Tuesday, February 10, 2026

उठा उठा चिऊताई

रोज पानभर लिहायचे असे ठरवले, तरी नेमके काय हे निश्चित नसते..

पण जिथे हे सारे माझे नाही, तर ही लेखनसेवा माझ्या माध्यमातून कोणती तरी शक्ती करून घेते असे मला वाटते..

तेंव्हा तिच्या मार्फत नकळत दिनक्रमात नवे विषय मिळतात..

असेच काहीसे घडले..

या आधीच्या एका लेखात कविता रसग्रहण या बद्दल मांडले, तशीच अजून एक नवी गंमत झाली आणि हा नवा विषय मिळाला..

झाले असे की, २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी, कवी कुसुमाग्रज यांची एक कविता तिसरीतील विद्यार्थ्याने म्हणावी असे ठरवले..

त्यासाठी त्याची तयारी करून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा करत होते..

विद्यार्थी प्राथमिक वर्गात असल्याने वयोगटाला आवडेल, समजेल अशी कविता निवडली..

उठा उठा चिऊताई..  सारीकडे उजाडले..

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

कवितेचा छान ध्वनी चित्ररूपी  दुवा ( युट्यूब वरील ॲनिमेटेड गाण्याची लिंक) पालकांना पाठवली..

पण कदाचित, रिॲलिटी शोच्या युगात माझ्या चिमुकल्या मित्रांनी त्यांच्या वयानुसार काही सादर करणे पालक, समाज यांना आवडत नाही किंवा अपरिपक्व वाटते..

पालकांकडून आम्ही कणा कविता तयार करून घेऊ का..?, तुम्ही पाठवलेली फारच बाळबोध वाटते आहे, असा नम्र प्रस्ताव आला..

यावर सर्वप्रथम त्यांच्या नम्र विनवणीचे कौतुक वाटले..

तोच धागा पकडून म्हटले, सांगायचा एक मुद्दा असा आहे की कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे , ती पहिली ते तिसरीची म्हणजे लहान वयोगटाची मुले आहेत, त्यानुसार अगदीच छान आहे चिऊताईची कविता..

कणा कविता अनेकदा मोठ्यांनाही समजत नाही, मग उगाच सादरीकरण भारी होते, म्हणून तीच हवी हा अट्टाहास कशाला..?

याउलट वयानुरूप गाणी, गोष्टी समजून, उमजून अधिक छान मांडता येतात..

आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी तुम्हाला पाठवलेला दुवा ( गाण्याची ॲनिमेटेड लिंक) यामुळे चिऊताईची कविता जरी छोट्यांसाठीची वाटली, तरी त्यातल्या प्रत्येक शब्दामागे असणारा भावार्थ खूप मोठा आणि गहन आहे..

बघा हं, मला उमजला गर्भित अर्थ मांडते..

उठा उठा चिऊताई .. सारीकडे उजाडले 

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

सूर्योदय होऊन न उठणारी चिऊताई निसर्गात सापडणे केवळ अशक्य..

ती सापडेल ती मानवी विश्वात..

मग इथे चिऊ.. चिमणी असेल किंवा चिमणा..

त्यांच्या न उठण्याचे कारण काय  बरं असेल..?

कंटाळा, आळस, हार की निराशा..?

थोडक्यात नित्याच्या भाषेत सांगायचे ताण तणाव.. डिप्रेशन..?

अशा मानसिक, भावनिक आंदोलनांना सामोरी जाणारी ही चिऊताई एक तर या त्रासाच्या ग्लानीत आहे किंवा झोपेचे सोंग घेत आहे..

सोनेरी हे दूत आले, घरट्याच्या दारापाशी,

डोळ्यांवर झोप कशी, अजूनही, अजूनही..?

आता लहान मुलांच्या कवितेत सोनेरी दूत म्हणजे रवी किरण, सूर्यप्रकाश..

पण अधिक खोलवर विचार केल्यास..

तणावाच्या अंधाराला दूर सारण्यासाठी मदत करणारे, पहिले स्वतःचे मन, नंतर नातलग, मित्रमंडळी, उत्तम वाचन, श्रवण आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत हे सारे सोनेरी दूत नाहीत का..?

इतके सगळे आले तरी चिऊताईची झोप संपत कशी नाही..?

लगबग पाखरे ही, गात गात गोड गाणे,

टिपतात बघा दाणे, चोहीकडे, चोहीकडे..!

इथे चिऊताईला नकळत सुचविले आहे, की तू स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरीही त्याने इतरांना फार काही फरक पडणार नाही, त्याचे दिनक्रम चालू आहेत आणि राहतील, त्रासात फक्त तू आहेस..

झोपलेल्या अशा तुम्ही, आणायाचे मग कोणी,

बाळासाठी चारापाणी, चिमुकल्या, चिमुकल्या..?

चिऊताईला दिलेली ही हाक, तिच्या सोंगरुपी झोपेवर अंतिम वार आहे..

तू स्वतःचे प्रश्न, समस्या, दुःख इतकं मोठं करून बसली आहेस, की तुला तुझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, प्रेमी आप्तजन या सगळ्याचा विसर पडला आहे, तुझ्या या वागण्याने त्यांना होणारा त्रास याला तू आणि तूच कारणीभूत आहेस..

समेला येताना..

बाळाचे घेता नांव, जागी झाली चिऊताई,

उडोनिया दूर जाई, भूर भूर, भूर भूर..!

आणि आधी म्हणल्याप्रमाणे वार शेवटचा असला तरी, तो नेमका वर्मी बसल्याने, दुःख.. चिंता.. अपयश एक ना अनेक प्रश्न समोर उभे ठाकले, तरी त्या साऱ्यांना चोख उत्तर देण्याची प्रेरणा चिऊताईला मिळाली आहे..

आणि सगळ्या गोष्टींवर आपली आपण उत्तरे शोधायला, ती घरट्यातून बाहेर पडली आहे..

आता सांगा बरे, वरवर सहज, सोपी शब्द रचना असणारी ही बाल कविता वेगळ्या प्रकारे समजून घेतली, तर मानवी जीवनाची मोठी लढाई सुचवून जाते की नाही..?

अर्थात हे सारे मला भाषेच्या उण्यापुऱ्या ज्ञानाने झालेले आकलन, अधिक अभ्यासू मंडळी यात नक्कीच भर टाकू शकतील..

पण यातली  गंमत इथे संपलेली नाही..

त्यानंतर  इयत्ता दुसरीच्या वर्गात दैनंदिन अभ्यास करून दहा मिनिटे वेळ शिल्लक होता..

अगदी सहज मी हे गाणे मधे मधे थांबवून नव्याने येणारे शब्द, जसे की  सोनेरी किरण, पाखरे, चहुकडे, लगबग, टिपणे इ. त्यांचे अर्थ, संदर्भ सांगत मुलांना दाखवले..

मुलांनी गाण्यासोबत गुणगुणत, डोलत मनसोक्त आनंद  घेतला,  त्यानंतर मी उगाच गमतीशीर प्रश्न विचारला..

ही चिऊताई कोण आहे माहिती आहे का.. ?

माझ्यासाठी झोपलेली चिऊताई म्हणजे तुम्ही सगळे आहात..!

जी शिक्षक शिकवत असताना, कुठेतरी वेगळ्याच गोष्टी करणारी झोप काढतात (पेन्सिलीला टोक कर, गप्पा मार, वेगळ्या वही पुस्तकात..वेगळेच काहीतरी कर..) आणि जसे शिक्षक स्टिकर स्टार देईल असे आमिष दाखवतात, तसे सगळ्यातून जागे होत तुम्ही चालू गोष्टींकडे लक्ष देता..

आई बाबा सांगतात की रोज अभ्यास कर, तेंव्हा कंटाळा, आळस, दुर्लक्ष अशी झोप घेणारे तुम्ही परीक्षा आली असे म्हणाल्या बरोबर जागे होता.. 

आहात ना मग तुम्ही म्हणजे ही चिऊताई..उगाच झोपेचे सोंग घेणारी..?

आश्चर्याची गोष्ट इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या, मराठी भाषेचे फार कमी शब्द भांडार असणाऱ्या माझ्या या बालमित्रांना मी जे बोलत होते ते सारं नुसतं समजत नव्हते, तर मनापासून पटत होते आणि त्याची गंमत वाटत होती, मनापासून हसत नाही नाही आम्ही असे नाही करत अशी दाद त्यांच्याकडून मिळत होती..

असे हे जेष्ठ, श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण मला एक वेगळा आनंद आणि उर्जा देऊन गेले..

