Sunday, May 17, 2026

मिसळ

गोष्ट नवनिर्मितीची

गोष्ट किती जुनी आहे, याची काहीच कल्पना नाही. कोणी सांगितली, याचेही काही दाखले नाहीत. कानगोष्टींमधून आली असावी, असा कयास आहे.. 

आवडेल ना..!

आटपाट नगरात दामू अण्णा नावाचे गृहस्थ एक भोजनालय चालवायचे. त्यांच्यासोबत त्यांची मानलेली बहीण रुक्मिणी स्वयंपाक घर सांभाळायची. नामदेव पडेल ते काम करायचा, जो अण्णांना अगदी मुलासारखा होता. हरी आणि सखा हे दोघे काही महिन्यांपूर्वीच भोजनालयात काम करायला आले होते. हे चौघे अण्णांचे कुटुंब होते..

भोजनालयात आलेल्या भुकेल्या जीवांना घरासारखं अन्न द्यायचं, पैशांमागे न धावता दोन वेळची भाकरी मिळण्यापुरतं काम करायचं. इतकाच काय तो साऱ्यांचा दिनक्रम होता..

एसटी स्टँडच्या बाजूला असलेले हे भोजनालय बऱ्यापैकी नावाजलेले होते. थकले भागले, भुकेले प्रवासी इथे न्याहारी, जेवण करायचे. अगदी घरगुती सोय व्हायची, त्यामुळे मंडळी खुश असायची.

पण तो दिवस काहीतरी वेगळाच होता. सकाळपासून एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं. नामू काळजीने अण्णांना म्हणाला, "अण्णांनू आजचं गणित चुकलयं बगा, सकाळ धरन कोनीबी हाटीलात आल नाय.."

त्यावर अण्णा, "आणि यानंतरही येतील, असे मला वाटत नाही. नाम्या आपल्या लक्षात यायला होतं, की आज गावच्या देवीचा उरूस आहे. बघ ना.. येणारी सगळी मंडळी, डोकं टेकवायला देवळाकडे जात आहेत. कदाचित तिथच काहीतरी खात असतील.."  

"खरंच की हो अण्णा, आता आपण बनवलेला सारा नाश्ता, जेवण वाया जातंय बगा. त्यात आपल्याकडे ते शीतकपाट पण नाही. काय करायचं हो आता..?" नामू.

"आपण जाऊया का उरसाला..? आज तिथे थाटू आपलं दुकान.. " अण्णा

"अSSक्शी, माझ्या मनातलं बोलला. पण अण्णा, उरसात लोकांना काहीतरी खमंग खायला लागतं. हे रोजचं अन्न तिथे कसं चालायचं..?" नामू.

"त्यासाठी एक भन्नाट कल्पना आहे माझ्या डोक्यात. तू रोज उरलेलं सगळे पदार्थ एकत्र करत, त्यावर दही, नाहीतर आमटी घालून गोपाळकाला करतो, तसं काहीतरी बनवून देऊया..? नाश्त्यातले पोहे, त्यावर बटाट्याची भाजी मग उसळ सगळे एकत्र करून देऊ.." अण्णा

"हे भारी जमेल, पण अण्णा मी दही,आमटी घेऊन खातो. गिऱ्हाईक मंडळींना थोडी चालणारे ते.." नामू

"त्यांच्यासाठी बिना डाळीचा स्पेशल रस्सा बनवू, त्यावर तेलाचा मस्त तवंग सुटेल, असा तडका देऊ, एक नंबर झणझणीत बनवू बघ.." अण्णा

"अन् अण्णा या पदार्थाला म्हणायचे काय..? "नामू

"सगळ्या गोष्टी एकत्र मिसळल्या, मग मिसळ म्हणूया..?" अण्णा

" मिसळ..! एकच नंबर सुचले बघा तुम्हाला, चला आता उशीर नको करायला, निघूया लवकर" नामू

"अरे लेका आधी तयारी कर, त्या रुक्मिणीला रस्सा बनवायला सांग. एखादं बाकडं शोध, तिथे टेबल खुर्च्या मांडायला जागा मिळणार नाही. जा चट्दिशी सगळ्यांना तयारी करायला लाव.." अण्णा.

नाम्या स्वयंपाक घराकडे पळाला. आज चपाती, भाकरी, घावन काहीच करायचं नसल्यामुळे, निवांत बसलेल्या रुक्मिणीला सारा प्रकार सांगितला. 

"आक्का, तुम्हाला काय मदत करू सांगा. आपल्याला घाई करायला हवी. उरूसात लवकर पोहोचायला हवं.आणि हो नुसता रस्सा नको बरं का..! आत्ताच दिवाळी झाली. त्यामुळे चिवडा, शेव आहे, ते पण सोबत घेऊ.." नामू.

"नाम्या आधी पटकन कांदा लसूण वाटून दे. थोडा टोमॅटो चिरून दे, त्या हरी आणि सखाला बोलावं.." आक्का.

बघता बघता मंडळी कामाला लागली. डबे भरले, टेबल वजा बाकडे घेऊन मंडळी गावच्या देवळाकडे रवाना झाली. 

 

रितसर दुकान थाटले.अण्णांनी नामूला हाकाटी द्यायला सांगितली. 

"चला या, मेजवानी करा, मिसळ नावाचा पदार्थ चाखा.. SSS चला या, मेजवानी करा, मिसळ नावाचा पदार्थ चाखा....!" नामू, सखा, हरी सगळेच गर्जू लागले.

'मिसळ'.. हे काय नवीन, हे बघायला दोन-चार मंडळी भोवती गोळा झाली. 

"काय अण्णा, आज भोजनालय सोडून इथे काय करता राव..?" एकजण म्हणाला.

