण जा, समर्पित व्हा कारण दुःख, संकट, भय, वेदना अशा साऱ्याचे उपाय फक्त त्याच्याच जवळ आहेत..

त्यातही दशावतारांमधील राम हा मानवाच्या सर्व मर्यादा पाळणारा अवतार.. 

या अवतारात दैवी शक्ती, चमत्कार, युक्ती,  इ. कोणत्याही गोष्टींचा वापर प्रभू श्रीरामांनी कधीही केला नाही..

मानव जन्म प्राप्त झाल्यावर सर्वोत्तम असण्याचे सर्व निकष त्यांनी सदैव सांभाळले आणि येणाऱ्या पिढीसाठी आदर्श स्थापन केले, अशा प्रभू रामाला शरण जा, असे रचनाकार सुचवतात..

राम होऊनी राम गा रे 

राम हा परमेश्वरी अवतार होता, असे म्हणत त्यांनी केलेल्या गोष्टी मला शक्य नाही अशी पळवाट शोधून चालणार नाही..

रामाची आरती, गाणी, भजन इ. पोकळ स्तुती करून उपयोग नाही..

त्याआधी रामाचे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न हवा, सत्य वचन, नीतिमत्ता, धर्मपालन असे एक ना अनेक गुणांचा अंगीकार करा..

थोडक्यात आधी राम व्हा, मग त्याचे गुणगान करा..


राम कैसा हे विचारा 

रामाची मंदिरात स्थापना करून पुरेसे होणार नाही, मानवी जीवनाची आदर्श मूर्ती असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या कथा ऐका..

एक राजा, पुत्र, बंधू, पती म्हणून ते कसे होते, इतकेच काय शत्रू असूनही दशग्रंथी राजा रावण याचा त्यांनी कसा मान राखला, हे सारे समजून घ्या..

नका कर्म करू व्यभिचारा 

व्यभ म्हणजे चुकीचा, आचार म्हणजे वर्तन, कोणतेही कर्म करताना व्यभिचार म्हणजे चुकीचे वर्तन करू नका..

कर्म करताना असत्य, अनैतिक, अधर्म या साऱ्या गोष्टी जबाबदारीने दूर ठेवा, त्यासाठी प्रभू श्रीरामांचे संस्कार, संयम, सद्भावना, साहचर्य, संतुलन असे गुण स्वतःच्या आचरणात येऊ द्या..


हा दुस्तर भव हराया 

राम होणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही, याची पूर्ण जाणीव रचनाकार माणिक प्रभू यांना आहे,म्हणूनच ते म्हणतात, हा दुस्तर म्हणजे पार करण्यास अवघड, भव याचा अर्थ स्थिती..

मला राम कसे होता येईल, त्यांचे गुण माझ्यात येण्यासाठी मी काय करायला हवे, हे मला खरंच जमेल का, अशी अवघड स्थिती निर्माण झाल्यावर, नेमके काय करायला हवे, हे सांगताना ते म्हणतात..

तुम्ही जोडा सखा गुरुराया 

आपल्या संस्कृतीत सर्व श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या गुरु परंपरेची कास धरा, राम समजून घेण्यासाठी, त्यांच्यासारखे होण्यासाठी गुरुंचे सहकार्य घ्या..

मग ती व्यक्ती असेल, ग्रंथ संपदा असेल, जीवनानुभव असतील, त्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, फक्त मनात तशी इच्छा ठेवून मार्गक्रमण करत प्रभू श्रीराम आपले गुरु, सखा होण्याकडे प्रवास घडो..

यातून हा कठीण वाटणारा प्रवास हळूहळू सुकर होत जाईल.. 

म्हणे माणिक राम पहावा

काव्याच्या अंतिम चरणाकडे येताना माणिक प्रभू ईश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात..

तेहेतीस कोटी देवांची परंपरा असणाऱ्या, आपल्या समृद्ध संस्कृतीत सर्वच देवतांचे इतके विलोभनीय वर्णन केले आहे, की प्रत्येकाला अशी दैवी शक्ती एकदा तरी, याची देही याची डोळा बघण्याची आसक्ती आपोआप निर्माण होते..

पण प्रभू राम म्हणजे षड्रिपुंवर विजय मिळवलेली मानवी दैवी शक्ती, मग त्यांना बघण्याची आसक्ती निर्माण होऊन कसे बरे चालेल, या आसक्तीवर मात करण्यासाठी उपाय एकच..

तया लागी हृदयी जपावा

रामासारखे बनून रामाला कोणत्याही मंदिर, मूर्तीमध्ये न शोधता, त्याला आपल्या हृदयात स्थापन करा, अगदी तसा जसा रामभक्त हनुमानाने स्व हृदयात स्थापिला..

आता राम  सदैव आपल्या सोबत राहील, आपल्याला संसार रुपी भवसागर पार करण्यासाठी प्रेरणा देईल, दुःख, भय, संकट सारे निभावून नेईल, यासाठीच ..

राम होऊनी राम गा रे..  

रामासी शरण निघा रे..

सदर रचना ही माणिक प्रभू यांची असून हा एक राम निरंजन, भक्तीगीत प्रकार आहे..

राम होऊनी राम गा रे..

सोबत दिलेल्या दुव्यात या गीताचे स्वर बांधणी व सुरेल गायन पंडित प्रभाकर कारेकर यांनी केले आहे. त्याचाही जरूर आनंद घ्या..

भावार्थ कसा वाटला, प्रतिसाद द्यायला विसरू नका..

आपण सर्वांनी रामामय व्हावे याच शुभेच्छा..

Monday, March 24, 2025

भाकरी आख्यान

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

ही बहिणाबाई चौधरी यांची कविता पहिल्यांदा कुठे, कधी, कुणाकडून ऐकली हे आठवत नाही, पण ती अनुभवली, ते करोना काळात..

त्याचे झाले असे, की लहापणापासूनच भाकरी या पदार्थाशी विशेष सख्य नव्हते, पुढे लग्न झाल्यावरही पारंपरिक पदार्थ सासूबाई, आणि नव्या काळाचे मी अशी नकळत विभागणी झाली नवरा किंवा मुलगा दोघांनाही भाकरी विशेष आवडत नसल्याने, करायला शिकावी, यायला हवी असेही झाले नाही..