त्यात तुम्हाला सामील करावे असे वाटले म्हणून आज हा लेखनाचा घाट घातला..

जमला का सांगायला विसरू नका..

Sunday, February 08, 2026

प्रकट दिन

 


देव असतो का..? कुठे असतो..? कसा दिसतो..? अमूर्त की मूर्त..? मूर्त असेल तर, त्यातल्या कोणत्या मूर्त स्वरूपाची भक्ती करायची.. ? का करायची..? कशी, कधी करायची..?


असे कोणतेही प्रश्न ना कधी पडले, ना यापुढे पडतील..!


चराचरातील चल वा अचल, प्रत्येक बाब ही एका शक्तीची निर्मिती आहे..


आणि आपल्या निर्मितीचा सांभाळ, प्रगती या साऱ्याची जबाबदारी ती शक्ती प्रेमाने करते, ही भावनाच  किती सुंदर आहे ना..!


अशा शक्तीकडे आपली सुख-दुःख, यश-अपयश ही सारी ओझी सोपवली की आपण किती निश्चिंत होऊ शकतो, हा कुणी सांगण्याचा नाही, तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे..


या अनुभवांना अनुभूती म्हणतात..


अमूर्त, अज्ञात शक्तीचे खऱ्या स्वरूपाचे दर्शन व्हावे, जसे श्रीकृष्णाने यशोदा मातेला, अर्जुनाला दिले..


गुरु रामकृष्ण परमहंसांचे मार्गदर्शन नि स्वतः पराकोटीची ध्यान धारणा केल्याने स्वामी विवेकानंदांनी अनुभवले..


तसे आपल्या सारख्या अति सामान्य मानवास होणे, केवळ अशक्यच..


पण जर आपण वेद, उपनिषद, भगवद्गीता यात सांगितल्याप्रमाणे सत्कर्म, सद्वर्तन, सहृदयता या मार्गाने चाललो, तर त्याचे फळ म्हणून शक्तीची प्रचिती नक्की मिळते, हा स्वानुभव आहे..


कधीही न सुटू शकणाऱ्या समस्या सहज संपतात..


कठीण परिस्थितीत तन, मन, धन सर्व प्रकारे सहाय्य लाभते..


मग विषय पुन्हा मूळ पदावर.. की ही शक्ती कोणत्या मूर्त रूपात बघायची, पुजायची..


अंदाजे सहस्र कोटी संख्या, सोबत काळानुकाळ सांगूनही संपणार नाहीत अशा रंजक कथा यांनी समृद्ध असलेल्या आपल्या आर्य जन्मभूमीच्या संस्कृतीत खूप सारी भव्य, दिव्य सगुण, मोहून टाकणारी मूर्त रूपे आहे..


तुम्ही त्यातल्या कोणत्याही एक वा प्रसंगानुरूप अनेकांची निवड करू शकता..


त्याने काहीच फरक पडत नाही, कारण निस्वार्थ प्रेम, भक्ती, साधना इतकीच अपेक्षा असणारी ही मातृ पितृ स्वरूप शक्ती, तुम्ही निवडलेल्या प्रत्येक मूर्त स्वरूपात वास करते..


फक्त तुमची भक्ती निस्वार्थ आणि हाक आर्त असायला हवी..


आधी म्हटल्याप्रमाणे, शक्ती आहे, नि तिच्या अस्तित्वाची प्रचिती वेळोवेळी अनुभवली आहे.. 


त्यामुळे प्रसंगानुरूप ती शक्ती विविध रुपात बघायला आवडते..


एकादशीला विठोबा संगती संत मंडळी, महाशिवरात्रीला शंकर, गोकुळाष्टमीला बाळकृष्ण, गणेशोत्सवात लाडका बाप्पा, नवरात्रीत रोज नव्या रूपातली देवी, कुळाचार करताना कुलदैवत इथपासून ते अनारोग्य रोखणारी वेशीवरची मरीआई ही देखील प्रेमाची आहे..


पण..


जेंव्हा सण नाही, उत्सव नाही, रोजमितीला ज्यांचा नामजप नेहमी आनंद, मनःशांती देतो, समस्या निराकरण करण्यासाठी लढण्याचे बळ देतो, यशात पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी देतो, सुख द्विगुणित करतो, थोडक्यात सांगायचे तर..


किती वर्णू सांग माझ्या, दैवताचे गोडवे..

नाम स्मरता नुसते, बळ हत्तींचे संचारे..


ते दैवत, गुरुपद म्हणजे, शेगाव निवासी श्री गजानन महाराज.. 🙏🏻🙏🏻


आता ओघाने येणारा प्रश्न, ही निवड केली कशी, कधी, कोणी..?


त्याला मिळणारे पटकन उत्तर..


पूर्वसंचित..


लहानपणी आईबाबांसोबत वर्षातून एकदा शेगाव वारी असायची, तेंव्हापासून त्या परिसरातील उर्जा, शांतता, स्वस्थता अनुभवली आहे..


अनेक वेळा तोबा गर्दी असूनही काही तासच दर्शनासाठी लागत, त्यावेळी तिथे असणाऱ्या जमावाला ना घाई असायची, ना त्रस्तता, अखंड नामजप करत, वेळ अगदी सहज निघून जायचा, लहान वयात त्या रांगेत बागडायला मजा यायची..


सिंधू आजी म्हणजे बाबांची आई तिच्याबरोबर घराजवळ असल्या महाराजांच्या मंदिरात अनेकदा सकाळ, संध्याकाळ आरतीसाठी जायचे, तो अनुभव तर अजूनच वेगळा, टाळ वाजवणारे ते चिमुकले हात, त्या नादमय वातावरणात रंगून मनसोक्त नाचणाऱ्या त्या बालपणीची आठवण आजही खूप आनंद, ताकद देते..


अशाप्रकारे लहान वयात या गुरूची, दैवताची तोंड ओळख झाली..


मंदिरात जाणे, जप करणे याचे आधी फक्त अनुकरण केले, त्याचे सवयीत रूपांतर कधी झाले कळले देखील नाही..


शेगाव आणि घराजवळील मंदिर या दोन्ही ठिकाणी नियमित जाणे होते, आहे आणि राहील, तिथल्या अनेक आठवणी, घटना या आजवरच्या प्रवासाला नवीन वाट, यश, आधार देणाऱ्या आहेत..


तिथले महाराजांचे (अमूर्त शक्तीचे) वास्तव्य नक्की अनुभवास येते, फक्त तशी हाक हृदयातून आली पाहिजे..


या पलिकडे जाऊन इतर शहरात जिथे गजानन महाराजांची मंदिरे आहेत, जसे की चिंचवड, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर इ. त्या सर्व वास्तू देखील, अस्वस्थ मनाला स्वस्थ करणाऱ्या, अशांत जीवाला शांतता देणाऱ्या, थकलेल्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत..


याचे कारण समान व्यवस्थापन व्यवस्था, महाराजांची सर्व भक्त मंडळी एका वेगळ्या नियोजनाने एकमेकांशी जोडलेली आहेत..


नव्याने कुठेही मंदीर स्थापन झाले की त्यांना या व्यवस्थेचा भाग व्हावे लागते, समान नियमावली, पद्धती राबवावी लागते..


ज्यात दर्शन वा इतर कोणत्याही बाबतीत आर्थिक गणिते (दर्शन पास ) कोणालाही प्राधान्य देत नाहीत..


प्रत्येक भक्ताचा संत परंपरेनुसार आदर करणे, सूचना देताना प्रथम माऊली ही हाक देणे, नियमांचे पालन करण्यासाठी प्रेमाने सुचवणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत..


असे वाटेल की लहान मंदिरांच्या जागी हे करणे सोपे असेल, तर हा अनुभव एकदा शेगावी जाऊन नक्की घ्या..


आजच्या आंतरजाल युगात यां विषयीची माहिती गुगलवर जरूर बघा..


फक्त भारतीयच नाही तर अनेक परदेशी व्यवस्थापन शिकविणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांना उत्तम व्यवस्थापन कसे असते, कोणताही आर्थिक मोबदला मिळत नसून, सेवा करण्याची इच्छा, व्रत, नवस यासाठी महाराजांची भक्त मंडळी अनेक कामे सुनियोजित, विना सक्ती, ना सूचना, ना दुराग्रह तरीही मनापासून शांतता, स्वस्थता, आदर भावनेने करत असतात..