"तुम्ही आज तिकड आले नाही, म्हटलं की आपणच यावं. तसंही देवीचा उत्सव आहे. म्हटलं चला गिऱ्हाईक मंडळींना इथे सेवा देऊ. पण इथे त्या टेबलखुर्चीला जागा नाही, म्हणून हा नवीन पदार्थ घेऊन आलो.. " अण्णा.

"हे बाकी बेस्ट केलं, तुमच्या भोजनायाची चव एकदम घरच्यासारखी असते बघा. काय ते नवीन, मिसळ बघू तरी, द्या बरं मला.." नेहमीचा खास खवय्या शिवादादा. 

आक्कांनी खोलगट बशीत आधी पोहे, त्याच्यावरती बटाट्याची भाजी मग उसळ, छान कुरकुरीत चिवडा आणि नंतर मसाल्याची आमटी वाढत पदार्थ छान सजवला. वरून थोडी दिवाळीची शेव ही भुरभुरली आणि दर्दी शिवादादा समोर धरली.

त्याने साशंक नजरेने बशीकडे पाहून, पहिला घास मुखात घेणार तसा नामू आरडला..

"थांबा साहेबानू..!, मिसळ हाय ती, साऱ्या गोष्टी आधी नीट मिसळून तर घ्या.." त्याने पुढे होऊन चमच्याने सारे पदार्थ छान एकत्र केले. थोडा अजून रस्सा हवा, म्हणून बशी आक्का समोर धरली. त्यांनी डावाने रस्सा वाढला.

मग ती तय्यार मिसळ शिवदादाने चाखली नि दाद मिळाली, "वाह क्या बात..! आक्का एक नंबर जमला बरं का नवा पदार्थ. थांबा आमच्या कुटुंबाला घेऊन येतो. दोन-तीन बशा तयार ठेवा."  


त्या बाकड्या भोवती जमून हे सारं बघणारी बाकी मंडळी, "आम्हाला पण द्या, एकेक बशी.." 

बघता सकाळी बनवलेल्या पदार्थांचे डबे रिकामे झाले. भुकेले जीव तृप्त झाले नि नवा पदार्थ मिसळ अन्नपूर्णा देवीच्या सेवेत रुजू झाला.

काहींना, आता संध्याकाळी या, असे सांगून परत पाठवावे लागले. त्यासाठी पुन्हा लगभग सुरू झाली.

"अण्णा मला काय वाटतंय मिसळी सोबत भाकरी, चपाती नाहीतर घावन असे काहीतरी देऊ या का..?" आक्कांनी सुचवले.

"काहीच हरकत नाही. असेही संध्याकाळी मंडळी आपापल्या गावी निघतील. पोटाची खळगी पुरेशी भरली, तरच घरी पोचेस्तोवर धीर धरवेल." आण्णा.

दोन-तीन तासात संध्याकाळची तयारी झाली. पन्नास साठ लोकांसाठी मिसळ भाकरी बनवून मंडळी गावाच्या देवळाकडे निघाली.

"अण्णांनू, देवीला नैवेद्य दाखवू या..?" नामू. 

"हो.. हो चालतंय की, या बारीला सगळ्या गोष्टी खास बनवल्या आहेत. नव्या पदार्थावर देवीची कृपा हवी ना.." अण्णा

सकाळपासून गोडधोड खाऊन कंटाळलेली ग्रामदेवी मिसळीच्या स्वादाने अतिशय सुखावली. ते पाहून आनंदून गेलेल्या देवी अन्नपूर्णेने दामू अण्णांच्या या कुटुंबाची नकळत दृष्ट काढली. कडाकड बोटं मोडल्याचा सुमधूर नाद उमटला.

                  

बघता बघता मिसळीची चर्चा गावोगावी गेली. अन्नपूर्णा देवीची सेवा करणारे, अनेक जण मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी येऊन गेले. प्रत्येकाने आपल्या कल्पनांना भरारी देत, मिसळीच्या नवनवीन पद्धती शोधल्या. 

मिसळ हळूहळू अनेकांच्या नित्य आहाराचा भाग बनली. भाकरी, चपाती, घावन यांची जागा पाव-ब्रेड यांनी घेतली. मसाल्याच्या आमटीला तर्री हे नवे नाव मिळाले. 

अगदी आजच्या तारखेपर्यंत मिसळीचे अनेक प्रयोग सुरूच आहेत. नाना प्रकारची मिसळ खवय्यांच्या सेवेसाठी येत आहे. 

गोष्ट खूपच जुनी होती. सांगोपांगी बदलत गेली.

पण कशी वाटली, हे सांगायला विसरू नका..!

तुमच्या प्रतिसादावर रंगबिरंगी मिसळीची कथा घेऊन येण्याचा मानस आहे..

प्रतिसादाच्या प्रतीक्षेत..

लेखनवेडी अभिगंधशाली..

Tuesday, April 28, 2026

उदक


मला पाणी व्हायचे आहे..

पाणी..जल..तोय..नीर.. उदक, जीवन, सलिल, अंबू, पय.. , सारे आयाम अनुभवायचे आहे..

पाणी बनून वाहत रहायचे, प्रवाह नेईल तिथे..

पंचतत्त्वात सर्वात जास्त सुखावणारे तत्त्व आहे..पाणी..!

म्हणून त्यास वाहून नेणाऱ्या सार्‍या नद्या माता आहेत.. 


त्या खळाळत जातात, तिथे प्रदेश फुलवतात, तहान भागवतात, रत्न उधळतात, मोक्ष देतात..

कधी नाले, गटार यांना आपलं म्हणातात,  मग प्रदूषित होतात, अभिशाप भोगतात.. आटतात.. लुप्त होतात..!