पण करोना काळात प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकण्याचा चंग बांधला होता, माझी गाठ पडली ती भाकरी सोबत..

त्या काळात सासूबाई आहारात फक्त भाकरी खायच्या, सुरुवातीला त्यांची त्या करूनही घेत होत्या, पण एकदा माझा मित्र शशांक, याच्याशी गप्पा चालू असताना भाकरी पुराण सुरू झाले आणि त्याने सांगितले की, तो फार छान भाकरी बनवतो, एकदम टम्म फुगणारी..

झालं..!

मग काय म्हणतात ना, स्वाभिमान की काय, तो दुखावला गेला, इतके पदार्थ बनवतो आपण, पण साधी भाकरी येऊ नये..? लगेच पक्के ठरवले, काही झाले तरी हे जमायलाच हवे..

लहान असताना माझी काकू, जी मूळ सोलापूरची आहे, तिच्या अतिशय पातळ, भल्या मोठ्या भाकरीचे भरपूर कौतुक ऐकलं, पाहिलं होतं, अगदी तशीच जमवायची असा निश्चय केला..

काही दिवसात अगदी तशी नाही, पण पुणेरी बाज असणारी, मध्यम आकाराची, पातळ आणि सर्वात महत्त्वाचं टम्म फुगणारी भाकरी जमू लागली..

आणि तेंव्हाच बहिणाबाईंच्या कवितेचा खरा अर्थ उमगला..

हवी तशी भाकरी येईपर्यंत, प्रक्रियेत रोज बदल करावे लागले, तेंव्हा राहून राहून ही कविता गुणगुणू लागायची..

तिच्या ओळी गेल्या वीस वर्षातला संसार डोळ्यांसमोर उभ्या करायच्या,आज त्यात असणारी स्वस्थता, समाधान, गोडवा येण्यासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान, केलेल्या तडजोडी लक्षात यायच्या..

या वेगवेगळ्या प्रसंगात व्यक्तींना तवा, चूल, निखारे यांची उपमा दिली, तर भूमिका बदलती असली, तरी त्यावर बनणारी संसार रुपी भाकरी उत्तम होण्यासाठी सगळे धडपड होते हे जाणवले..

प्रत्यक्षात किती भाकरी करायच्या, त्यासाठी पीठ किती घ्यायचे, त्यात योग्य मीठ व पाणी घालून मळायचे..

बरं हे पीठ मळणे, हे पोळीची कणीक मिळण्यापेक्षा खूपच वेगळे, कारण मुळातच ज्वारी, बाजरीच्या पिठात चिकटपणा कमी, त्यामुळे त्यासाठी वेगळेच कौशल्य लागते..

भाकरीच्या पिठाला पुन्हा पुन्हा आंजारावे, गोंजारावे लागते, एक न् एक कण एकमेकांशी सांधावा लागतो, 

पीठ मळून गोष्ट संपत नाही, अजून भली थोरली लढाई असते, भाकरी थापून करावी लागते..

लाटणे आणि थापणे या क्रिया वेगळ्या का, हे भाकरी करताना समजते, त्यातही थालिपीठ थापणे आणि भाकरी थापणे हे अजून वेगळे..

थोडेसे कोरडे पीठ घेऊन, त्यावर मनसोक्त मळून घेतलेला गोळा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने भाकरी थापायची, ती सर्व बाजूंनी एकसारखी असेल तरच उचलता येते, मधेच कुठेतरी पातळ झाली की मोडते, कोरडे पीठ जास्त झाले की भेगा पडतात अशा अनेक बाबी अनुभवातून जमल्या..

छान थापलेली भाकरी तापलेल्या तव्यावर टाकली की असते खरी परीक्षा आणि आठवतात कवितेच्या मुख्य ओळी..

आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर..

ज्वारी, बाजरी हे प्रमुख पीक असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात, पोळी हा पदार्थ खूप नंतर आला..

पूर्वी भाकरी हेच प्रमुख अन्न होते, त्यासोबत मिळाली तर भाजी, नाहीतर  मिरचीचा ठेचा, कांदा अगदी पाण्यासोबतही भाकरी खाल्ली जायची, ती अनेक दिवस टिकायची, त्यामुळे प्रवासाला जाताना शिदोरी म्हणून बांधून दिली जायची..

पुरण भरुन केली जाणारी तीच पोळी, तेंव्हा गहू तुलनेत कमी पिकायचा, त्यातून महाग, त्यामुळे सण समारंभाच्या वेळी पोळी नव्हे पुरणपोळी असायची..

पुरण न भरता पोळी करण्याची पद्धत सुरू झाली, तेंव्हा तिला चपाती हे नाव मिळाले..

पुढे खाण्याच्या पद्धती, शेती अनेक गोष्टीत बदल झाले आणि रोजच्या खाण्यात भाकरी ऐवजी गव्हाची चपाती मुख्य आहार बनली..

शहरी भागात तिलाच पोळी संबोधले जाऊ लागले आणि भाकरी काहीशी मागे पडली..

जशी भाकरीची कथा तशीच चुलीची गोष्ट, तिचे स्थान गॅस शेगडीने घेतले..

अरेच्या, विषय चालू होता, हाताला बसणाऱ्या चटक्यांचा, पण पोळी करताना तसा चटका बसण्याचे प्रसंग कमी येतात, काळजीपूर्वक केल्यास येतच नाही..

पण भाकरीचे तसे नाही..

कोरड्या पिठावर थापलेली भाकरी, उचलून तव्यावर टाकली की खरी परीक्षा असते, त्या कोरड्या पिठाच्या बाजूला, ना कमी ना जास्त पाणी टाकून, ते पूर्ण भाकरीभर एकसारखे पसरावे लागते..

आणि असे करताना तापलेल्या तव्यावर पाणी गरम होते आणि ते पसरवताना हलके चटके बसतात..