मंदीर परिसरात रांगेत जा उगाच गर्दी करू नका, भोजनगृहात पोटभर खा पण टाकू नका, स्वच्छता राखा, तेथील अन्न वाढप, त्यानंतर उष्टी ताटे आवरून त्यांची स्वच्छता, शिवाय भक्त निवास व्यवस्था.. किती आणि काय काय कामे चालू असतात पण कुठेही आरडाओरडा नाही, की गोंधळ नाही..


देणगी स्वीकारण्याची पण वेगळीच पद्धती, त्यातही सहजता, शिस्त.. 


जमा झालेल्या अर्थाचा विविध सामाजिक कामांसाठी वापर..


अजूनही अनेक गोष्टी सांगता येतील, पण त्यापेक्षा त्याचा अनुभव घ्यावा हेच अधिक योग्य वाटते..


चांगले विचार, उन्नतीची दिशा, भक्ती मार्ग दाखविण्यासाठी अमूर्त शक्ती गजानन महाराजांच्या रूपात शेगावात माघ वद्य सप्तमी शके १८०० मध्ये प्रकट झाली..


आज ती तिथी म्हणजेच प्रकट दिन..


तर सांगायचा मुद्दा असा की माझ्यासारखी अति सामान्य व्यक्ती, मानवी जन्म अनुभवताना, माझा मीपणा संपून जावा, नि विश्वाचा पसारा वाहणाऱ्या शक्तीने मला आपलेसे करावे..


या माझ्या मानवी देहाद्वारे सदैव सत्कर्म होण्याचे दान पदरी टाकावे यासाठी ज्यांना गुरुस्थान दिले, त्या गजानन महाराजांच्या चरणी आजची लेखनसेवा..


मी आणि माझे कुटुंब यांच्यावर जशी महाराजांची सदैव कृपा होते, तशीच तुम्हावरही होवो हीच सदिच्छा..


जय गजानन..🙏🏻

Friday, February 06, 2026

रसग्रहण

भाषा शिकताना फार लहान वयात कवितेच्या ओळी सोदाहरण स्पष्ट करा, रसग्रहण लिहा, भावार्थ सांगा.. अशा प्रश्नांची ओळख हीच अनेकदा मुलांना कविता, गाणी या साहित्य प्रकारापासून दूर नेतात कदाचित..

परवा गप्पा मारताना असाच विषय झाला, गंधार संभाजी महाराजांच्या एका महाकाव्याविषयी सांगत होता, आणि ते ऐकणारी माझी मैत्रिण पटकन म्हणाली, मला नाही झेपत कविता.. 

लहानपणी शाळेत कवीला काय म्हणायचे, असे बाईंनी विचारल्यावर मी म्हणाले होते की मी तर कवींना भेटले नाही, मला कसे माहित असेल त्यांना काय म्हणायचे आहे..इति मैत्रिण..

एकीकडे मला तिच्या या सहज प्रतिसादावर मनापासून हसू आले, आणि दुसरीकडे शिक्षक कसे चुकीच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापनाचे प्रश्न प्रकार यामुळे नकळत त्या विषयाची नावड, भीती निर्माण करण्यास कारणीभूत होतो हे जाणवले..

पण सगळेच शिक्षक किंवा त्यांच्या विषय शिकवण्याच्या पद्धती अशा सदोष नसतात हे सांगणारा आजचा अनुभव..

विषय - कविता रसग्रहण... कविता - प्रेम कर भिल्लासारखं

कवी - कुसुमाग्रज ... रसग्रहण शिकविणारे शिक्षक - जोर्वेकर सर

शाळेतून कॉलेज असा प्रवास सुरू झाला, तो पहिला आठवडा.. 

तास ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स (ओसी)..

शिकविणारे जोर्वेकर सर वर्गात आले आणि म्हणाले की सर्वत्र गुलाबी रंग दिसणाऱ्या तुम्हा सर्वांचे स्वागत, पण या रंगाला, मी एक दिशा देणार आहे..

माझा ओसी विषय मी वर्षभर मनापासून शिकवणार आहेच, पण आज मराठी साहित्यातील एक दैवत, कवी कुसुमाग्रज यांच्या एका प्रेम कवितेची खास मांडणी तुमच्यासाठी करणार आहे.. (अर्थात सर त्यांच्या विषयात तितकेच पारंगत हे वेगळे सांगायला नको)

मग सरांनी सुरुवात केली, कवितेची एकेक ओळ, आवाजाचे अचूक चढउतार करत अशी काही सादर केली, की हे सारं कधी संपूच नये, त्यांनी सांगत राहावे आणि आम्ही ऐकत, असे वाटत होते..

ते कवितेचे फक्त सादरीकरण नव्हते तर, प्रत्येक शब्दातल्या बारीक सारीक अर्थ छटा, त्यांची जीवनात अनुभवायला मिळणारी मार्मिक तरी गमतीशीर उदाहरणे होती..

वयाच्या अतिशय नाजूक टप्प्यावर असणाऱ्या आम्हाला, स्वप्नातून जागं करणारी प्रेम या विषयाची व्यावहारीक पण तरीही तरलता जपणारी ओळख सरांनी त्यादिवशी करून दिली..

पुढे जाऊन खऱ्या अर्थाने प्रेमात पडताना, सरांचे शब्द वेळोवेळी आठवत होते, त्यांनी नाट्यरुपात, गमती करत सांगितलेला अर्थ, भावार्थ.. ते पडणे सुसह्य आणि अधिक जाणिवेने झाले..

या कवितेत कुसुमाग्रजांनी खूप नेमक्या शब्दात, प्रेमाच्या गुलाबी रंगासोबत येणाऱ्या जबाबदारी , कर्तव्ये, बंधने अशा एका ना अनेक व्यावहारीक रंगांच्या साऱ्या छटा एकेका शब्दाने बखुबी गुंफल्या आहेतच, पण सरांनी त्या अधिक जिवंत केल्या..

या घटनेला २७ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, पण आठवण अगदी आज दुपारी घडल्याप्रमाणे आहे..

कविता सरांच्या संदर्भासहित , नाट्य पद्धतीत आणि सोबत माझ्या प्रेमाचे किस्से ऐकत अनुभवायची असेल तर नक्की सांगा, तशी एक मैफील भरवू या..

आजचा अध्याय समाप्तीला एकच विनंती करेन..

भाषा जितकी सहज, सोपी.. तितकीच खोल, गहिरी असते..

ती अनुभवताना काही चुकीचे अनुभव, चुकीच्या व्यक्ती, प्रश्न प्रकार, परीक्षा असे अडथळे मधे  येऊन वाट अडवतील..

पण त्यास त्यांच्या मर्यादा समजून, एका प्रबोधन गीतात म्हणल्याप्रमाणे..

मर्यादांना मर्यादून..?    छे ss त्यांना उल्लंघुनी..

पुढे पुढे चालणे असू दे .. हेच ध्येय तव मनी.. 

हेच ध्येय तव मनी.. 

स्वतः स्वतःची पद्धत शोधा, वाट बनवा.. पण प्रवास थांबवू नका..

तुम्हाला नवी पद्धत लाभो, नवे उत्तम शिक्षक, मित्र मिळोत आणि..

भाषाभ्यासाचा ध्यास लागो, हीच सदिच्छा..!

Monday, February 02, 2026

श्रवण

 

श्रवण, संभाषण, वाचन आणि सर्वात शेवटी लेखन हे भाषा आत्मसाद करण्याच्या पायऱ्या आहेत.. 

भाषेची ओळख होते तेच, श्रवण म्हणजेच ऐकण्यातून..

सामान्य मूल खूप लहान वयातच विशेष प्रयत्न न करता, फक्त ऐकणे आणि निरीक्षण करणे यातून घरात, परिसरात बोलल्या जाणाऱ्या एक वा त्यापेक्षा अधिक भाषा सहज शिकते..

त्यात अधिक नेमकेपणा, समृद्धता हवी असेल, तर त्यासाठी तशा पद्धतीचे ऐकावे लागते..

मी लहान असताना म्हणजे साधारण ३५-४० वर्षांपूर्वी, भाग्य म्हणावे की काय माहित नाही, पण प्रसार माध्यमे नेमके आणि उत्कृष्ट दर्जाची होती..

दूरचित्रवाणी ( फक्त दूरदर्शन), आकाशवाणी आणि टेपरेकॉर्डर, इतक्याच साधनांच्या मार्फत दैनंदिन कामाव्यतिरिक्त गोष्टी ऐकण्यास उपलब्ध होत्या..

त्याद्वारे लहानपणी छान छान गोष्टी, नंतर थोडे मोठे झाल्यावर चित्रपट गीते, कथाकथने भरपूर ऐकली, त्यांची पारायणे केली..