तर कधी झरे, धबधबे, ओहळ यांच्या हाकेला साद देतात, नि गाठू शकतात खूप लांबचा पल्ला..

सागराला जाऊन मिळण्याचा..

त्याच्यात सामावून विलीन होतात..

पुन्हा नव्याने जन्म घेण्यास, वाफ बनून आकाश गाठतात.. 

मेघ बनून वाऱ्यासह प्रवास करतात..

जलधारा बनून पुन्हा बरसतात.. 

पुन्हा नदी बनण्याचा खेळ खेळतात..

हे अखंडीत चक्र निसर्ग जगवते, फुलवते..

म्हणून मला पाणी व्हायचे..

पाणी सप्त नद्यांचे..पण  रौद्ररुप नको..!

त्यात सारे संपते, हे ज्ञात आहे..

पाणी सप्त सागराचे.. पण अतिक्षार नको..!

ते पिण्यास अयोग्य, ज्यास पर्याय नाही..

पाणी पर्जन्याचे, पण अवकाळी नको..!

त्यात वाताहात होते..

हवे विश्वकल्याण.. 

ज्ञानेश्वरांचे पसायदान, कबीरांचे दोहे, विनोबांची गीताई, तुकोबांचे पुष्पक.. 

पासून 

ते सावरकरांचे जयोस्तुते, विवेकानंदाचे विचार, बाबा आमटेंची जनसेवा, अटलजींच्या कविता, कलामांचे अग्निपंख असे खूप काही गायन करणारे.. 

नीर व्हायचे आहे..!

हो मला उदक व्हायचे आहे..!

प्रवास माझा आहे, जमेल तशी तुमची सोबत आणि शुभेच्छा हव्या आहेत..

द्याल ना..!

Sunday, April 19, 2026

अक्षय तृतीया

 

मी वर्गात फळ्यावर काहीतरी लिहून देत होते, तेवढ्यात एका विद्यार्थ्याचा बाळबोध प्रश्न आला, "परवा अक्षय तृतीया आहे, असे आजी सांगत होती, काय असते अक्षय तृतीया..?"

 

आता आली का पंचाईत ?


आजच्या अभ्यासाच्या नियोजनात हा प्रश्न येणार, त्याचे उत्तर काय द्यायचे.. हे लिहिलं कुठे आहे..?


पण शिक्षण हे फक्त पुस्तक आणि नियोजनापुरते मर्यादीत राहिले, तर त्यासाठी शाळा आणि शिक्षकांची गरज आता फारशी राहिले नाही..


स्वतःच पुस्तके वाचून घरच्या घरी शिक्षित होण्यासाठी विद्यार्थी आणि  पालक दोघांकडे आंतरजालाची अनेक पर्याय उपलब्ध आहे.


आपले विद्यार्थी फक्त साक्षर नाही तर सुशिक्षित व्हायला हवे आणि त्यासाठी असे प्रश्न मुलांनी विचारायला हवेत.


नि आपण शिक्षक म्हणून त्याची समर्पक उत्तरे द्यायला हवी, हेच तर आपल्याला आई बाबा, आपली शाळा आणि गेल्या १६ वर्षांच्या अनुभवाने समजावले ना..!


आतून आलेल्या आवाजाने क्षणात साद दिली.


अक्षय तृतीया म्हणजे काय, हे मुलांना नेमके सांगण्यासाठी परिपूर्ण  माहिती हवी, मुलांना म्हणले, "मी शोधते,  तोपर्यंत तुम्ही फळ्यावर दिलेले लिहून घेता का..?" 


मुले लिहू लागली,..


वर्गात स्मार्ट बोर्ड होता, गुगल मय्याला विनवणी केली.


माहितीचा समुद्र समोर आला..

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. 


'अक्षय' म्हणजे ज्याचा कधीही 'क्षय' (ऱ्हास) होत नाही असा, म्हणून या दिवशी केलेले शुभ कार्य, पूजा, दान आणि खरेदी अक्षय फळ देते.


हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, लग्न किंवा कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.


या दिवशी सोने, चांदी, मौल्यवान वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते.


भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी अन्न, वस्त्र किंवा अन्य वस्तूंचे दान करणे अक्षय पुण्य देते, अशी मान्यता आहे..


पौराणिक आधार याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. तसेच, भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आणि श्रीकृष्णाने पांडवांना 'अक्षयपात्र' दिले होते, अशी मान्यता आहे.


धार्मिक विधीत, अनेक ठिकाणी चैत्रगौरीचे विसर्जन आणि सुवासिनींना कैरीची डाळ, पन्हे देऊन हळदीकुंकू साजरे करतात. 


हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी विशेष मानला जातो. 


यातल्या शेवटच्या वाक्याने मन जिंकले, हे मुलांना सार्थ सांगू या..


की कोणत्याही नवीन गोष्टीची, कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.


एक मन म्हणले, खरे तर चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त लागत नाही, फक्त इच्छा लागते.


लगेच दुसऱ्याने त्याला ऐकवले,  अनेकदा मानवातील षड्रिफू ती इच्छा होऊ दे नाहीत, म्हणूनच आपल्या ज्ञानी पूर्वजांनी अशा दिवसांची व्यवस्था करून ठेवली..


मग मी सविस्तर दिन विशेष माहिती थोडक्यात सांगितली आणि मुलांचे सारे लक्ष त्या वाक्यावर आणले, की..


"आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचे आहे, काय बरं कराल..?"


प्रत्येकाच्या मनात दडलेल्या अनेक इच्छा, आकांक्षा, स्वप्न पटापट व्यक्त होऊ लागली..