पण यानेच भाकरीचा खरपूस पापुद्रा तयार होतो, त्यामुळे ते चटके छान वाटतात..

जसे संसार येणाऱ्या किरकोळ कुरबुरी  नाती अधिक घट्ट बनवतात, आपण अधिक समंजस होत जातो, रोजच्या छोट्या मोठ्या आव्हानांना सामोरे जायचे बळ मिळते..

भाकरीवरचे पाणी पुरले, असे म्हणतात की ती पचली, मग ती उलटवतात, ही वेळही अचूक साधावी लागते, अन्यथा  दुसऱ्या बाजूला भेगा पडतात आणि मग ती फुगत नाही, उलटवलेली भाकरी दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी, पूर्वी तिला चुलीतल्या निखाऱ्यावर टाकताच ती मस्त फुगायची, आता तवा बाजूला करून शेगडीवर भाजतात, सगळा ताळमेळ जमला की भाकरी टम्म फुगते आणि छान खरपूस पापुद्रा सुटतो, अशी भाकरी खाताना खूप छान वाटते, अगदी तशीच नाही का मी हळूहळू संसारात रमत गेले..

एखाद्या वेळेस पीठ जुने झाले, विरी गेले, की मळताना थोडे कोमट पाणी वापरावे, उकड काढून घ्यावी किंवा त्याचे धिरडे, आंबील करतात, यातून समजते की प्रश्न असले, तरी त्यावर उपाय शोधता यायला हवा हे नव्याने उमगले.. 

असे एक ना अनेक अनुभव कवितेच्या प्रत्येक ओळीला समजून घेतना मला नव्याने समृद्ध, अधिक परिपक्व करत होते..

आणि एकदम जाणीव झाली, की शाळा, शिक्षण, अभ्यासक्रम या नावाखाली अशा सुंदर, तरल कविता, कथा शब्दशः अर्थ सांगून, आपण किती नीरस बनवतो.. 

त्यापेक्षा त्या फक्त पुन्हा पुन्हा वाचाव्यात, तोंडपाठ कराव्यात, 

बहिणाबाईंच्या इतर अनेक कविता  शिक्षक, आई बाबा, नातेवाईक, सांस्कृतिक, भाषिक कार्यक्रमात अनेकदा ऐकल्या, वाचल्या..

त्या कधी अभ्यासक्रमात होत्या की नाही, हेही आठवत नाही, पण त्यातल्या अनेक आजही तोंडपाठ आहेत, हे नक्की..

असे सांगितले जाते की या बहिणाबाई निरक्षर होत्या, एक शिक्षक म्हणून यावर हसावे की रडावे, हेच समजत नाही..

जाणवते ती शिक्षण नामक अर्थशून्य धडपड, पण मग आठवते, ती कृतियुक्त शिक्षण पद्धती..

प्रकर्षाने जाणवले कविता ऐकली होती, मनात खोलवर रुजली होती पण संसार, हाताचे चटके, भाकरी खाण्याचा आनंद तेंव्हाच समजला जेंव्हा हे सारे प्रत्यक्ष अनुभवले..

अर्थात उत्तम साहित्य ऐकवत राहायला हवे, फक्त ते लगेच समजून घेण्याचा निरर्थक अट्टहास करण्यापेक्षा ज्याने त्याने आपले अनुभव, प्रवास या सारे त्याच्याशी जोडून त्यातून जाणवणारे अर्थ, भावार्थ, मतितार्थ शोधायला हवे..

जसे आज मी भाकरी आख्यान मांडले, तुम्हाला सांगताना पुन्हा एकदा सारे अनुभवले, अगदी तसेच..

अशा साहित्याची भाषिक सहजता,  सुमधुर शब्द आणि दैनंदिन अनुभवांची मांडणी यामुळे प्रत्येकाला ती आपलीच गोष्ट वाटते..

सतत होणारे बदल, येणारे प्रश्न - समस्या, सुख दुःख, यश अपयश याने ओतप्रोत भरलेले, अतिशय नाट्यमय असणारे प्रत्येकाचे आयुष्य अनेक साहित्यिक आपल्या कथा, कवितांमध्ये अचूक शब्दात रेखाटतात, चुकलेल्यांना नवी वाट दाखवतात, हरलेल्यांना नवी उमेद देतात..

आजच्या एआयच्या जमान्यात सामाजिकता, भावनिकता, सोशिकपणा या अनेक गोष्टी हळूहळू कमी होताना दिसत आहेत..

परवाच गप्पांमध्ये विषय झाला, की येणाऱ्या काळात नाती रुजविण्यासाठी, सांभाळण्यासाठी खूप काम करावे लागणार आहे, बाकी सारे स्विगी, झोमॅटो करता येईल, पण माणसातले माणूसपण प्रयत्नपूर्वक जपावे लागणार आहे..

यासाठी अशा कथा, कविता नक्कीच मदत करतील हे अर्थात अनुभवाने सांगावेसे वाटते..

पुन्हा एकदा वाचून नव्याने अनुभवण्यासाठी, कविता सोबत देत आहे..

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही

राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।


अरे संसार संसार, नाही रडन कुढन

येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।

अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड

एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।


अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,

त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,

अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।


एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,

देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।

देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार

कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।


अरे संसार संसार, असा मोठा जादुगर

माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।

असा संसार संसार, आधी देवाचा इसर

माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।


आपले अनुभव सांगायला विसरू नका, प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..

Tuesday, February 25, 2025

शिवस्तुती

 


आज महाशिवरात्र, या निमित्ताने लेखनसेवा करावी, असे ठरविले..


त्यासाठी थोडे वाचन, अभ्यास करायला सुरुवात केली..


क्षणभरात जाणीव झाली, की त्रिदेवांपैकी जो संहारक आहे, लय गुणाचा स्वामी आहे, तांडव ज्याचे आवडते नृत्य आहे, हलाहल पचविण्याची ज्याची क्षमता आहे असे एका ना अनेक..


जे शिवरूप संहारक आहे, रुद्र आहे, ज्याचा कोप साऱ्याचा नाश करण्याची  क्षमता ठेवतो..