त्यात निखळ मनोरंजन होते, नि सोबतच येता जाता चांगल्या विचारांची पेरणी होती..

आज स्टँडअपचे आलेले खूळ.. अत्रे, पुलं, वपु यांच्या सारख्या दिग्गज मराठी साहित्यिकांनी फार पूर्वीपासून यश शिखरावर नेऊन ठेवले आहे..

त्याचा दर्जा इतक्या उच्च प्रतीचा आहे की शिव्यांच्या जागी फक्त फुल्या फुल्या हे शब्द देखील अचूक भावना सांगतो, त्याकरता जिव्हा आणि वाणी दूषित करण्याची गरजच नाही..

अशा उत्तम श्रवणाने फक्त कान नाही, तर आचार.. विचार.. वृत्ती सर्वांवर संस्कार झाले..

पुलं आणि वपु यांचे कथाकथन त्या वयात पूर्णतः कळले नसले तरी, मनोरंजना सोबतच भाषेची गोडी लागली, समृद्धता लाभली..

आजही ती कथाकथने ऑडीओ, व्हिडिओ स्वरूपात युट्यूब व इतर माध्यमात उपलब्ध आहेत आणि त्यांचे संदर्भ तितकेच काल सुसंगत आहेत..

नव्या वा बदलत जाणाऱ्या श्रवणीय गोष्टींना कडाडून विरोध नसला तरी, जुन्या सुवर्णाची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठीच आजचा लेखन प्रपंच..

असे उत्तम दर्जाचे ऐकण्यास मिळाले तर फार आटापिटा न करता, हसता हसता माय मराठी अनेकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय बनेल असे देखील मनापासून वाटते..

म्हणूनच लेखना सोबत पुलं ( पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) आणि वपु (वसंत पुरुषोत्तम काळे) यांच्या निवडक कथाकथांची लिंक देत आहे..

https://www.youtube.com/watch?v=AyBmI61Jrus&list=PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm

https://www.youtube.com/watch?v=JflwJiPw4LU&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=TcmLHaJaEnI&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=nhf2odF8h1Y&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl

https://www.youtube.com/watch?v=kbpoczrrVeQ&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl0gcJCZEKAYcqIYzv

https://youtu.be/XoVzdHsKdr0?si=ZAOGB0sgTHTq1ykC 

यांनतर क्रोनोलोजी अजून भरपूर पर्याय देईलच..

शिवाय आता एआयच्या जमान्यात प्रत्येकाने आपल्या आवडीचे, सोयीचे काहीही ऐकले तरी चालेल, त्यातून भाषा शिकण्यास, रुजविण्यास आणि वृद्धिंगत करण्यास मदतच होईल, हे नक्की..

तुम्ही काय ऐकता, सांगण्यास विसरू नका..

आणि नेहमीचे अभिप्राय, सुधारणा यांचे स्वागत..

Wednesday, January 21, 2026

विश्रांती







विश्रांतीची कहाणी..


ऐका महाराजा, तुमची कहाणी


आटपाट नगरात सुरू झाली शाळा, नाव तिचे सिटी प्राईड. बघता बघता नगरातील प्रमुख शाळांपैकी एक बनली. शाखा विस्तार होत, १ एप्रिल २०२५ रोजी चौथे अपत्य नावारूपास येऊ लागले..


जुन्या शाखांमधील मोजके सदस्य वगळता, सर्वकाही नवीन होते. तरी प्रत्येकजण मनापासून कामाच्या पद्धती, प्रणाली समजून घेत होते.


जुन्यांना शाळेच्या पद्धतीचा अनुभव असला तरी परिसर, इतर सदस्य, विद्यार्थी आणि पालक सगळं नवीनच होत.. 


सारेजण हसत खेळत एकमेकांना सोबत आनंद, उत्साहात काम करत होते,  दिवसांमागून दिवस जात होते..


सुरुवातीच्या काळात नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी मिळणारा  वेळ, विचार , सुख दुःखाची देवाण घेवाण हळूहळू कमी होऊ लागली..


कामाचा पसारा, एकामागून येणारे एक पायाला चाक लावून येणारे उपक्रम, परीक्षा, इतर कामे यात सगळ्यांचे जणू यंत्र बनू लागले..


त्यामुळे वातावरण बदलू लागले, एक अस्वस्थता प्रत्येकाला त्रास देऊ लागली, काहीतरी हरवत आहे, निसटत आहे असे वाटले तरी नेमके काय हे लक्षात येत नव्हते..


त्यातच पालकांची मासिक बैठक, क्षेत्रभेट, स्पर्धा, परीक्षा, स्नेहसंमेलन असा एक संपण्यापूर्वी दुसरा अध्याय दत्त म्हणून उभा रहात होता..


विद्या प्रांगणाच्या वास्तू देवतेला हे सारे दिसत होते, आपल्या लेकरांची तगमग जाणवत होती, त्यावर हळूच फुंकर घालावी असे ठरवून, त्या अज्ञात शक्तीने जादूची कांडी फिरवली..


दिवस संक्रांत सणाचे, हेच निमित्त साधून सदस्यांना तिळगुळ समारंभ करण्याची बुद्धी दिली..


प्रस्ताव मांडला, परवानगी मिळाली, आवश्यक साहित्य, अर्थकारण साऱ्यावर चर्चा आणि नियोजन झाले..


इतक्यात मधे माशी शिंकली, नकार घंटा वाजवत विश्वव्यापी सायकल स्पर्धा आडवी आली, त्यासाठी मुलांना दोन दिवसाची सक्तीची सुटी जाहीर झाली..


तोंडावर आलेले सलग उपक्रम, त्यांचा सराव, राहिलेली ढीगभर कामे बघता, समारंभ रद्द करावा लागला..


पण देवतेला हे मंजूर नव्हते, तिने एका सदस्यास नकळत ऊर्जा दिली, येतील अनेक प्रश्न, अडचणी पण हे कार्य माझी इच्छा आहे, मनापासून काम करणाऱ्या माझ्या लेकरांना कामात थोडा बदल हवा आहे, (आजकाल काय म्हणतात ते आईस ब्रेक)..


कामाचा एकसुरीपणा, अडचणी यावर विश्रांतीची गरज आहे, जशी शरीराला झोप तशी मनाला उगाच हसण्याची, नाचण्याची गरज आहे..


अदृश्य शक्तीचा जणू आदेश झाला आणि सदस्य त्याच्या नकळत अनेक गोष्टी करून गेला..


२० जानेवारी मंगळवार, मुलांना सुटी असली तरी शाळेचे शिक्षक, कर्मचारी कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर आले..


सदस्याने वरिष्ठांना केलेली तयारी सांगितली, पुढच्या साऱ्या उपक्रमांची कामे मिळून करूया पण त्याआधी एक तास थोडा वेगळा अनुभव घेऊ या असे गाऱ्हाणे मांडले..


वेळ उपलब्ध होता आणि हा बदल खरच आवश्यक आहे, हे जाणवून वरिष्ठांनी लगेच परवानगी दिली..


झाले, आता देवता त्या एकाच नाही तर तेथील अनेक सदस्यांच्या अंगी संचारली, बघता बघता अवघ्या अर्धा पाऊण तासात एका सुरेख समारंभाची जय्यत तयारी झाली..


तिळगुळ समारंभाला शोभेशी आरास साऱ्यांना छायाचित्र काढण्यास प्रवृत्त करू लागली, सर्वांनी एकमेकांसोबत या सुखद आठवणी आपल्या भ्रमणध्वनीत मनसोक्त टिपल्या..


एक एक करून सारे जमा झाल्यावर विद्यादात्री देवी सरस्वतीचे पूजन झाले, सर्वांनी मिळून तिचे आवाहन केले, हे देवी, दैनंदिन कामात आलेली यांत्रिकता दूर सारून आनंद, मैत्री, उत्साहाचे वारे वाहू दे..


उद्याचे भविष्य घडवू इच्छिणाऱ्या आम्हाला चैतन्य, नावीन्य, चिकाटीचे दान दे..


त्यानंतर सर्वांनी मिळून हसावे, खेळावे, बागडावे यासाठी गमतीशीर खेळ, बालगीतांवर नृत्य करण्यात आले..


त्यावेळी जी काही धम्माल, दंगामस्ती झाली की त्याच त्याच गोष्टी करून यंत्र होऊ बघणारे सारे सदस्य पुन्हा एकदा फुलपाखरासारखे रंगबेरंगी झाले..


सोबत अल्पोपहराचा आस्वाद घेताना मनमोकळ्या गप्पा झाल्या, शाळेचे नाव उखण्यात घेताना मनातले प्रेम, लटका राग व्यक्त करताना निरागाठी सुटल्या..