"खूप मस्त, यातले प्रत्येकाने त्याला जे आवडते, शक्य आहे, ते नक्की सुरू करा, लक्षात राहण्यासाठी कुठेतरी लिहून ठेवा..आईबाबा , मित्र कोणाला तरी, आठवण करण्यासाठी सांगून ठेवा..


पण हे झाले वैयक्तिक, आपला वर्ग आणि हा प्रश्न माझ्या तासाला विचारला म्हणून मराठी भाषा विषयाशी संबंधित काही नवीन सुरू करूया का?"


कोणताही प्रश्न विचारा, मुलांना त्यावर सुचत नाही, असे कधीच होत नाही, कारण विवेकानंद म्हणतात तसे..


मुले अजिबात मातीचा गोळा नाहीत, ती परमेश्वरीय शक्तीने बनवलेली एक रेखीव, अति सुंदर, स्वयंभू कलाकृती आहे, जिला तिच्या कलागुणांनी प्रकट होण्यासाठी वातावरण निर्माण करायचे असते..


त्यामुळे मराठी भाषा वाढवायला काय नवीन करायचे, याची भली मोठी यादी तयार झाली, त्यातले नेमके निवडणे गरजेचे होते..


मुले सांगत असताना एकेक गोष्ट फळ्यावर नोंदवत होते..


"तुम्ही सुचवलेल्या सगळ्या गोष्टी छान आहेत, पण शाळेचा वेळ, अभ्यास बघता, इतकं सगळं एकदम शक्य नाही, आपण यापैकी नक्की जमेल, असे मिळून ठरवू या.."


इयत्ता तिसरीच्या मुलांचे वय, त्यांना उपलब्ध होणारा वेळ, त्यांनी सुचलेल्या गोष्टींची गरज, अशी वेगवेगळी कात्री लागता, अनेक गोष्टी रद्द होत गेल्या..


आणि सर्वांच्या मताने, रोज मराठीमध्ये नवीन (अवांतर) एक पान वाचन करायचे ठरले..


याचे पुढच्या अक्षय तृतीयेपूर्वी मूल्यमापन करायचे, तर कसे करणार, शिक्षक म्हणून शंका डोकावली, तिचे निरसन होण्यासाठी लगेच पर्याय सुचला.


मराठीच्या वहीत शेवटच्या दोन-तीन पानांचा वापर करून, जे वाचले त्यातून एक खूप आवडलेला शब्द लिहायचा, आणि त्या सोबतच कोणते शब्द नाही समजले, तेही लिहायचे, ज्यांचे अर्थ न विसरता मला विचारायचे..


असा शब्द संपत्ती वाढविणारा, अक्षय कलश प्रत्येकाने आपला आपण मिळवायचा असे मुलांनी ठरवले..


मुलांना काम देऊन, स्वतः आराम करणारा शिक्षक, ना नव्याने वाढतो, ना घडतो.. असे मला चालणार नाही..


त्यासाठी आजच्या घटनेतून बोध घेत, यापुढे नित्य अभ्यासक्रमासोबत  तारीख, वार, तिथी याचे अंदाज घ्यायचे..


आपली समृद्ध, विचार आचरणाचे अधिष्ठान असणारी संस्कृती, पुढच्या पिढीला माहीत व्हावी, तिची कालसुसंगत जोड मुलांना सांगता येईल, यासाठी नित्य नियमाने वाचन, लेखन करायचे, हे मनोमन ठरवले..


तीच कास धरत आजचे लेखन पुष्प गुंफले.. योग्य शब्दात सजले का? वाचणाऱ्यांना रुचले का ?


सांगायला विसरू नका..


तुमचा प्रतिसाद, सूचना, बदल सर्वांचे स्वागत, आणि तीच खरी प्रेरणा..


लेखन वाचनाचा हा आपला प्रवास असाच अखंडित राहो याच, अक्षय  तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

Saturday, April 04, 2026

शिक्षण वारी

 

पाऊले चालती, सिपीएसची वाट

       नवं शिक्षणाचा, आहे रम्य थाट || धृ ||


ऐकू येई हाक, चिमुकला तो नाद

         होता पूर्ण तयारी, तेंव्हा देग साद || १ || 


मातृपितृ, गुरुजनांचे, रुजले विचार

       जन कल्याण व्हावे, चिंतन साचार || २ ||


गुणी संचालिका, अभ्यास अफाट

        सदस्य संगती, दिवास्वप्न हे विराट || ३ ||


पालकांची लाभता, भक्कम ही साथ 

      हे भविष्य उद्याचे, हा व्रतस्थचि पथ || ४ ||


असे अग्रस्थानी, बाळचमू हा प्रत्येक

          नित्य प्रकटेल इथे, मग नेतृत्व सुरेख || ५ ||


ऐक हे ईश्वरा, अभिगंधशाली मागे दान 

      घडो वारी शिक्षणाची, मज असो भान || ६ ||






Saturday, March 21, 2026

गुढीपाडवा

 

 गुढीपाडवा हा ना हा फक्त हिंदू सण

ना हे फक्त मराठी नववर्ष..

कारण, अगदी आज कलियुगातही सर्वांच्या सहकार्यासाठी सुशक्ती होऊन आपल्या आराध्य देवाचे दूत असणारे श्री हनुमान, हे आवाहन साऱ्या विश्वाला करीत आहेत..

माझ्या हृदयात वास करणाऱ्या, प्रभू श्रीरामांचा वनवास संपवून स्वगृही वापसीचा गुढी पाडवा विजयोत्सव आहे..

हनुमान सांगतात, त्रेतायुगी श्रीराम अवतरले कारण, ज्याचा संहार आवश्यक होता, तो शत्रू रावण, असूर असला तरी वीर होता..