ते मूळ शिवरूप अत्यंत साधे दश दिशांचे वस्त्र पांघरलेले, खूप शांत, भोळे, सर्व चुकांना क्षमा करणारे, मनापासून केलेल्या भक्तीने सहज प्रसन्न होऊन वरदान देणारे आहे..


म्हणूनच कदाचित सगळे असूर या शिव शंकराची आराधना करत असे पुराणात आढळते..


त्याच बरोबर प्रत्येक समस्या, संकट याची उत्तर, उपाय हे देखील भगवान शंकराकडे असत..


या विषयी लेखन करण्यात आपण अगदीच अपुरे आहोत..


मग आता..


संदर्भ शोधताना, भगवान शिवाची अनेक स्तोत्र, स्तुती, आख्यायिका, कथा वाचनात आल्या..


आणि अचानक आठवण झाली, शाळेत प्राथमिक गटात असताना, नित्य नियमाने करत असणाऱ्या उपासनेची..


चिदानंद रूप: शिव ssमी.. शिव ssमी 


चिदानंद रूप: शिवोहम.. शिवोहम


त्यावेळी ही उपासना का करतो, याचा अर्थ काय हे विचारावे इतकी परिपक्वता नव्हती आणि धाडस देखील नव्हते..


आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्यांचे ऐकायचे इतके गणित साधे, सोपे होते..


आज लेखनासाठी शोध घेतला, तेंव्हा समजले, आद्य शंकराचार्य हे आपल्या गुरूंना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा त्यांच्या गुरूंनी, तू कोण आहेस असा प्रश्न विचारला..


त्याला उत्तर म्हणून बाल शंकराचार्य यांनी निर्वाण षटकम् रचिले, त्यामधील प्रत्येक पदाची शेवटची ओळ आहे, 


चिदानंद रूप: शिवोहम.. शिवोहम..


ज्याचा अर्थ आहे..


 मी चैतन्य स्वरूप आहे, आनंद रुप आहे..


या निर्वाण षटकम् काय आहे, हे सांगण्या आधी काय काय नाही हे सांगितले आहे..


त्या साऱ्यातून शिव शक्ती नेमकी काय आहे हे नव्याने लक्षात आले..


संदर्भासाठी ती ब्लॉग लिंक देत आहे..

https://www.linkedin.com/pulse/%E0%A4%9A%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE-prashant-pandya


आता नकळत लहान वयात केलेल्या या उपासनेतून काय मिळाले..?


एक अनामिक शक्ती, विश्वास, प्रेरणा..


शाळेत असताना ज्या अनेक संस्कार, विचारांनी कायमस्वरूपी गारूड केले, त्याही पुढे जाऊन अधिक स्वस्थ बनवले त्यापैकी एक म्हणजे उपासना..


वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या उपासना शिकलो, त्यापैकी सर्वात आधी ही उपासना..


या ओळींमध्ये अतिशय सुंदर नाद आहे, स्वतःला जागे करण्याची ताकद आहे..


'मी' या स्वरूपाला अधिक जबाबदार करणारी ही एक उपासना आहे..


वेदांमध्ये शिव याचा अर्थ सुंदर, उत्तम, शुभ असा अभिप्रेत आहे..


जेंव्हा या ओळींचा उच्चार करतो, की मी चित् म्हणजे सदैव आनंद रुप आहे, मी शिव रूप आहे..


आपोआप अत्यंत शांत, स्वस्थ वाटण्यास सुरुवात होते..


जर मी शिव म्हणजे शुभ आहे, तर माझ्या प्रत्येक कृतीतून चांगले व्हावे ही प्रेरणा मिळते..


आपण दिवसाची सुरुवात या दोन ओळींनी केला आणि त्या जबाबदारीने कृती करण्याचा प्रयत्न केला, तरी शिव शंकरांची आराधना होईल..


महाशिवरात्रीचे निमित्त साधून, इतके दिवस फक्त उपचार म्हणून उच्चारत असलेल्या ओळींचा अर्थ समजून घेण्याची संधी आज मिळाली..


त्यातील अर्थाची ताकद समजली, ते सामर्थ्य मला या पुढील प्रवासाला अधिक समृद्ध, स्वस्थ, शांत करत जावो हीच त्या सांभ शिवा चरणी प्रार्थना..


माझ्यासोबत तुम्हीही ही रचना समजून घेतली, याबद्दल मनापासून आनंद..


शिवशंकर सर्वांचे कल्याण करोत हीच सदिच्छा..


जय शिव शंभो.. जय जय महादेव..

Saturday, February 15, 2025

इंट्रा स्कूल

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन

स्पर्धा म्हणजे सहभाग, चढाओढ, चुरस, जिंकण्याची जिद्द, हार पचवण्याची खिलाडू वृत्ती या अगदी सहज लक्षात येणार गोष्टी..


पण अधिक सजगपणे याकडे पाहिले तर स्वतःला शोधण्याची संधी..


या स्पर्धेची ओळख आपल्याला अगदी पाळण्यात होते..


हसून दाखव, बाबा म्हण, चालून दाखव, यातूनच मूल स्वतःला शोधत राहते..


नव्या गोष्टी शिकत जाते, सरावाने त्यात पारंगत बनते..


याची पुढची पायरी ठरते ती शाळा, इथे स्वतः सोबत मित्रांसोबत स्पर्धा असते..


त्यामुळे अर्थातच त्यात कधी जीत तर कधी हार होणार हे ओघाने येते..


पण त्यातूनच खरे जीवन शिक्षण घडते, अशा स्पर्धा प्रत्येकाला अधिक सक्षम, क्रियाशील, सर्जनशील बनवतात..


त्यामुळे निखळ आनंद, प्रोत्साहन, नावीन्य, कृतिशील स्पर्धा असायला हव्या..


अशा उत्तम नियोजनपूर्वक, वयानुरूप, विविध कला समाविष्ट असणारा शालांतर्गत स्पर्धा सप्ताह, 

मी गेली पाच वर्ष आमच्या सिटी प्राईड शाळा निगडी येथे अनुभवत आहे..