समारोप करताना प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ देऊन प्रेमाने मिठीत घेताना आपण सारे एक कुटुंब आहोत, इथले फक्त यश, आनंदच नाही तर प्रश्न, समस्या याही आपल्या साऱ्यांच्या आहेत आणि आपण मिळून त्यांना पार करणार आहोत असा आश्वासक आधार शब्दाविना दिला आणि मिळवला..


हा आणि असाच अनुभव सेवक कर्मचाऱ्यांनी देखील अनुभवला तेंव्हा   त्यास अधिक पूर्णत्व लाभले..


कामात थोडा बदल म्हणजे साऱ्यांनी एकत्र येऊन गप्पा टप्पा, खेळ, नाच याची अधून मधून फोडणी हवी तरच नित्य दिनक्रम अधिक आनंदी आणि उत्साही होईल हे एकमताने ठरले..


आपल्या लेकरांची काळजी घेणारी, ती अज्ञात शक्ती जशी सिटी प्राईड प्राधिकरण शाखेस लाभली, तशी ती तुम्हा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


अशी ही विश्रांतीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण..


अभिगंधशाली




Tuesday, January 13, 2026

ब्लॅक_ब्यूटी

 पुस्तक परिचय  

लेखिका - अँना सिवेल... अनुवाद - स्मिता लिमये.


ही एका घोड्याची आत्मकथा आहे. प्राचीन काळापासून जगभरच्या संस्कृतीचा भाग व मानवाचा लाडका प्राणी घोडा.. 

बुद्धीने तल्लख, प्रेमास उत्तम प्रतिसादी आणि ईमानी..

प्राणी जीवनावरील  एक यशस्वी कादंबरी..

घोडागाडीचे काम करणाऱ्या कथेच्या लेखिकेला, या प्राण्याविषयी कमालीची आत्मीयता वाटते.. 

स्वतःच्या आजारपणावर विरंगुळा म्हणून आपल्या घोड्याची आत्मकथा लिहावी, या कल्पनेतून पुस्तकाची निर्मिती झाली आहे..

पाळीव प्राण्यांना उत्तम मालक मिळाल्यास ते मृत्यू शय्येवरून बाहेर उठून, दीर्घायुष्यी कसे होतात, हे कथेत भावपूर्ण गुंफले आहे..

कथेच्या शेवटाकडे येताना घोड्याला पुन्हा एक नवा चांगला मालक मिळतो..
 
मरणासन्न ब्लॅक ब्युटी पुन्हा धट्टाकट्टा होऊन,अधिक वीस वर्षे कसा जगतो, यातून पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे अनेक संदर्भ लेखिका मांडते.

पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी

● पाळीव प्राण्यांचे जीवन व त्यांचे प्रश्न याची कथारूप मांडणी. 

● पाळीव प्राणी जीवनातील छोटे छोटे बारकावे.

 ● स्मिता लिमये यांनी इंग्रजी कथेचा अतिशय सुंदर केलेला भावानुवाद.

● पाळीव प्राण्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन.

● लेखिकेच्या लेखनाची एक वेगळीच शैली... घोड्याच्या जागी  स्वतःला ठेवून केलेले लिखाण.

● थोडक्यात प्राणी प्रेमिकांनी आणि ज्यांना प्राणी सांभाळायचे आहेत त्यांनी तर जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@

Saturday, April 05, 2025

श्रीराम


रामासी शरण निघा रे | राम होऊनी राम गा रे ॥१॥
राम कैसा हे विचारा | नका कर्म करू व्यभिचारा ॥२॥
हा दुस्तर भव हराया | तुम्ही जोडा सखा गुरुराया ॥३॥
म्हणे माणिक राम पहावा | तया लागी हृदयी जपावा ॥४॥

माणिक प्रभू यांची ही रचना दैनंदिन जीवनाची दिशा सुचवते.

रामासी शरण निघा रे 

राम म्हणजे परमेश्वराला शरण जा, समर्पित व्हा कारण दुःख, संकट, भय, वेदना अशा साऱ्याचे उपाय फक्त त्याच्याच जवळ आहेत..

त्यातही दशावतारांमधील राम हा मानवाच्या सर्व मर्यादा पाळणारा अवतार.. 

या अवतारात दैवी शक्ती, चमत्कार, युक्ती,  इ. कोणत्याही गोष्टींचा वापर प्रभू श्रीरामांनी कधीही केला नाही..

मानव जन्म प्राप्त झाल्यावर सर्वोत्तम असण्याचे सर्व निकष त्यांनी सदैव सांभाळले आणि येणाऱ्या पिढीसाठी आदर्श स्थापन केले, अशा प्रभू रामाला शरण जा, असे रचनाकार सुचवतात..

राम होऊनी राम गा रे 

राम हा परमेश्वरी अवतार होता, असे म्हणत त्यांनी केलेल्या गोष्टी मला शक्य नाही अशी पळवाट शोधून चालणार नाही..

रामाची आरती, गाणी, भजन इ. पोकळ स्तुती करून उपयोग नाही..

त्याआधी रामाचे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न हवा, सत्य वचन, नीतिमत्ता, धर्मपालन असे एक ना अनेक गुणांचा अंगीकार करा..

थोडक्यात आधी राम व्हा, मग त्याचे गुणगान करा..


राम कैसा हे विचारा 

रामाची मंदिरात स्थापना करून पुरेसे होणार नाही, मानवी जीवनाची आदर्श मूर्ती असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या कथा ऐका..

एक राजा, पुत्र, बंधू, पती म्हणून ते कसे होते, इतकेच काय शत्रू असूनही दशग्रंथी राजा रावण याचा त्यांनी कसा मान राखला, हे सारे समजून घ्या..

नका कर्म करू व्यभिचारा 

व्यभ म्हणजे चुकीचा, आचार म्हणजे वर्तन, कोणतेही कर्म करताना व्यभिचार म्हणजे चुकीचे वर्तन करू नका..

कर्म करताना असत्य, अनैतिक, अधर्म या साऱ्या गोष्टी जबाबदारीने दूर ठेवा, त्यासाठी प्रभू श्रीरामांचे संस्कार, संयम, सद्भावना, साहचर्य, संतुलन असे गुण स्वतःच्या आचरणात येऊ द्या..


हा दुस्तर भव हराया 

राम होणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही, याची पूर्ण जाणीव रचनाकार माणिक प्रभू यांना आहे,म्हणूनच ते म्हणतात, हा दुस्तर म्हणजे पार करण्यास अवघड, भव याचा अर्थ स्थिती..

मला राम कसे होता येईल, त्यांचे गुण माझ्यात येण्यासाठी मी काय करायला हवे, हे मला खरंच जमेल का, अशी अवघड स्थिती निर्माण झाल्यावर, नेमके काय करायला हवे, हे सांगताना ते म्हणतात..

तुम्ही जोडा सखा गुरुराया 

आपल्या संस्कृतीत सर्व श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या गुरु परंपरेची कास धरा, राम समजून घेण्यासाठी, त्यांच्यासारखे होण्यासाठी गुरुंचे सहकार्य घ्या..

मग ती व्यक्ती असेल, ग्रंथ संपदा असेल, जीवनानुभव असतील, त्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, फक्त मनात तशी इच्छा ठेवून मार्गक्रमण करत प्रभू श्रीराम आपले गुरु, सखा होण्याकडे प्रवास घडो..

यातून हा कठीण वाटणारा प्रवास हळूहळू सुकर होत जाईल.. 

म्हणे माणिक राम पहावा

काव्याच्या अंतिम चरणाकडे येताना माणिक प्रभू ईश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात..

तेहेतीस कोटी देवांची परंपरा असणाऱ्या, आपल्या समृद्ध संस्कृतीत सर्वच देवतांचे इतके विलोभनीय वर्णन केले आहे, की प्रत्येकाला अशी दैवी शक्ती एकदा तरी, याची देही याची डोळा बघण्याची आसक्ती आपोआप निर्माण होते..

पण प्रभू राम म्हणजे षड्रिपुंवर विजय मिळवलेली मानवी दैवी शक्ती, मग त्यांना बघण्याची आसक्ती निर्माण होऊन कसे बरे चालेल, या आसक्तीवर मात करण्यासाठी उपाय एकच..

तया लागी हृदयी जपावा

रामासारखे बनून रामाला कोणत्याही मंदिर, मूर्तीमध्ये न शोधता, त्याला आपल्या हृदयात स्थापन करा, अगदी तसा जसा रामभक्त हनुमानाने स्व हृदयात स्थापिला..