त्याच्याकडे  हिमालयासारखी अफाट ताकद, सोबत स्वत्यागाची भक्ती नि भल्या भल्या पंडितांना मात देणारी युक्ती होती.. 

लहान मोठ्या दुष्शक्ती हरणासाठी, अनेक सद् विचार नि आचार असणार्‍या, शक्ती सदैव नि सर्वत्र असतात..

पण जेंव्हा आदिदेव शिवशंभूंचा परम प्रिय भक्त, महातपस्वी दशग्रंथी ब्राह्मण, फक्त मी असूर आहे, असा अविचार अग्रस्थानी ठेवतो..

तेच प्रमाण मानून उन्मत्त हो मिळालेल्या वरदानाचा वापर करत, वर्तनाच्या सर्व पायऱ्या सोडून उन्माद माजवतो..

त्यावेळी त्याला विवेक देत, त्याच्यात असणारा पवित्र आत्मा पुन्हा जागृत करण्यासाठी प्रभू श्रीराम अवतरतात..

अति प्रचंड ताकदवान, असूर रावण या शरीर रूपाचा वध, सोबत अनेक अविचारी वृत्तींचा संहार करण्यासाठी फक्त श्रीविष्णु अवतरून पुरणार कसे..?

मग ब्रह्मा नि महेश यांचे सहकार्य मिळून सुशक्तीचा गुणाकार, सुविचारांची बेरीज होते..

त्यांच्याशिवाय स्वर्गलोक कल्पनाही शक्य नाही, मग साऱ्या देवी, देवता, आपल्या शक्ती आणि सामर्थ्यानुसार पृथ्वीवर आल्या..

तेही तिघांच्या आज्ञेनुसार दिलेले रूप धारण करून वजाबाकी, भागाकार अशी कार्यपूर्ती करण्यासाठी..

कारण पुन्हा तेच, असूर धर्म पालन करणारा रावण महातपस्वी, कधी त्याला नीती सांगणारे किंवा मूक साथ देणारे सर्व शक्तिशाली होते..

नि या साऱ्या दुर्वर्तनाला सुवर्तनात परिवर्तित होण्याची आवशकता होती..

हे महामुनी रावणा, जन्माने तू असुर असला, तरी तुझा अंतिम प्रवास माझ्यात एकरूप होण्यासाठी व्हावा लागेल, हे समजावून सांगण्यासाठी श्रीराम अवतार होता..

असा शत्रूवरही प्रेम करत, त्याला साऱ्या वंशासह मोक्ष देणारा प्रभू श्रीराम आपल्या सोबत सदैव हवा, त्याचे रामराज्य हवे असेल तर साऱ्या सृष्टीने गुढी  पाडवा जल्लोषात साजरा करावा लागेल..

आपण स्वतः असमंजस कैकयी होत, नको त्या मंथरेच्या नादी लागून, रोज नव्याने प्रभू रामांना वनवास पाठवतो..

मग आपल्यातल्या त्या असुरी शक्ती नामोहरम करण्यासाठी, राम नामाचा जप नाही, तर महायज्ञ करावा लागेल..

शत्रू महातपस्वी असावा लागतो, पण भक्त कितीही सामान्य चालतो

प्रभू श्रीराम कोणत्याही भक्ताला दुःखात पाहूच शकत नाहीत, भक्ताच्या अज्ञानाने मिळालेला वनवास, हवा तेंव्हा संपवून ते विश्वकल्याणासाठी भक्त सदनी येतात..

फक्त त्यांच्या स्वागतासाठी श्रीराम जय राम जय जय राम अशा नामजपाची गुढी दारोदारी उभी करावी लागेल..

रामप्रभुंच्या स्वागतासाठी नामजपरुपी पताका घराघरावर फडकत्या राहाव्या लागतील..

नि मग सहज आठव येईल, की संत चोखामेळा यांनी शब्दबद्ध केलेल्या अभंगाची..

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥

पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥

खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

याचे सविस्तर निरुपण करावे लागेल..

तोवरी प्रत्येकाने सामान्य भक्त होऊन श्रीरामांच्या स्वागताची अखंड नामजप गुढी नित्यासाठी उभी करावी अशी आग्रह वजा विनंती करते..

यासाठी प्रेरणा देण्याचे विचार देण्याची संत रामदासांना विनंती नि आशीर्वाद देण्याची भक्त हनुमंतास प्रार्थना करते..

तुमच्या माझ्यातले प्रभू श्रीराम जागृत करण्याची सदिच्छा निराकार शक्तीला करून अभंगाचे विवेचन करण्यासाठी पुरेसा अभ्यास, मनन, चिंतन नि विश्रांती घेण्यासाठी थांबते..

विचार आवडले तर अनेकांना सांगावे, त्यावर कृती करत ती प्रेरणा मला देण्यासाठी प्रतिसाद द्यावा..

काही निसटले, चुकले असेल तर सुधारण्यासाठी जरूर माझ्यापर्यंत पोहोचवावे..

गुढी या शब्दाचे बोट धरून स्वर्गाला अनुभवू पाहणारी..

लेखनवेडी..अभिगंधशाली..

Tuesday, February 17, 2026

दुवा

 

मी माझे कुठेतरी जाणीवपूर्वक थांबविलेले, लेखन पुन्हा सुरु करायचे ठरवले..


तसे करताना अर्थात कोणाला विचारले वा सांगितले नाही..


माझे लेखन स्वान्त सुखाय असले तरी त्यावर माझ्याहून अधिक प्रेम, माया करणारे अनेक आहेत..


माझा व्यक्त होण्याचा, रिता होण्याचा  तो सहज, सोपा उपाय आहे, हेही अनेकांना माहीत आहे..