त्याविषयी हा लेखन प्रपंच 

(थोडक्यात मांडणी अवघड आहे)

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन नावाने ओळखला जाणारा हा आठवडा, माध्यमिक विभागासाठी प्रथम आणि प्राथमिक विभागात द्वितीय सत्रात साजरा होतो..


स्पर्धा


प्रत्येक इयत्तेसाठी गायन, वादन, नृत्य, हस्तकला, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा अशा दरवर्षी वेगवेगळ्या  पाच वैयक्तिक..


आणि पूर्ण वर्गासाठी समूह गायन किंवा क्लास कर्निव्हल असा भरगच्च संधीचा पेटारा मुलांसाठी सज्ज असतो..


याचा मुख्य उद्देश वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या तरी एका स्पर्धेत सहभाग नोंदवावा, विविध विषयावर आधारित या स्पर्धांमधून मुलांना स्वतःमधील गुण शोधण्याची संधी मिळावी..


सोबतच गटाने काम करणे, माझा वर्ग, मिळून सादरीकरण यातून समूह भावना तयार होण्यास मदत मिळावी..

 

निवड प्रक्रिया 


यासाठी गेल्यावर्षी पर्यंत छापील पत्रकाद्वारे या स्पर्धांची सविस्तर माहिती पालकांपर्यंत दिली जायची, त्यातून ते आपल्या मुलांशी चर्चा करून एका स्पर्धेत सहभाग नोंदवायचे, यावर्षी पासून गुगल फॉर्मच्या मदतीने मुलांनी स्पर्धेची निवड ठरवली..


उद्घाटन सोहळा 


आठवडाभर चालणारा हा उपक्रम असल्याने त्याची सुरुवातही तशीच उत्साहात, दणक्यात व्हायला हवी म्हणूनच दरवर्षी याचे नावीन्यपूर्ण नियोजन केले जाते..


सोबतच दररोज त्यादिवशीच्या स्पर्धा, त्याचे स्थळ, वेळ ही सविस्तर माहिती परिपाठामध्ये (असेम्ब्ली) दिली जाते, शिवाय शिक्षक खोली, सूचना फलक यावर लेखी नियोजन उपलब्ध असते, आता कालानुरूप त्याच्या पीडीएफ गटावर देखील पाठवल्या जातात..


प्रत्यक्ष स्पर्धा


प्राथमिक विभाग म्हणजे पहिली ते पाचवी म्हणजे पाच वर्ग गुणिले त्यांच्या प्रत्येकी पाच म्हणजे २५ आणि वर्गाच्या पाच म्हणजे सगळ्या मिळून एकूण ३० स्पर्धा सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात संपन्न होतात..


सकाळी साडेआठ ते तीन या वेळात या ३० स्पर्धांचे आयोजन हा एक वेगळाच धामधुमीचा विषय असतो..


स्पर्धेच्या स्वरूपानुसार छोटे किंवा मोठे सभागृह, त्या इयत्तेचे वर्ग, शाळेतील इतर जागा जसे बेसमेंट, कॉरिडॉर इत्यादी विविध ठिकाणी एका वेळी साधारण चार ते पाच स्पर्धा समांतरपणे सुरू असतात..







स्पर्धा समिती


पूर्ण आठवडा चालणाऱ्या या उपक्रमासाठी शिक्षकांचा एक गट- समिती, इंट्रा स्कूल कमिटी या साऱ्याचे आयोजन नियोजन करते..


पाचही वर्ष या गटाचा सदस्य म्हणून माझे खूप छान अनुभव शिक्षण झाले..


मुलांनी आपल्या आवडीची स्पर्धा निवडल्यानंतर त्यानुसार याद्या तयार होतात, प्रत्येक स्पर्धेसाठी योग्य जागा, वेळ ठरते..


स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षक (त्या स्पर्धेत सहभागी नसणारे विद्यार्थी), पालकांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन, परिक्षणासाठीचे निकष, परिक्षक, त्यांचा सत्कार, चहापान ही व्यवस्था होते..


त्यानंतर प्रत्येक स्पर्धेचा निकाल, बक्षीस पात्र चषक, प्रशस्तिपत्रकांचे  लेखन इत्यादी अनेक कामे असतात..


अशा खूप साऱ्या गोष्टी, जबाबदाऱ्या या स्पर्धांच्या आधी आणि नंतर ही कमिटी समर्थपणे सांभाळते, सोबत शाळेतील नित्य कामे, वैयक्तिक कौटुंबिक कर्तव्ये यालाही योग्य न्याय देत असते..


या समितीच्या प्रमुख शीतल सावंत या उत्तमपणे, आपल्या शिलेदारांसह गेली अनेक वर्षे ही जबाबदारी एक हाती सांभाळत आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक, अभिनंदन आणि पुढेही असेच काम करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..


परिक्षक


स्पर्धा म्हणली की त्याचे परीक्षण करण्यासाठी योग्य परिक्षक हवे..


हे निवडताना त्या विषयाची आवड, प्राविण्य, अनुभव याचा विचार करून तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जाते..


याशिवाय विषयाशी संबंधित पालकांचीही यासाठी निवड केली जाते..


यानिमित्ताने इतर शाळा संस्था या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती शाळेत भेट देतात आपले अनुभव मुलांना सांगतात, त्यांना प्रोत्साहित करतात..


अनेकदा अटीतटीची स्पर्धा, त्यातून मोजके क्रमांक निवडायचे यासाठी परीक्षकांची परिक्षा असते..


हे सारे अनुभव सर्वांनाच अधिक समृद्ध करतात..


बक्षीस समारंभ


समारोपाकडे येताना ज्या उत्साहाने सुरुवात झाली तितक्याच जोशात दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतो..


कोणीतरी जिंकते कोणालातरी हार पचवावी लागते या साऱ्यातून उद्याच्या धकाधकीच्या जीवन स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे नकळत अनुभव शिक्षण होत असते..


या स्पर्धेच्या नियोजन गटात सहभागी होऊन स्वतःला अनेक प्रकारे नव्याने प्रशिक्षित करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते..