आता राम  सदैव आपल्या सोबत राहील, आपल्याला संसार रुपी भवसागर पार करण्यासाठी प्रेरणा देईल, दुःख, भय, संकट सारे निभावून नेईल, यासाठीच ..

राम होऊनी राम गा रे..  

रामासी शरण निघा रे..

सदर रचना ही माणिक प्रभू यांची असून हा एक राम निरंजन, भक्तीगीत प्रकार आहे..

राम होऊनी राम गा रे..

सोबत दिलेल्या दुव्यात या गीताचे स्वर बांधणी व सुरेल गायन पंडित प्रभाकर कारेकर यांनी केले आहे. त्याचाही जरूर आनंद घ्या..

भावार्थ कसा वाटला, प्रतिसाद द्यायला विसरू नका..

आपण सर्वांनी रामामय व्हावे याच शुभेच्छा..

Monday, March 24, 2025

भाकरी आख्यान

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

ही बहिणाबाई चौधरी यांची कविता पहिल्यांदा कुठे, कधी, कुणाकडून ऐकली हे आठवत नाही, पण ती अनुभवली, ते करोना काळात..

त्याचे झाले असे, की लहापणापासूनच भाकरी या पदार्थाशी विशेष सख्य नव्हते, पुढे लग्न झाल्यावरही पारंपरिक पदार्थ सासूबाई, आणि नव्या काळाचे मी अशी नकळत विभागणी झाली नवरा किंवा मुलगा दोघांनाही भाकरी विशेष आवडत नसल्याने, करायला शिकावी, यायला हवी असेही झाले नाही..

पण करोना काळात प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकण्याचा चंग बांधला होता, माझी गाठ पडली ती भाकरी सोबत..

त्या काळात सासूबाई आहारात फक्त भाकरी खायच्या, सुरुवातीला त्यांची त्या करूनही घेत होत्या, पण एकदा माझा मित्र शशांक, याच्याशी गप्पा चालू असताना भाकरी पुराण सुरू झाले आणि त्याने सांगितले की, तो फार छान भाकरी बनवतो, एकदम टम्म फुगणारी..

झालं..!

मग काय म्हणतात ना, स्वाभिमान की काय, तो दुखावला गेला, इतके पदार्थ बनवतो आपण, पण साधी भाकरी येऊ नये..? लगेच पक्के ठरवले, काही झाले तरी हे जमायलाच हवे..

लहान असताना माझी काकू, जी मूळ सोलापूरची आहे, तिच्या अतिशय पातळ, भल्या मोठ्या भाकरीचे भरपूर कौतुक ऐकलं, पाहिलं होतं, अगदी तशीच जमवायची असा निश्चय केला..

काही दिवसात अगदी तशी नाही, पण पुणेरी बाज असणारी, मध्यम आकाराची, पातळ आणि सर्वात महत्त्वाचं टम्म फुगणारी भाकरी जमू लागली..

आणि तेंव्हाच बहिणाबाईंच्या कवितेचा खरा अर्थ उमगला..

हवी तशी भाकरी येईपर्यंत, प्रक्रियेत रोज बदल करावे लागले, तेंव्हा राहून राहून ही कविता गुणगुणू लागायची..

तिच्या ओळी गेल्या वीस वर्षातला संसार डोळ्यांसमोर उभ्या करायच्या,आज त्यात असणारी स्वस्थता, समाधान, गोडवा येण्यासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान, केलेल्या तडजोडी लक्षात यायच्या..

या वेगवेगळ्या प्रसंगात व्यक्तींना तवा, चूल, निखारे यांची उपमा दिली, तर भूमिका बदलती असली, तरी त्यावर बनणारी संसार रुपी भाकरी उत्तम होण्यासाठी सगळे धडपड होते हे जाणवले..

प्रत्यक्षात किती भाकरी करायच्या, त्यासाठी पीठ किती घ्यायचे, त्यात योग्य मीठ व पाणी घालून मळायचे..

बरं हे पीठ मळणे, हे पोळीची कणीक मिळण्यापेक्षा खूपच वेगळे, कारण मुळातच ज्वारी, बाजरीच्या पिठात चिकटपणा कमी, त्यामुळे त्यासाठी वेगळेच कौशल्य लागते..

भाकरीच्या पिठाला पुन्हा पुन्हा आंजारावे, गोंजारावे लागते, एक न् एक कण एकमेकांशी सांधावा लागतो, 

पीठ मळून गोष्ट संपत नाही, अजून भली थोरली लढाई असते, भाकरी थापून करावी लागते..

लाटणे आणि थापणे या क्रिया वेगळ्या का, हे भाकरी करताना समजते, त्यातही थालिपीठ थापणे आणि भाकरी थापणे हे अजून वेगळे..

थोडेसे कोरडे पीठ घेऊन, त्यावर मनसोक्त मळून घेतलेला गोळा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने भाकरी थापायची, ती सर्व बाजूंनी एकसारखी असेल तरच उचलता येते, मधेच कुठेतरी पातळ झाली की मोडते, कोरडे पीठ जास्त झाले की भेगा पडतात अशा अनेक बाबी अनुभवातून जमल्या..

छान थापलेली भाकरी तापलेल्या तव्यावर टाकली की असते खरी परीक्षा आणि आठवतात कवितेच्या मुख्य ओळी..

आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर..

ज्वारी, बाजरी हे प्रमुख पीक असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात, पोळी हा पदार्थ खूप नंतर आला..

पूर्वी भाकरी हेच प्रमुख अन्न होते, त्यासोबत मिळाली तर भाजी, नाहीतर  मिरचीचा ठेचा, कांदा अगदी पाण्यासोबतही भाकरी खाल्ली जायची, ती अनेक दिवस टिकायची, त्यामुळे प्रवासाला जाताना शिदोरी म्हणून बांधून दिली जायची..

पुरण भरुन केली जाणारी तीच पोळी, तेंव्हा गहू तुलनेत कमी पिकायचा, त्यातून महाग, त्यामुळे सण समारंभाच्या वेळी पोळी नव्हे पुरणपोळी असायची..

पुरण न भरता पोळी करण्याची पद्धत सुरू झाली, तेंव्हा तिला चपाती हे नाव मिळाले..

पुढे खाण्याच्या पद्धती, शेती अनेक गोष्टीत बदल झाले आणि रोजच्या खाण्यात भाकरी ऐवजी गव्हाची चपाती मुख्य आहार बनली..

शहरी भागात तिलाच पोळी संबोधले जाऊ लागले आणि भाकरी काहीशी मागे पडली..

जशी भाकरीची कथा तशीच चुलीची गोष्ट, तिचे स्थान गॅस शेगडीने घेतले..

अरेच्या, विषय चालू होता, हाताला बसणाऱ्या चटक्यांचा, पण पोळी करताना तसा चटका बसण्याचे प्रसंग कमी येतात, काळजीपूर्वक केल्यास येतच नाही..

पण भाकरीचे तसे नाही..

कोरड्या पिठावर थापलेली भाकरी, उचलून तव्यावर टाकली की खरी परीक्षा असते, त्या कोरड्या पिठाच्या बाजूला, ना कमी ना जास्त पाणी टाकून, ते पूर्ण भाकरीभर एकसारखे पसरावे लागते..

आणि असे करताना तापलेल्या तव्यावर पाणी गरम होते आणि ते पसरवताना हलके चटके बसतात..

पण यानेच भाकरीचा खरपूस पापुद्रा तयार होतो, त्यामुळे ते चटके छान वाटतात..

जसे संसार येणाऱ्या किरकोळ कुरबुरी  नाती अधिक घट्ट बनवतात, आपण अधिक समंजस होत जातो, रोजच्या छोट्या मोठ्या आव्हानांना सामोरे जायचे बळ मिळते..

भाकरीवरचे पाणी पुरले, असे म्हणतात की ती पचली, मग ती उलटवतात, ही वेळही अचूक साधावी लागते, अन्यथा  दुसऱ्या बाजूला भेगा पडतात आणि मग ती फुगत नाही, उलटवलेली भाकरी दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी, पूर्वी तिला चुलीतल्या निखाऱ्यावर टाकताच ती मस्त फुगायची, आता तवा बाजूला करून शेगडीवर भाजतात, सगळा ताळमेळ जमला की भाकरी टम्म फुगते आणि छान खरपूस पापुद्रा सुटतो, अशी भाकरी खाताना खूप छान वाटते, अगदी तशीच नाही का मी हळूहळू संसारात रमत गेले..