अशा सगळ्यांनी लेखन का बंद केली, याची विचारणा केली, मी माझ्याबाजूने उत्तरे दिली..


पण आपले लेखन इतरांना आनंद, प्रेरणा, स्वशोधन अजून अनेक गोष्टी देणारे असेल तर ते असे थांबवणे योग्य आहे का..?


असा प्रश्न त्रास देत होता, मग पुन्हा एकदा नव्याने लिहायला सुरू करुया..


मी लिहायचे ठरवते, पण मागे फिरून वाचताना, असे लिहिणे माझी क्षमता नाही, तर माझ्या माध्यमातून अज्ञात शक्ती लिहून घेते असे वाटते..


म्हणूनच मग मला आवडते यासाठी लिहिण्यापेक्षा अनेकांना वाचायला आवडते यासाठी लिहू या..


असे नव्याने ठरवले, मग  त्यासाठी संकल्प केला..


त्याला उचित वेळ मराठी दिन साजरा होतो, तो फेब्रुवारी महिना निवडला..


कारण मराठी भाषा माझ्यासाठी प्रेम, जिव्हाळा आणि हातखंडा आहे..


माझ्यासारखेच प्रेम मराठी भाषेवर अनेकांनी करावे या उद्देशाने हा लेखन प्रपंच सुरू केला..


त्यासाठी अर्थात अभ्यास, वाचन करावे लागणार होते..


हे मी करणार आहे, माझ्यासोबत तुम्ही सहभागी व्हा, असा विनंती, आग्रह करणारा संदेश पाठवला आणि त्यासोबत लेखनाचा पहिला आंतरजाल दुवा पाठवला (लिंक)..

दुवा..

इथे हा हिंदी मधला शब्द घेतला, तर प्रार्थना, विनवणी, आशीर्वाद या अर्थाने तोही योग्यच आहे..


पण मला मराठीत सांगायचे आहे..


ज्याचे पर्यायी शब्द जोडणी, संबंध, नात, सांधा असे आहेत..


माझे लेखन आणि रसिक वाचक यांना जोडणारा, सांधणारा, नवे नाते तयार करणारा असा तो दुवा, किती चपखल शब्द आहे ना ..? इंग्रजी लिंक या शब्दासाठी..!


आज हा विषय घ्यायचे कारण की व्यापार व्यवस्थापन आपल्या नकळत आपल्यावर अनेक प्रकारचे नवे खर्च लादत असतात..


कालचे पुष्प पाठवताना ब्रॉडकास्ट लिस्टची मोफत क्षमता संपली आहे, असा संदेश मिळाला..


अनेक गटांवर मला गेले, अनेक दिवस फक्त मीच संदेश पाठवत आहे असे जाणवले..


आणि माझ्या एका मित्राची आठवण झाली, ज्याचे म्हणणे आहे की ब्लॉगवर लिहिल्यावर प्रत्येक वेळी नव्याने असे दुवे (लिंक) पाठवण्याची गरज नसते..


ज्याला ते आवडतेे, त्याने सबस्क्राईब केले की आंतरजाल स्वतःहून आपले काम चोख करते..


तंत्रज्ञानात खूप तज्ञ असणाऱ्या त्या मित्राचे अगदी योग्य असले तरीपण शेवटी ते यांत्रिक काम, त्यास भावनेचा ओलावा कसा असणार..?


माझ्यासाठी ती लिंक नाही दुवा आहे..


माझ्या वाचकांना माझ्याशी जोडणारा, जे दैनंदिन कामात खूप व्यस्त असतात..


आंतरजाल एकदा आठवण करून सोडून देते, मी पाठवलेला दुवा थोडा रिकामा वेळ मिळाला की खुणावतो..


हा दुवा सहज पुढे पाठवता येतो, त्यातून नवी नाती तयार होतात, नवे रसिक वाचक लाभतात..


असे असले तरी परवा एका चित्रपटात असे अनेक संख्यात्मक जास्तीच्या माहितीचे व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान असा प्रकल्प पाहिला..


आणि ठराविक काळानंतर सगळे संदेश आपोआप पुसले जावे, हा कायप्पाचा गुण (व्हॉटस् फिचर्स ) आठवला..


शिवाय कालच्या संदेशात विशिष्ट उद्देशाने नवा गट (व्हॉटस् अँप गृप) तयार करा असे सुचविले होते..


म्हणले चला आज हाच विषय मांडूया..


नुसता माझ्या वाचन प्रेमी रसिकांचा नवा गृप बनवते आहे, हा त्याचा दुवा इतके कोरडे सांगण्यापेक्षा, यात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करू या, हे ठरवून आजचे लेखन केले आहे..


लिंक या इंग्रजी शब्दाची भावनिक मांडणी करण्याचा मोह आवरला नाही इतकेच..


मांडलेले आवडेल पटले असेल,  थोडक्यात नसणारे माझे लेखन वाचायचे असेल.. तर माझ्या गटात जरूर सहभागी व्हा, इतरांनाही हा दुवा नक्की पाठवा..


https://chat.whatsapp.com/FfXePIjrjjPLNrp4LfsLg7?mode=gi_c


Monday, February 16, 2026

बाबा

मराठीत व्याकरण शिकवताना, बाबा या शब्दासाठी कितीतरी समानार्थी शब्द आहेत..

जन्मदाते, जनक, पिता, तात, तीर्थरूप, बाप, वडील..

शब्दकोश अर्थ 

एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष..

वडिलांना उद्देशून वापरायचा आदरार्थी बहुवचन किंवा आता एकवचन..

वयस्कर व्यक्ती आदरसूचक संबोधन..

साधूसंत इत्यादींसाठी आदरार्थी संबोधन..


जेंव्हा मला माझ्या बाबांविषयी कोणी विचारते, तेंव्हा ही यादी अगदीच थिटी वाटते..


माझ्या आजवरच्या प्रवासात बाबा हा फक्त संबोधन, तेही एक आणि एकाच व्यक्तीसाठी अनुभवलेला शब्द आहे..


ज्याला दुसऱ्या कोणत्याही, एका शब्दात व्यक्त करताच येणार नाही..


माझे बाबा म्हणजे कोण हे सांगणारा दुसरा शब्द व्यंकटेश एकनाथ पांडे, राहणार - अ ६ प्रबोधन गृहरचना सेक्टर २६ निगडी पुणे ४११०४४ (पत्ता हवा कारण एक नाव, मधले नाव आणि आडनाव समान असणाऱ्या अजून व्यक्ती असू शकतात असा एक अनुभव ऐकला आहे)


तर व्यंकटेश एकनाथ पांडे हाच पर्यायी शब्द..


एका शब्दात सांगावे असे, कुणाचेही बाबा नसतात..

माझे तर नव्हतेच..


माझ्यासाठी ते आरसा होते, मला त्यांच्यात मी सापडत जावे असे कितीदा अनुभवले..


मी त्यांच्यासारखी दिसते का..? यापेक्षा गुणांनी मी त्यांच्यासारखी आहे का, हे अधिक महत्त्वाचे वाटते..


तर हो, मी खूप त्यांच्यासारखी आहे..


ते कसे होते, हे सांगणारे हे चित्र मी तीन वर्षांपूर्वी बनवले होते..

उत्तम गुणांची यादी संपेल, पण  त्यापलिकडे जाऊन बाबांचा नवीनच गुण अनुभवलेले अनेक भेटतील..

असे गुण माझ्यात यायला हवे, यासाठी मी खूप धडपड करत होते, असते आणि राहील..


एकच सल आहे की हे सारे त्यांनी वाचावे, त्यावर मस्त प्रतिसाद द्यावा, जवळ बोलावून डोक्यावर हात ठेवावा यासाठी ते शरीराने आज नाहीत..


पण.. पण.. पण..


माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुःख, आनंद, यश, अपयश काहीही असले तरी आशीर्वाद, कृपा बनून ते नेहमी असतील ही खात्री आहे..


चुकत असेल, तर काहीतरी संकेत नक्की देतील, आनंदात पाय जमिनीवर ठेण्यासाठी मदत करतील..


कारण बाबा माझ्यात अनेक प्रकारे रुजले आहेत..


प्रसंग, परिस्थिती यांच्या गरजेनुसार ते नित्य नव्याने मला, त्यांच्या जवळ असणाऱ्या आप्तजनांना आणि इतर अनेक, सर्वांना भेटत राहतील..


आता असे वाटेल की आज या लेखनाचा काय प्रपंच..


तर १६ फेब्रुवारी १९५० हा त्यांचा वाढदिवस..


१६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्यांनी स्वतःहून ठरवले, की व्यंकटेश एकनाथ पांडे म्हणून हा जन्म यश अपयश, सुख दुःख, सामाजिक कर्तव्य-सेवा, प्रवास एक ना अनेक प्रकारे उत्तम अनुभवला आहे, आता थांबू या..


आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे ४ मार्च २०२३ ला त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला..


त्यांची ही स्वेच्छा समजायला आणि स्वीकारायला मला पुरी तीन वर्षे लागली..

आज बाबांची पंचाहत्तरी आहे, 


त्याबद्दल काव्य पंक्तीत सांगते,


माझ्या बाबांची तुम्हाला सांगू काय  गोष्ट..

येथवर येण्यासाठी त्यांनी केले किती कष्ट.. 


असो प्रश्न, समस्या, अडचणी कितीही..

यांचा चेहरा असणार, हसराच तरीही..


भरल्या गोकुळासम घर आमचे असते..

कोणत्याही गोष्टींची तिथे कमी नसते..


आम्हा नातलगांना जोडणारा, बाबा धागा घट्ट..

झालो मोठे कितीही, तरी पुरवतात आमचे हट्ट..


आईसोबत सांभाळतात, संसाराचा गाडा..

मिळत राहतो सर्वांनाच, नित्य नवा धडा..


आर्थिक गणिते सदा, अचूक त्यांनी  सांभाळली..

समाजातही आदर, मान, प्रतिष्ठा कमावली..


साजरी करण्या आज, बाबांची पंच्याहत्तरी..

किती शोधल तरी, शब्दसुमने पडतात अपुरी.. 


बाबा, 

तुमच्या साऱ्या इच्छांसाठी, परमेश्वर असो दक्ष..

लक्ष चौऱ्याऐंशी फेरे संपून, आता लाभो तुम्हा मोक्ष..

आता लाभो तुम्हा मोक्ष..!


शुभं भवतु.. !



Wednesday, February 11, 2026

वृत्तीघडण


आज दास नवमी, आजची लेखन सेवा.. रामदासांच्या चरणी 🙏🏻🙏🏻

ज्यांचा राष्ट्रसंत म्हणून गौरव झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून जे सर्वज्ञात आहेत.. 

सावधान हे शब्द ऐकताच बोहल्यावरून पाय उतार केला, पण संसार कसा करावा, हे ज्यांनी मांडले अशा थोर व्यक्ती विषयी लिहिण्याची माझी नक्कीच पात्रता नाही..

पण त्यांच्या दासबोध ग्रंथातून निवडक वचनांची संकलित १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे ही लहानपणी शाळेत असताना सक्तीने पाठ केली..

पुढे जाऊन त्यातील लयबद्धता, एकत्रित म्हणण्याची गंमत यामुळे अधिक आवडू लागली..

जेंव्हा त्यामागील अर्थ उमजू लागला, तेंव्हा नकळत आपली कृतीही अशीच असायला हवी, असे वाटून तसा प्रयत्न होऊ लागला..

मग या प्रयत्नांची सवय होऊन, ती वृत्ती आणि मग उत्तम वागण्याची तत्त्वे बनली..

आज हे सांगण्याचे कारण म्हणजे बहुतांश शाळा या, फक्त पुस्तकी अभ्यासक्रमामागे धावताना दिसतात..

आपल्या संस्कृतीची पाळेमुळे कुठे आहेत, हे अचूक हेरून त्यावर घाव घालणारे इंग्रज १९४७ ला भारतातून निघून गेले..

पण त्यांनी शिक्षणाची केलेली वाताहात आजही तशीच आहे..

आजची मुले भोग विलासी, स्वतःमधे  रमणारी, अंधानुकरण करणारी बनली आहेत, हे म्हणताना शिक्षक, पालक म्हणून आपण सजग आहोत का..?

उत्तम फळे देणारा कल्पवृक्ष हवा, तर तसे बीज आपण पेरत आहोत का..?

जे बीज वाढायला, तशी कृती आपल्या आई, वडील, शिक्षक यांच्या कृतीत त्यांना बघायला मिळते आहे का..?

असे अनेक का जेंव्हा उभे राहतात, तेंव्हा मी अशी का नाही बनले, हा उलटा प्रवास केला की आठवते..

घर, शाळा दोन्ही ठिकाणी असे श्लोक, स्तोत्र यांचे नित्य पठण व्हायचे, त्यातूनच एक विचारधारा तयार होत गेली.. 

तशीच कृती आईबाबा सहज करतात, त्याचे अनन्वित फायदे आणि आशीर्वाद असतात, हे अनुभवातून समजल्याने, एक चांगला माणूस होण्यासाठी नित्य धडपड चालू असते..

मुद्दाम चालू असते असे म्हटले, कारण कलियुगात सूर आणि असूर एकाच देहात राहणार हे कटुसत्य आहे..

आणि नरदेहाचे षडरिपू यामुळे अनावधानाने चूक होऊच शकते..

पण होऊ नये हा प्रयत्न असतो, आणि त्यासाठी सद्वैव आशीर्वाद देणारी ही समर्थांची उत्तम पुरुष लक्षणे, तुम्ही वाचावी, समजून घ्यावीत..

जमल्यास त्यानुसार मार्गक्रम करावा असे सुचवते..

शाळा मराठी माझी.. शाळा मराठी..

 या सध्या सगळ्यांना मोहित करणाऱ्या गीताचे शब्द थोडे अधिक अर्थपूर्ण करत..

शाळा सद् विचारी माझी.. शाळा सद् विचारी ..

असे अभिमानाने म्हणत, ज्ञानाची भूक लागावी हा विचार देणाऱ्या माझ्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, आणि ही वचने शाब्दिक नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीत आणता येतात हे दाखवणारे माझे आई बाबा, अनेक शिक्षक यांना मनापासून साष्टांग प्रणाम करते..

असे शिक्षण सर्वांना लाभो, ही प्रार्थना करते..


मी शिकलेली १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे..


आपण यथेच्छ जेवणे, उरले ते अन्न वाटणे |

परंतु वाया दवडणे, हा धर्म नोहे || १ || 


तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचि ज्ञान जनास सांगावे |

तरतेने बुडो नेदावे, बुडतयासि || २ ||


उत्तम गुण स्वये घ्यावे, तेची बहुतास सांगावे |

वर्तल्यावीण बोलावे, ते शब्द मिथ्या || ३||


स्नानसंध्या देवार्चन,एकाग्र करावे जपध्यान |

हरिकथा निरूपण, केले पाहिजे || ४||


शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे |

उणे पडो नेदावे, कोणी येकांसी ||५ ||


आडले जा कसले जाणावे, यथानुशक्ती कामास यावे |

मृदूवचने बोलत जावे, कोणी येकांसी || ६||


दुसऱ्याच्या दुःख दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे |

प्राणीमात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे || ७||


बहुतांंचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे |

आपल्या परीस व्हावे, पारखे जन ||८ ||


दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारचि वर्तावे |

लोकांस परिक्षीत जावे, नाना प्रकारे|| ९||


 नेमकेच बोलावे, तत्काळचि प्रतिवचन द्यावे |

कदापि रागास न यावे, क्षमारूपे || १०||


 आळस अवघाची दवडावा, यत्न उदंडची करावा |

शब्द मत्सर न करावा कोणी येकांचा || ११||


उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा |

सावधपणे करीत जावा, संसार आपला || १२||


मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तिसी सादर व्हावे |

मरून कीर्तीस उरावे, येणे प्रकारे || १३||


ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष |

जयाच्या भजनी जगदीश, तृप्त होय || १४||


 उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला |

तोचि एक जाणावा खरा, भू-मंडळी || १५||


 पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते |

तरी मग कर्कश बोलावे, ते काय निमित्ते || १६||


आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांस सुखी करावे |

परंतु कष्टी करावे, ही राक्षसी क्रिया || १७||


जो उत्तम गुणी शोभला, तोचि महापुरुष भला |

कित्येक लोग तयाला, शोधीत फिरती || १८||


याचे अनुभव आधारीत, गोष्टीरूप अर्थ विश्लेषण करायला जरूर आवडेल, पण ते अर्थात समोरासमोर..


समर्थ रामदास स्वामींच्या वचनांची शिदोरी जशी मला लाभली, तशी सर्वांना लाभो हीच श्री राम चरणी प्रार्थना करते आणि थांबते..