अशा निखळ, निकोप स्पर्धा प्रत्येक शाळेमध्ये असल्या पाहिजेत असे मनापासून सुचवते आणि थांबते..


Saturday, January 11, 2025

मूकनाट्य

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनय आणि भाषा याचा अतिशय सुंदर आविष्कार पाहायला मिळाला..

आता प्रश्न उपस्थित होईल की अभिनय म्हटले की भाषा ओघाने आलीच, यात काय नवल..?

तर यात वेगळे पण होते ते भाषा प्रवासाचे..

भाषेची मूळ उत्पत्ती संप्रेषण, भावभावनांचे अदान प्रदान आहे याचा संपूर्ण विसर पडतो आणि हे प्रकर्षाने होते ते शिक्षणात..

याचा परिणाम भाषा तेही आपल्या देशातील भाषा शिकण्याची सक्ती करावी लागते..

आपण अनेकदा भाषा म्हणजे अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण या सगळ्यात अडकतो.. 

हे सारे गैरसमज हा नाट्य प्रयोगाने क्षणार्धात संपवून टाकले..

नाट्य होते मूकनाट्य, इंग्रजीत त्याला माईम म्हणतात..

शब्दांशिवाय आपल्या भावना, विचार पोहचवणे हे नक्कीच सोपे नाही..

कदाचित या करताच वेशभूषा संपूर्ण काळा पोषाश, पांढऱ्या रंगाने पूर्णपणे  रंगवलेला चेहरा, पांढरे हातमोजे.. 

यामुळे दूरवर बसलेल्या प्रेक्षकांनाही चेहऱ्यावरचे हावभाव (आनंद, दुःख, भय, आश्चर्य ) ठळकपणे दिसतात..

हातांच्या माध्यमातून केलेल्या खाणाखुणा अचूक टिपता येतात.. 

सोबत वाजणारे अतिशय संथ आणि स्वस्थ पार्श्वसंगीत, बघणाऱ्यांना त्या नाटयाशी जोडून ठेवते..

रसिकांना अभिवादन करून प्रयोग सुरू झाला, अर्थात शब्द नसल्याने बघणारे अतिशय तन्मयतेने नायकाशी समरूप झाले होते..

असेच निवांत भटकत असताना नायकाला काहीतरी सापडते, अगदी लहान असलेली ती वस्तू मोठी मोठी होत जाते..

इतकी मोठी होते की नायक त्याच्या आत प्रवेश करतो, तिथे एक वेगळे, अद्भूत, जादुई जग, त्यात सुरुवातीला रमणारा, नंतर स्वतःचे मूळ रूप हरवलेला नायक..

अंतिम प्रवेशात त्यातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असून असाह्य, हतबल अशी त्याची अवस्था, आणि मोठा होत गेलेला आकार पुन्हा मूळ रूपात येताना, त्यात संपून गेलेला नायक..

अवघ्या आठ दहा मिनिटांचा प्रयोग..

पण मला तर बालपणापासून ते आजवरच्या अनेक आठवणीत लिलया घेऊन गेला..

मला सुचणारे लेखन, त्याची ताकद, त्यातला आनंद आणि अनेकदा अनावश्यक गोष्टीत अडकणारी मी याचे अनेक प्रसंग या नाट्यात अनुभवले..

त्याने काय सादर केले, मी काय अनुभवले यात काही प्रमाणात भेद होता, कारण नाट्य मूक होते..

असे असले तर त्यातून जो मूळ विचार सांगायचा होता की अनेकदा आपण बाह्य गोष्टी, गरजा यात इतके अडकतो की आपली मूळ आवड, गरज ही हरवून जाते आणि त्यामुळे खरा आनंद आपल्या आत असूनही नको तिथेच शोधत राहतो..

अनेकदा हे समजले तरी वाढवून ठेवलेल्या पसाऱ्यातून बाहेर पडायला वाटच सापडत नाही..

प्रयोग संपल्यावर, हे सारे ताकदीने सादर करणाऱ्या त्या अभिनेत्याची भेट घेतली, नाव संकेत खेडकर..

आजमितीला अनेक वाहिन्यांवर, विविध मालिकांमध्ये भूमिका करताना बघायला मिळणारा हा एक कलाकार..

असे असूनही या कार्यक्रमास अतिशय किरकोळ मूल्य घेऊन उपस्थित असणारा..

त्याच्याशी बोलताना लक्षात आले की कोणतीही गोष्ट समजणे, शिकणे हे अनुभवांनी अधिक अर्थपूर्ण होते..

आणि त्यातून जाणवले की आपण भाषा शिक्षक म्हणून किती नीरस शिक्षण देतो..

अर्थात प्रमाण भाषा शिकवताना गरज म्हणून तांत्रिक गोष्टी करायला हव्या, पण त्यासोबत भाषेचा जो मूळ प्रवास, भावनांचे प्रकटीकरण याला अधिक महत्त्व द्यायला हवे..

संकेत सोबत बोलताना अजून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समजली की तो व्यस्त दिनक्रमात, अतिशय कमी मानधनात हे प्रयोग करतो ते त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी..

मूकनाट्य या विषयात तो विद्या वाचस्पती (PHd) होणार आहे, त्याचे प्रबंध लिहिण्यासाठी, असे सादरीकरण, त्यात प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, चर्चा यावर त्याचे काम चालू आहे..

नाट्याचे नाव होते, मेटरिअलिस्टिक  क्यूब..

हा विषय त्याला स्वानुभवातून सुचला होता..

अभिनय हा मूळ स्वभाव, तीच आवड, तेच अर्थार्जनाचे माध्यम..

या साऱ्यात तो भौतिक गरजा, दिनक्रम यात गुरफटून गेला आणि मूळ आनंदाला पारखा झाला, त्यातून बाहेर पडण्यासाठी काही काळ रिकाम्या घरात जाऊन राहिला आणि तिथेच त्याला हे नाट्य सुचले..