एखाद्या वेळेस पीठ जुने झाले, विरी गेले, की मळताना थोडे कोमट पाणी वापरावे, उकड काढून घ्यावी किंवा त्याचे धिरडे, आंबील करतात, यातून समजते की प्रश्न असले, तरी त्यावर उपाय शोधता यायला हवा हे नव्याने उमगले.. 

असे एक ना अनेक अनुभव कवितेच्या प्रत्येक ओळीला समजून घेतना मला नव्याने समृद्ध, अधिक परिपक्व करत होते..

आणि एकदम जाणीव झाली, की शाळा, शिक्षण, अभ्यासक्रम या नावाखाली अशा सुंदर, तरल कविता, कथा शब्दशः अर्थ सांगून, आपण किती नीरस बनवतो.. 

त्यापेक्षा त्या फक्त पुन्हा पुन्हा वाचाव्यात, तोंडपाठ कराव्यात, 

बहिणाबाईंच्या इतर अनेक कविता  शिक्षक, आई बाबा, नातेवाईक, सांस्कृतिक, भाषिक कार्यक्रमात अनेकदा ऐकल्या, वाचल्या..

त्या कधी अभ्यासक्रमात होत्या की नाही, हेही आठवत नाही, पण त्यातल्या अनेक आजही तोंडपाठ आहेत, हे नक्की..

असे सांगितले जाते की या बहिणाबाई निरक्षर होत्या, एक शिक्षक म्हणून यावर हसावे की रडावे, हेच समजत नाही..

जाणवते ती शिक्षण नामक अर्थशून्य धडपड, पण मग आठवते, ती कृतियुक्त शिक्षण पद्धती..

प्रकर्षाने जाणवले कविता ऐकली होती, मनात खोलवर रुजली होती पण संसार, हाताचे चटके, भाकरी खाण्याचा आनंद तेंव्हाच समजला जेंव्हा हे सारे प्रत्यक्ष अनुभवले..

अर्थात उत्तम साहित्य ऐकवत राहायला हवे, फक्त ते लगेच समजून घेण्याचा निरर्थक अट्टहास करण्यापेक्षा ज्याने त्याने आपले अनुभव, प्रवास या सारे त्याच्याशी जोडून त्यातून जाणवणारे अर्थ, भावार्थ, मतितार्थ शोधायला हवे..

जसे आज मी भाकरी आख्यान मांडले, तुम्हाला सांगताना पुन्हा एकदा सारे अनुभवले, अगदी तसेच..

अशा साहित्याची भाषिक सहजता,  सुमधुर शब्द आणि दैनंदिन अनुभवांची मांडणी यामुळे प्रत्येकाला ती आपलीच गोष्ट वाटते..

सतत होणारे बदल, येणारे प्रश्न - समस्या, सुख दुःख, यश अपयश याने ओतप्रोत भरलेले, अतिशय नाट्यमय असणारे प्रत्येकाचे आयुष्य अनेक साहित्यिक आपल्या कथा, कवितांमध्ये अचूक शब्दात रेखाटतात, चुकलेल्यांना नवी वाट दाखवतात, हरलेल्यांना नवी उमेद देतात..

आजच्या एआयच्या जमान्यात सामाजिकता, भावनिकता, सोशिकपणा या अनेक गोष्टी हळूहळू कमी होताना दिसत आहेत..

परवाच गप्पांमध्ये विषय झाला, की येणाऱ्या काळात नाती रुजविण्यासाठी, सांभाळण्यासाठी खूप काम करावे लागणार आहे, बाकी सारे स्विगी, झोमॅटो करता येईल, पण माणसातले माणूसपण प्रयत्नपूर्वक जपावे लागणार आहे..

यासाठी अशा कथा, कविता नक्कीच मदत करतील हे अर्थात अनुभवाने सांगावेसे वाटते..

पुन्हा एकदा वाचून नव्याने अनुभवण्यासाठी, कविता सोबत देत आहे..

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही

राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।


अरे संसार संसार, नाही रडन कुढन

येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।

अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड

एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।


अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,

त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,

अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।


एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,

देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।

देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार

कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।


अरे संसार संसार, असा मोठा जादुगर

माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।

असा संसार संसार, आधी देवाचा इसर

माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।


आपले अनुभव सांगायला विसरू नका, प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..

Tuesday, February 25, 2025

शिवस्तुती

 


आज महाशिवरात्र, या निमित्ताने लेखनसेवा करावी, असे ठरविले..


त्यासाठी थोडे वाचन, अभ्यास करायला सुरुवात केली..


क्षणभरात जाणीव झाली, की त्रिदेवांपैकी जो संहारक आहे, लय गुणाचा स्वामी आहे, तांडव ज्याचे आवडते नृत्य आहे, हलाहल पचविण्याची ज्याची क्षमता आहे असे एका ना अनेक..


जे शिवरूप संहारक आहे, रुद्र आहे, ज्याचा कोप साऱ्याचा नाश करण्याची  क्षमता ठेवतो..


ते मूळ शिवरूप अत्यंत साधे दश दिशांचे वस्त्र पांघरलेले, खूप शांत, भोळे, सर्व चुकांना क्षमा करणारे, मनापासून केलेल्या भक्तीने सहज प्रसन्न होऊन वरदान देणारे आहे..


म्हणूनच कदाचित सगळे असूर या शिव शंकराची आराधना करत असे पुराणात आढळते..


त्याच बरोबर प्रत्येक समस्या, संकट याची उत्तर, उपाय हे देखील भगवान शंकराकडे असत..


या विषयी लेखन करण्यात आपण अगदीच अपुरे आहोत..


मग आता..


संदर्भ शोधताना, भगवान शिवाची अनेक स्तोत्र, स्तुती, आख्यायिका, कथा वाचनात आल्या..


आणि अचानक आठवण झाली, शाळेत प्राथमिक गटात असताना, नित्य नियमाने करत असणाऱ्या उपासनेची..


चिदानंद रूप: शिव ssमी.. शिव ssमी 


चिदानंद रूप: शिवोहम.. शिवोहम


त्यावेळी ही उपासना का करतो, याचा अर्थ काय हे विचारावे इतकी परिपक्वता नव्हती आणि धाडस देखील नव्हते..


आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्यांचे ऐकायचे इतके गणित साधे, सोपे होते..


आज लेखनासाठी शोध घेतला, तेंव्हा समजले, आद्य शंकराचार्य हे आपल्या गुरूंना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा त्यांच्या गुरूंनी, तू कोण आहेस असा प्रश्न विचारला..


त्याला उत्तर म्हणून बाल शंकराचार्य यांनी निर्वाण षटकम् रचिले, त्यामधील प्रत्येक पदाची शेवटची ओळ आहे, 


चिदानंद रूप: शिवोहम.. शिवोहम..


ज्याचा अर्थ आहे..


 मी चैतन्य स्वरूप आहे, आनंद रुप आहे..


या निर्वाण षटकम् काय आहे, हे सांगण्या आधी काय काय नाही हे सांगितले आहे..


त्या साऱ्यातून शिव शक्ती नेमकी काय आहे हे नव्याने लक्षात आले..


संदर्भासाठी ती ब्लॉग लिंक देत आहे..

https://www.linkedin.com/pulse/%E0%A4%9A%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE-prashant-pandya


आता नकळत लहान वयात केलेल्या या उपासनेतून काय मिळाले..?


एक अनामिक शक्ती, विश्वास, प्रेरणा..


शाळेत असताना ज्या अनेक संस्कार, विचारांनी कायमस्वरूपी गारूड केले, त्याही पुढे जाऊन अधिक स्वस्थ बनवले त्यापैकी एक म्हणजे उपासना..


वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या उपासना शिकलो, त्यापैकी सर्वात आधी ही उपासना..


या ओळींमध्ये अतिशय सुंदर नाद आहे, स्वतःला जागे करण्याची ताकद आहे..


'मी' या स्वरूपाला अधिक जबाबदार करणारी ही एक उपासना आहे..


वेदांमध्ये शिव याचा अर्थ सुंदर, उत्तम, शुभ असा अभिप्रेत आहे..


जेंव्हा या ओळींचा उच्चार करतो, की मी चित् म्हणजे सदैव आनंद रुप आहे, मी शिव रूप आहे..


आपोआप अत्यंत शांत, स्वस्थ वाटण्यास सुरुवात होते..


जर मी शिव म्हणजे शुभ आहे, तर माझ्या प्रत्येक कृतीतून चांगले व्हावे ही प्रेरणा मिळते..


आपण दिवसाची सुरुवात या दोन ओळींनी केला आणि त्या जबाबदारीने कृती करण्याचा प्रयत्न केला, तरी शिव शंकरांची आराधना होईल..


महाशिवरात्रीचे निमित्त साधून, इतके दिवस फक्त उपचार म्हणून उच्चारत असलेल्या ओळींचा अर्थ समजून घेण्याची संधी आज मिळाली..


त्यातील अर्थाची ताकद समजली, ते सामर्थ्य मला या पुढील प्रवासाला अधिक समृद्ध, स्वस्थ, शांत करत जावो हीच त्या सांभ शिवा चरणी प्रार्थना..


माझ्यासोबत तुम्हीही ही रचना समजून घेतली, याबद्दल मनापासून आनंद..


शिवशंकर सर्वांचे कल्याण करोत हीच सदिच्छा..


जय शिव शंभो.. जय जय महादेव..

Saturday, February 15, 2025

इंट्रा स्कूल

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन

स्पर्धा म्हणजे सहभाग, चढाओढ, चुरस, जिंकण्याची जिद्द, हार पचवण्याची खिलाडू वृत्ती या अगदी सहज लक्षात येणार गोष्टी..


पण अधिक सजगपणे याकडे पाहिले तर स्वतःला शोधण्याची संधी..


या स्पर्धेची ओळख आपल्याला अगदी पाळण्यात होते..


हसून दाखव, बाबा म्हण, चालून दाखव, यातूनच मूल स्वतःला शोधत राहते..


नव्या गोष्टी शिकत जाते, सरावाने त्यात पारंगत बनते..


याची पुढची पायरी ठरते ती शाळा, इथे स्वतः सोबत मित्रांसोबत स्पर्धा असते..


त्यामुळे अर्थातच त्यात कधी जीत तर कधी हार होणार हे ओघाने येते..


पण त्यातूनच खरे जीवन शिक्षण घडते, अशा स्पर्धा प्रत्येकाला अधिक सक्षम, क्रियाशील, सर्जनशील बनवतात..


त्यामुळे निखळ आनंद, प्रोत्साहन, नावीन्य, कृतिशील स्पर्धा असायला हव्या..


अशा उत्तम नियोजनपूर्वक, वयानुरूप, विविध कला समाविष्ट असणारा शालांतर्गत स्पर्धा सप्ताह, 

मी गेली पाच वर्ष आमच्या सिटी प्राईड शाळा निगडी येथे अनुभवत आहे..


त्याविषयी हा लेखन प्रपंच 

(थोडक्यात मांडणी अवघड आहे)

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन नावाने ओळखला जाणारा हा आठवडा, माध्यमिक विभागासाठी प्रथम आणि प्राथमिक विभागात द्वितीय सत्रात साजरा होतो..


स्पर्धा


प्रत्येक इयत्तेसाठी गायन, वादन, नृत्य, हस्तकला, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा अशा दरवर्षी वेगवेगळ्या  पाच वैयक्तिक..


आणि पूर्ण वर्गासाठी समूह गायन किंवा क्लास कर्निव्हल असा भरगच्च संधीचा पेटारा मुलांसाठी सज्ज असतो..


याचा मुख्य उद्देश वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या तरी एका स्पर्धेत सहभाग नोंदवावा, विविध विषयावर आधारित या स्पर्धांमधून मुलांना स्वतःमधील गुण शोधण्याची संधी मिळावी..


सोबतच गटाने काम करणे, माझा वर्ग, मिळून सादरीकरण यातून समूह भावना तयार होण्यास मदत मिळावी..

 

निवड प्रक्रिया 


यासाठी गेल्यावर्षी पर्यंत छापील पत्रकाद्वारे या स्पर्धांची सविस्तर माहिती पालकांपर्यंत दिली जायची, त्यातून ते आपल्या मुलांशी चर्चा करून एका स्पर्धेत सहभाग नोंदवायचे, यावर्षी पासून गुगल फॉर्मच्या मदतीने मुलांनी स्पर्धेची निवड ठरवली..


उद्घाटन सोहळा 


आठवडाभर चालणारा हा उपक्रम असल्याने त्याची सुरुवातही तशीच उत्साहात, दणक्यात व्हायला हवी म्हणूनच दरवर्षी याचे नावीन्यपूर्ण नियोजन केले जाते..


सोबतच दररोज त्यादिवशीच्या स्पर्धा, त्याचे स्थळ, वेळ ही सविस्तर माहिती परिपाठामध्ये (असेम्ब्ली) दिली जाते, शिवाय शिक्षक खोली, सूचना फलक यावर लेखी नियोजन उपलब्ध असते, आता कालानुरूप त्याच्या पीडीएफ गटावर देखील पाठवल्या जातात..


प्रत्यक्ष स्पर्धा


प्राथमिक विभाग म्हणजे पहिली ते पाचवी म्हणजे पाच वर्ग गुणिले त्यांच्या प्रत्येकी पाच म्हणजे २५ आणि वर्गाच्या पाच म्हणजे सगळ्या मिळून एकूण ३० स्पर्धा सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात संपन्न होतात..


सकाळी साडेआठ ते तीन या वेळात या ३० स्पर्धांचे आयोजन हा एक वेगळाच धामधुमीचा विषय असतो..


स्पर्धेच्या स्वरूपानुसार छोटे किंवा मोठे सभागृह, त्या इयत्तेचे वर्ग, शाळेतील इतर जागा जसे बेसमेंट, कॉरिडॉर इत्यादी विविध ठिकाणी एका वेळी साधारण चार ते पाच स्पर्धा समांतरपणे सुरू असतात..







स्पर्धा समिती


पूर्ण आठवडा चालणाऱ्या या उपक्रमासाठी शिक्षकांचा एक गट- समिती, इंट्रा स्कूल कमिटी या साऱ्याचे आयोजन नियोजन करते..


पाचही वर्ष या गटाचा सदस्य म्हणून माझे खूप छान अनुभव शिक्षण झाले..


मुलांनी आपल्या आवडीची स्पर्धा निवडल्यानंतर त्यानुसार याद्या तयार होतात, प्रत्येक स्पर्धेसाठी योग्य जागा, वेळ ठरते..


स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षक (त्या स्पर्धेत सहभागी नसणारे विद्यार्थी), पालकांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन, परिक्षणासाठीचे निकष, परिक्षक, त्यांचा सत्कार, चहापान ही व्यवस्था होते..


त्यानंतर प्रत्येक स्पर्धेचा निकाल, बक्षीस पात्र चषक, प्रशस्तिपत्रकांचे  लेखन इत्यादी अनेक कामे असतात..


अशा खूप साऱ्या गोष्टी, जबाबदाऱ्या या स्पर्धांच्या आधी आणि नंतर ही कमिटी समर्थपणे सांभाळते, सोबत शाळेतील नित्य कामे, वैयक्तिक कौटुंबिक कर्तव्ये यालाही योग्य न्याय देत असते..


या समितीच्या प्रमुख शीतल सावंत या उत्तमपणे, आपल्या शिलेदारांसह गेली अनेक वर्षे ही जबाबदारी एक हाती सांभाळत आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक, अभिनंदन आणि पुढेही असेच काम करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..


परिक्षक


स्पर्धा म्हणली की त्याचे परीक्षण करण्यासाठी योग्य परिक्षक हवे..


हे निवडताना त्या विषयाची आवड, प्राविण्य, अनुभव याचा विचार करून तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जाते..


याशिवाय विषयाशी संबंधित पालकांचीही यासाठी निवड केली जाते..


यानिमित्ताने इतर शाळा संस्था या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती शाळेत भेट देतात आपले अनुभव मुलांना सांगतात, त्यांना प्रोत्साहित करतात..


अनेकदा अटीतटीची स्पर्धा, त्यातून मोजके क्रमांक निवडायचे यासाठी परीक्षकांची परिक्षा असते..


हे सारे अनुभव सर्वांनाच अधिक समृद्ध करतात..


बक्षीस समारंभ


समारोपाकडे येताना ज्या उत्साहाने सुरुवात झाली तितक्याच जोशात दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतो..


कोणीतरी जिंकते कोणालातरी हार पचवावी लागते या साऱ्यातून उद्याच्या धकाधकीच्या जीवन स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे नकळत अनुभव शिक्षण होत असते..


या स्पर्धेच्या नियोजन गटात सहभागी होऊन स्वतःला अनेक प्रकारे नव्याने प्रशिक्षित करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते..


अशा निखळ, निकोप स्पर्धा प्रत्येक शाळेमध्ये असल्या पाहिजेत असे मनापासून सुचवते आणि थांबते..