भटकंती करणाऱ्या एक इसमास अचानक एक  वस्तू सापडते, जिचा आकार चौकोनी आहे, तो दाखवण्यासाठी त्याची दाखवलेली पकड, नंतर ती हवेत फेकून झेलताना, प्रत्येक वेळी वाढत जाणारा आकार.. 

तो आकार वाढत जाऊन, तयार होत गेलेली एक मोठी खोली , तेंव्हा तो चौकोन, त्याच्या भिंती, कोन हे छोटे छोटे बारकावे अफलातून जाणवत होते..

त्या ठोकळयाला चिकटून जाताना अचानक एका जागेतून आत झालेला प्रवेश, प्रथम त्यातून बाहेर पडण्याची धडपड, वाटणारे भय हे खूपच वाखण्याजोगे होते..

काही वेळाने तिथे प्रगट झालेला जीन वा देवता (मला ती देवता वाटली होती.. हवे ती मिळवण्याची आपली इच्छा, त्यासाठीचे कष्ट, बुद्धिमत्ता) 

तिने पूर्ण केलेल्या एकेक इच्छा, त्यामुळे होणारा आनंद, ठोकळ्यात रमून जाणारे मन..

त्यानंतर वाढत जाणाऱ्या मागण्या, त्यातून होणारे वृत्तीचे अधःपतन याची मांडणी अक्षरशः विदारक, अंगावर काटे आणणारी होती..

मग त्यातून बाहेर पाडण्यासाठी पुन्हा एकदा झालेली असाह्य तगमग , त्यात आलेले अपयश, लहान होत जाणारा ठोकळा आणि त्यात संपून जाणारे अस्तित्व याचे उत्कृष्ट सादरीकरण..

आपण अनेकदा बाहेरून सुंदर दिसणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या वस्तूंमध्ये हळूहळू कसे अडकतो..

त्यात आपल्या आत असलेली आवड, खुबी हरवत जाते, हे नाट्यात बघताना खूप काही उलगडत जात होते, हरवलेले सापडत होते..

डोळ्यांवर असलेली मोहपाशाची झापड दूर करायचे काम हे सादरीकरण नक्की करत होते ..

त्यासाठी कलाकाराला १००% , त्याच्या अभिनय केलेला मनापासून प्रणाम आणि..

अनेक प्रकारे अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संकेतला हीच गोष्ट उत्तम शब्दात नक्कीच साकारता आली असती, पण त्याने मूक अभिनय निवडला..

आणि प्रत्येकाला आलेले अनुभव, असणारी आवड, नित्य होणारी तडफड, धडपड यातून विषय स्वतःहून समजण्याची मोकळीक दिली..

त्याचे हे सादरीकरण अनेकांना त्यांचे खोलवर दडलेली स्वप्न, अधुऱ्या इच्छा नव्याने शोधण्यास नक्कीच मदत करत असेल..

असे प्रयोग तो वैयक्तिक समारंभ, शाळा, संस्था , कोणत्याही कार्यक्रमात सादर करतो, तेही अत्यंत अल्प मानधनात, तेही त्याच्या अभ्यासाचा भाग असते.. 

आज शिक्षणात कोटा फॅक्टरी सारखे भयंकर प्रकार चालू असताना, असा जगावेगळा अभ्यास करणाऱ्यांना बघून फार भारी वाटते..

प्रेक्षक, रसिक यांचे मनोरंजन करत, त्यांना नव्या प्रेरणा देत, नवी स्वप्ने दाखवत त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादावर एका संशोधनाचे प्रबंध लिहायचे हा विचार किती भन्नाट, नावीन्यपूर्ण, सर्जनशील आहे ना..!

संकेतच्या या प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा..

सोबतच सध्या झापड बांधून चालू असणारा अनावश्यक घोडे बाजार, गधा मजदूरी  विसरून आजची युवापिढी अशा हटके विषयांचा सखोल अभ्यास करो, ही सदिच्छा..

आणि अशा नवनवीन गोष्टींमधून माझ्या लेखनास नवे विषय लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..



सविस्तर - संकेत खेडकर (मोबाईल - 9960599894)

शिक्षण- MSc( Zoology ), MA ( Theatre ) 

Alumni of National MIME institute ( Kolkatta )

NET-JRF in Theatre studies

गुरू- पद्मश्री निरंजन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली,  भारतीय मूकअभिनयात वाचस्पती (PHd)अभ्यास चालू 

बारा वर्षांपासून नाटकात लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम.

संस्था - सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर ( अध्यक्ष - डॉ.. श्याम शिंदे )

तीन वर्षे ललित कला केंद्र ( गुरुकुल ) पुणे विद्यापीठ येथून तीन वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम पूर्ण केला आहे

ललित कला केंद्र येथे नाट्य , नृत्य आणि संगीत अश्या तीन विषयांचं प्रशिक्षण दिले जाते

National youth festival ( अजमेर, राजस्थान) आणि Theatre olympic ( भोपाळ )  

येथे नाटकांची सादरीकरण केले आहे

अनुभव 

दैनंदिन मालिका - राजा राणी ची गं जोडी ( PSI अमेय वर्दे ), डॉ .बाबासाहेब आंबेडकर

भागो मोहन प्यारे, जय जय शनिदेव ( भुमिका - शनिदेव), गाथा नवनाथांची ( भुमिका - गोरक्षनाथ, महादेव)

चित्रपट  - साजींदे,  प्रोजेक्ट 24 

वेब सिरीज - तुमच्यासाठी काय पण, शिस्तीत राहायचं, चाळीतली लव स्टोरी

शिवाय 

गेल्या सहा वर्षांपासूनच महराष्ट्रातील शाळा कॉलेज आणि विद्यापीठामधे अभिनय कार्यशाळेत  साठी प्रशिक्षक  म्हणून कार्यरत..



Wednesday, January 01, 2025

भ्रमणध्वनी

 भ्रमणध्वनी 

नातवंड बऱ्याच वर्षांनी गावी येणार. पद्मा आजीला आनंदात काय करू, काय नको झाले. तयारीत महिना सरला. पहाटे मुले यायला निघणार, या विचाराने पूर्ण रात्र तिचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. अखेर तो दिवस उगवला, मंडळी ‘श्रीवर्धन’ च्या दिशेने रवाना झाली. दंगामस्ती, नाश्ता पाणी, गाण्यांच्या भेंड्या आणि  मधेच डुलक्या घेत प्रवास एकदम झक्कास झाला. आजी नातवंडांच्या वाटेकडे डोळे लावून दारातच उभी, ‘आम्ही आलो’ चार चाकीतून आवाज आला. तसे माऊलीने नजरेनेच लिंबलोण उतरवले. मग रीतसर भाकर तुकडा ओवाळला.


गंधार, नभा दुधावरची साय, सोबत सुश्रूता, श्रीरंग, अद्विक ही त्यांची मित्रमंडळी घरभर बागडू लागली. त्यांच्या चिवचिवाटाने घर भरले. सगळ्यांनी चुलीवरच्या जेवणावर मस्त ताव मारून थोडी वामकुक्षी घेतली. आजीने रखमाच्या मदतीने संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली.


प्रवासाचा शीण ओसरला, तसे सगळे अंगणात आले. आजी आणि रखमा धान्य निवडत होत्या. मुलांना बघताच त्यांनी काम बाजूला सारले. मुले आजी भोवती पिंगा घालू लागली. गंधारने हळूच एक गंमत तिच्यासमोर धरली, "ही बाबाने तुझ्यासाठी पाठवलेली भेट."


"मी काय आता लहान आहे?" आजी.


"लहान तर तू कधीच होणार नाही, नेहमी मोठीच तर राहणार." नभा.


"भेटवस्तू आवडतात सगळ्यांना." सुश.


"थांबा रे सगळे, आजी बघ ना, काय आहे ते." श्रीरंग.


वेष्टन बाजूला सरते, आत चकचकीत काळी, आयताकृती, चपटी वस्तू असते.


"भ्रमणध्वनी..! अन् मला कशाला हवा ? अर्धी लाकडे सरणावर पोहचली, आता मुखी हरिनाम पुरे." आजी


"हरिनाम घ्यायलाही, साथ देतो मोबाईल.. नव्हे भ्रमणध्वनी.." अद्वीक.


"शिवाय आम्ही घरी परत गेलो, तरी रोज गप्पा मारू, तेही एकमेकांना बघत, व्हिडीओ कॉल म्हणतात त्याला." श्रीरंग


"तू आम्हाला तुझ्या खास रेसिपी शिकव." नभा.


"सागरगोटे, काचाकवड्या ते सारे खेळ शिकव." अद्वीक.


"रोज रात्री किमान एक गोष्ट सांग, जुनी गाणी ऐकव" गंधार.

"अरे थांबा, थांबा, त्या माऊलीला श्वास तर घेऊ द्या. तो डबा वापरायचा कसा, हे कोण शिकवणार..?" रखमा


"अगं, मावशी त्यासाठी तर उन्हाळ्याच्या महिनाभर सुटीत आलो ना आम्ही." गंधार.


"एरवी चार दिवस आजी पुण्याला किंवा आम्ही इकडे येतो, त्यात काही हे जमणार नव्हते. आजीला सांगून थकलो, की मोबाईल ही आता गरज आहे, हौस नाही." नभा.


"मग आई बाबा, आम्ही मिळून आजी आणि तुझ्यासाठी चांगले महिनाभर ‘भ्रमणध्वनी प्रशिक्षण’ घ्यायचे ठरवले आणि आलो इकडे." सुश.


"रखमे, आता मात्र हे शिकावेच लागणार बरं." आजी.


"मी तर अर्ध्या पायावर तयार आहे." रखमा.


"मावशी, तुझ्यासाठी दुसरा मोबाईल आहे, हं" श्रीरंग.


मला नाही जमायचे.. नाही यायचे या वयात, आता नको.. 


अशी एका ना हजार कारण दिली दोघींनी, पण पंचरत्नांनी हार मानली नाही.


तशी पंचक्रोशीत पद्माआजी तल्लख बुद्धीची म्हणून ओळखली जायची. रखमा पण हुशारच. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यात, हव्या त्या व्यक्तीला संपर्क करणे, संदेश पाठविणे, छायाचित्र घेणे इथ पासून ते अगदी नकाशा वापरून रस्ता शोधणे, स्वयंचलित वाहन व्यवस्था करणे, ई पेमेंट करणे अशा अनेक गोष्टी दोघी उत्तम शिकल्या, त्यातले धोके नीट समजून घेतले.


वयानुसार विस्मरण झालेच, तर अडायला नको म्हणून आजीने आवश्यक लेखी टिपणे देखील नोंदवली. आता या भ्रमणध्वनीने तिला एक नवे काम दिले. रखमाला सोबत घेऊन हळूहळू साऱ्या गावकरी मंडळींना भ्रमणध्वनी साक्षर करायचे. त्याचे धोके शिकवायचे. गरजेनुसार सारे ब्रह्मांड ‘श्रीवर्धन’ च्या दारी आणायचे.

थोडक्यात, काय तर आजी भ्रमणध्वनी वापरण्यात तरबेज.. नव्हे ‘प्रो’ झाली.

आणि मराठी म्हणींमध्ये एक नवी म्हण जन्मली,


हाती भ्रमणध्वनी धरिले,  ब्रह्मांड दारी अवतरले..


अभिप्राय - म्हणी हा भाषेचा खूपच मौल्यवान दागिना आहे. त्यात पुणेरी मराठी आणि म्हणींचा वापर याचे तर गणित म्हणजे आणखी मजा. खंत आहे की, काळाच्या ओघात हे सारे कुठे तरी मागे पडत चालले आहे, भाषेचा दर्जा दिवसेंदिवस खालवत चालला आहे.

यासाठी अशी स्पर्धा नक्कीच प्रेरणादायी वाटते. यातून उपलब्ध झालेल्या कथा नक्कीच उपयुक्त ठरतील. म्हणी समजून घेताना अधिक मजा येईल. 

या स्पर्धेच्या निमित्ताने या भाषा प्रकाराकडे नव्याने बघण्याची संधी मिळाल्यामुळे आयोजकांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन