Tuesday, February 17, 2026

दुवा

 

मी माझे कुठेतरी जाणीवपूर्वक थांबविलेले, लेखन पुन्हा सुरु करायचे ठरवले..


तसे करताना अर्थात कोणाला विचारले वा सांगितले नाही..


माझे लेखन स्वान्त सुखाय असले तरी त्यावर माझ्याहून अधिक प्रेम, माया करणारे अनेक आहेत..


माझा व्यक्त होण्याचा, रिता होण्याचा  तो सहज, सोपा उपाय आहे, हेही अनेकांना माहीत आहे..


अशा सगळ्यांनी लेखन का बंद केली, याची विचारणा केली, मी माझ्याबाजूने उत्तरे दिली..


पण आपले लेखन इतरांना आनंद, प्रेरणा, स्वशोधन अजून अनेक गोष्टी देणारे असेल तर ते असे थांबवणे योग्य आहे का..?


असा प्रश्न त्रास देत होता, मग पुन्हा एकदा नव्याने लिहायला सुरू करुया..


मी लिहायचे ठरवते, पण मागे फिरून वाचताना, असे लिहिणे माझी क्षमता नाही, तर माझ्या माध्यमातून अज्ञात शक्ती लिहून घेते असे वाटते..


म्हणूनच मग मला आवडते यासाठी लिहिण्यापेक्षा अनेकांना वाचायला आवडते यासाठी लिहू या..


असे नव्याने ठरवले, मग  त्यासाठी संकल्प केला..


त्याला उचित वेळ मराठी दिन साजरा होतो, तो फेब्रुवारी महिना निवडला..


कारण मराठी भाषा माझ्यासाठी प्रेम, जिव्हाळा आणि हातखंडा आहे..


माझ्यासारखेच प्रेम मराठी भाषेवर अनेकांनी करावे या उद्देशाने हा लेखन प्रपंच सुरू केला..


त्यासाठी अर्थात अभ्यास, वाचन करावे लागणार होते..


हे मी करणार आहे, माझ्यासोबत तुम्ही सहभागी व्हा, असा विनंती, आग्रह करणारा संदेश पाठवला आणि त्यासोबत लेखनाचा पहिला आंतरजाल दुवा पाठवला (लिंक)..

दुवा..

इथे हा हिंदी मधला शब्द घेतला, तर प्रार्थना, विनवणी, आशीर्वाद या अर्थाने तोही योग्यच आहे..


पण मला मराठीत सांगायचे आहे..


ज्याचे पर्यायी शब्द जोडणी, संबंध, नात, सांधा असे आहेत..


माझे लेखन आणि रसिक वाचक यांना जोडणारा, सांधणारा, नवे नाते तयार करणारा असा तो दुवा, किती चपखल शब्द आहे ना ..? इंग्रजी लिंक या शब्दासाठी..!


आज हा विषय घ्यायचे कारण की व्यापार व्यवस्थापन आपल्या नकळत आपल्यावर अनेक प्रकारचे नवे खर्च लादत असतात..


कालचे पुष्प पाठवताना ब्रॉडकास्ट लिस्टची मोफत क्षमता संपली आहे, असा संदेश मिळाला..


अनेक गटांवर मला गेले, अनेक दिवस फक्त मीच संदेश पाठवत आहे असे जाणवले..


आणि माझ्या एका मित्राची आठवण झाली, ज्याचे म्हणणे आहे की ब्लॉगवर लिहिल्यावर प्रत्येक वेळी नव्याने असे दुवे (लिंक) पाठवण्याची गरज नसते..


ज्याला ते आवडतेे, त्याने सबस्क्राईब केले की आंतरजाल स्वतःहून आपले काम चोख करते..


तंत्रज्ञानात खूप तज्ञ असणाऱ्या त्या मित्राचे अगदी योग्य असले तरीपण शेवटी ते यांत्रिक काम, त्यास भावनेचा ओलावा कसा असणार..?


माझ्यासाठी ती लिंक नाही दुवा आहे..


माझ्या वाचकांना माझ्याशी जोडणारा, जे दैनंदिन कामात खूप व्यस्त असतात..


आंतरजाल एकदा आठवण करून सोडून देते, मी पाठवलेला दुवा थोडा रिकामा वेळ मिळाला की खुणावतो..


हा दुवा सहज पुढे पाठवता येतो, त्यातून नवी नाती तयार होतात, नवे रसिक वाचक लाभतात..


असे असले तरी परवा एका चित्रपटात असे अनेक संख्यात्मक जास्तीच्या माहितीचे व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान असा प्रकल्प पाहिला..


आणि ठराविक काळानंतर सगळे संदेश आपोआप पुसले जावे, हा कायप्पाचा गुण (व्हॉटस् फिचर्स ) आठवला..


शिवाय कालच्या संदेशात विशिष्ट उद्देशाने नवा गट (व्हॉटस् अँप गृप) तयार करा असे सुचविले होते..


म्हणले चला आज हाच विषय मांडूया..


नुसता माझ्या वाचन प्रेमी रसिकांचा नवा गृप बनवते आहे, हा त्याचा दुवा इतके कोरडे सांगण्यापेक्षा, यात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करू या, हे ठरवून आजचे लेखन केले आहे..


लिंक या इंग्रजी शब्दाची भावनिक मांडणी करण्याचा मोह आवरला नाही इतकेच..


मांडलेले आवडेल पटले असेल,  थोडक्यात नसणारे माझे लेखन वाचायचे असेल.. तर माझ्या गटात जरूर सहभागी व्हा, इतरांनाही हा दुवा नक्की पाठवा..


https://chat.whatsapp.com/FfXePIjrjjPLNrp4LfsLg7?mode=gi_c


Monday, February 16, 2026

बाबा

मराठीत व्याकरण शिकवताना, बाबा या शब्दासाठी कितीतरी समानार्थी शब्द आहेत..

जन्मदाते, जनक, पिता, तात, तीर्थरूप, बाप, वडील..

शब्दकोश अर्थ 

एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष..

वडिलांना उद्देशून वापरायचा आदरार्थी बहुवचन किंवा आता एकवचन..

वयस्कर व्यक्ती आदरसूचक संबोधन..

साधूसंत इत्यादींसाठी आदरार्थी संबोधन..


जेंव्हा मला माझ्या बाबांविषयी कोणी विचारते, तेंव्हा ही यादी अगदीच थिटी वाटते..


माझ्या आजवरच्या प्रवासात बाबा हा फक्त संबोधन, तेही एक आणि एकाच व्यक्तीसाठी अनुभवलेला शब्द आहे..


ज्याला दुसऱ्या कोणत्याही, एका शब्दात व्यक्त करताच येणार नाही..


माझे बाबा म्हणजे कोण हे सांगणारा दुसरा शब्द व्यंकटेश एकनाथ पांडे, राहणार - अ ६ प्रबोधन गृहरचना सेक्टर २६ निगडी पुणे ४११०४४ (पत्ता हवा कारण एक नाव, मधले नाव आणि आडनाव समान असणाऱ्या अजून व्यक्ती असू शकतात असा एक अनुभव ऐकला आहे)


तर व्यंकटेश एकनाथ पांडे हाच पर्यायी शब्द..


एका शब्दात सांगावे असे, कुणाचेही बाबा नसतात..

माझे तर नव्हतेच..


माझ्यासाठी ते आरसा होते, मला त्यांच्यात मी सापडत जावे असे कितीदा अनुभवले..


मी त्यांच्यासारखी दिसते का..? यापेक्षा गुणांनी मी त्यांच्यासारखी आहे का, हे अधिक महत्त्वाचे वाटते..


तर हो, मी खूप त्यांच्यासारखी आहे..


ते कसे होते, हे सांगणारे हे चित्र मी तीन वर्षांपूर्वी बनवले होते..

उत्तम गुणांची यादी संपेल, पण  त्यापलिकडे जाऊन बाबांचा नवीनच गुण अनुभवलेले अनेक भेटतील..

असे गुण माझ्यात यायला हवे, यासाठी मी खूप धडपड करत होते, असते आणि राहील..


एकच सल आहे की हे सारे त्यांनी वाचावे, त्यावर मस्त प्रतिसाद द्यावा, जवळ बोलावून डोक्यावर हात ठेवावा यासाठी ते शरीराने आज नाहीत..


पण.. पण.. पण..


माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुःख, आनंद, यश, अपयश काहीही असले तरी आशीर्वाद, कृपा बनून ते नेहमी असतील ही खात्री आहे..


चुकत असेल, तर काहीतरी संकेत नक्की देतील, आनंदात पाय जमिनीवर ठेण्यासाठी मदत करतील..


कारण बाबा माझ्यात अनेक प्रकारे रुजले आहेत..


प्रसंग, परिस्थिती यांच्या गरजेनुसार ते नित्य नव्याने मला, त्यांच्या जवळ असणाऱ्या आप्तजनांना आणि इतर अनेक, सर्वांना भेटत राहतील..


आता असे वाटेल की आज या लेखनाचा काय प्रपंच..


तर १६ फेब्रुवारी १९५० हा त्यांचा वाढदिवस..


१६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्यांनी स्वतःहून ठरवले, की व्यंकटेश एकनाथ पांडे म्हणून हा जन्म यश अपयश, सुख दुःख, सामाजिक कर्तव्य-सेवा, प्रवास एक ना अनेक प्रकारे उत्तम अनुभवला आहे, आता थांबू या..


आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे ४ मार्च २०२३ ला त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला..


त्यांची ही स्वेच्छा समजायला आणि स्वीकारायला मला पुरी तीन वर्षे लागली..

आज बाबांची पंचाहत्तरी आहे, 


त्याबद्दल काव्य पंक्तीत सांगते,


माझ्या बाबांची तुम्हाला सांगू काय  गोष्ट..

येथवर येण्यासाठी त्यांनी केले किती कष्ट.. 


असो प्रश्न, समस्या, अडचणी कितीही..

यांचा चेहरा असणार, हसराच तरीही..


भरल्या गोकुळासम घर आमचे असते..

कोणत्याही गोष्टींची तिथे कमी नसते..


आम्हा नातलगांना जोडणारा, बाबा धागा घट्ट..

झालो मोठे कितीही, तरी पुरवतात आमचे हट्ट..


आईसोबत सांभाळतात, संसाराचा गाडा..

मिळत राहतो सर्वांनाच, नित्य नवा धडा..


आर्थिक गणिते सदा, अचूक त्यांनी  सांभाळली..

समाजातही आदर, मान, प्रतिष्ठा कमावली..


साजरी करण्या आज, बाबांची पंच्याहत्तरी..

किती शोधल तरी, शब्दसुमने पडतात अपुरी.. 


बाबा, 

तुमच्या साऱ्या इच्छांसाठी, परमेश्वर असो दक्ष..

लक्ष चौऱ्याऐंशी फेरे संपून, आता लाभो तुम्हा मोक्ष..

आता लाभो तुम्हा मोक्ष..!


शुभं भवतु.. !



Wednesday, February 11, 2026

वृत्तीघडण


आज दास नवमी, आजची लेखन सेवा.. रामदासांच्या चरणी 🙏🏻🙏🏻

ज्यांचा राष्ट्रसंत म्हणून गौरव झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून जे सर्वज्ञात आहेत.. 

सावधान हे शब्द ऐकताच बोहल्यावरून पाय उतार केला, पण संसार कसा करावा, हे ज्यांनी मांडले अशा थोर व्यक्ती विषयी लिहिण्याची माझी नक्कीच पात्रता नाही..

पण त्यांच्या दासबोध ग्रंथातून निवडक वचनांची संकलित १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे ही लहानपणी शाळेत असताना सक्तीने पाठ केली..

पुढे जाऊन त्यातील लयबद्धता, एकत्रित म्हणण्याची गंमत यामुळे अधिक आवडू लागली..

जेंव्हा त्यामागील अर्थ उमजू लागला, तेंव्हा नकळत आपली कृतीही अशीच असायला हवी, असे वाटून तसा प्रयत्न होऊ लागला..

मग या प्रयत्नांची सवय होऊन, ती वृत्ती आणि मग उत्तम वागण्याची तत्त्वे बनली..

आज हे सांगण्याचे कारण म्हणजे बहुतांश शाळा या, फक्त पुस्तकी अभ्यासक्रमामागे धावताना दिसतात..

आपल्या संस्कृतीची पाळेमुळे कुठे आहेत, हे अचूक हेरून त्यावर घाव घालणारे इंग्रज १९४७ ला भारतातून निघून गेले..

पण त्यांनी शिक्षणाची केलेली वाताहात आजही तशीच आहे..

आजची मुले भोग विलासी, स्वतःमधे  रमणारी, अंधानुकरण करणारी बनली आहेत, हे म्हणताना शिक्षक, पालक म्हणून आपण सजग आहोत का..?

उत्तम फळे देणारा कल्पवृक्ष हवा, तर तसे बीज आपण पेरत आहोत का..?

जे बीज वाढायला, तशी कृती आपल्या आई, वडील, शिक्षक यांच्या कृतीत त्यांना बघायला मिळते आहे का..?

असे अनेक का जेंव्हा उभे राहतात, तेंव्हा मी अशी का नाही बनले, हा उलटा प्रवास केला की आठवते..

घर, शाळा दोन्ही ठिकाणी असे श्लोक, स्तोत्र यांचे नित्य पठण व्हायचे, त्यातूनच एक विचारधारा तयार होत गेली.. 

तशीच कृती आईबाबा सहज करतात, त्याचे अनन्वित फायदे आणि आशीर्वाद असतात, हे अनुभवातून समजल्याने, एक चांगला माणूस होण्यासाठी नित्य धडपड चालू असते..

मुद्दाम चालू असते असे म्हटले, कारण कलियुगात सूर आणि असूर एकाच देहात राहणार हे कटुसत्य आहे..

आणि नरदेहाचे षडरिपू यामुळे अनावधानाने चूक होऊच शकते..

पण होऊ नये हा प्रयत्न असतो, आणि त्यासाठी सद्वैव आशीर्वाद देणारी ही समर्थांची उत्तम पुरुष लक्षणे, तुम्ही वाचावी, समजून घ्यावीत..

जमल्यास त्यानुसार मार्गक्रम करावा असे सुचवते..

शाळा मराठी माझी.. शाळा मराठी..

 या सध्या सगळ्यांना मोहित करणाऱ्या गीताचे शब्द थोडे अधिक अर्थपूर्ण करत..

शाळा सद् विचारी माझी.. शाळा सद् विचारी ..

असे अभिमानाने म्हणत, ज्ञानाची भूक लागावी हा विचार देणाऱ्या माझ्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, आणि ही वचने शाब्दिक नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीत आणता येतात हे दाखवणारे माझे आई बाबा, अनेक शिक्षक यांना मनापासून साष्टांग प्रणाम करते..

असे शिक्षण सर्वांना लाभो, ही प्रार्थना करते..


मी शिकलेली १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे..


आपण यथेच्छ जेवणे, उरले ते अन्न वाटणे |

परंतु वाया दवडणे, हा धर्म नोहे || १ || 


तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचि ज्ञान जनास सांगावे |

तरतेने बुडो नेदावे, बुडतयासि || २ ||


उत्तम गुण स्वये घ्यावे, तेची बहुतास सांगावे |

वर्तल्यावीण बोलावे, ते शब्द मिथ्या || ३||


स्नानसंध्या देवार्चन,एकाग्र करावे जपध्यान |

हरिकथा निरूपण, केले पाहिजे || ४||


शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे |

उणे पडो नेदावे, कोणी येकांसी ||५ ||


आडले जा कसले जाणावे, यथानुशक्ती कामास यावे |

मृदूवचने बोलत जावे, कोणी येकांसी || ६||


दुसऱ्याच्या दुःख दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे |

प्राणीमात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे || ७||


बहुतांंचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे |

आपल्या परीस व्हावे, पारखे जन ||८ ||


दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारचि वर्तावे |

लोकांस परिक्षीत जावे, नाना प्रकारे|| ९||


 नेमकेच बोलावे, तत्काळचि प्रतिवचन द्यावे |

कदापि रागास न यावे, क्षमारूपे || १०||


 आळस अवघाची दवडावा, यत्न उदंडची करावा |

शब्द मत्सर न करावा कोणी येकांचा || ११||


उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा |

सावधपणे करीत जावा, संसार आपला || १२||


मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तिसी सादर व्हावे |

मरून कीर्तीस उरावे, येणे प्रकारे || १३||


ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष |

जयाच्या भजनी जगदीश, तृप्त होय || १४||


 उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला |

तोचि एक जाणावा खरा, भू-मंडळी || १५||


 पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते |

तरी मग कर्कश बोलावे, ते काय निमित्ते || १६||


आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांस सुखी करावे |

परंतु कष्टी करावे, ही राक्षसी क्रिया || १७||


जो उत्तम गुणी शोभला, तोचि महापुरुष भला |

कित्येक लोग तयाला, शोधीत फिरती || १८||


याचे अनुभव आधारीत, गोष्टीरूप अर्थ विश्लेषण करायला जरूर आवडेल, पण ते अर्थात समोरासमोर..


समर्थ रामदास स्वामींच्या वचनांची शिदोरी जशी मला लाभली, तशी सर्वांना लाभो हीच श्री राम चरणी प्रार्थना करते आणि थांबते..

Tuesday, February 10, 2026

उठा उठा चिऊताई

रोज पानभर लिहायचे असे ठरवले, तरी नेमके काय हे निश्चित नसते..

पण जिथे हे सारे माझे नाही, तर ही लेखनसेवा माझ्या माध्यमातून कोणती तरी शक्ती करून घेते असे मला वाटते..

तेंव्हा तिच्या मार्फत नकळत दिनक्रमात नवे विषय मिळतात..

असेच काहीसे घडले..

या आधीच्या एका लेखात कविता रसग्रहण या बद्दल मांडले, तशीच अजून एक नवी गंमत झाली आणि हा नवा विषय मिळाला..

झाले असे की, २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी, कवी कुसुमाग्रज यांची एक कविता तिसरीतील विद्यार्थ्याने म्हणावी असे ठरवले..

त्यासाठी त्याची तयारी करून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा करत होते..

विद्यार्थी प्राथमिक वर्गात असल्याने वयोगटाला आवडेल, समजेल अशी कविता निवडली..

उठा उठा चिऊताई..  सारीकडे उजाडले..

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

कवितेचा छान ध्वनी चित्ररूपी  दुवा ( युट्यूब वरील ॲनिमेटेड गाण्याची लिंक) पालकांना पाठवली..

पण कदाचित, रिॲलिटी शोच्या युगात माझ्या चिमुकल्या मित्रांनी त्यांच्या वयानुसार काही सादर करणे पालक, समाज यांना आवडत नाही किंवा अपरिपक्व वाटते..

पालकांकडून आम्ही कणा कविता तयार करून घेऊ का..?, तुम्ही पाठवलेली फारच बाळबोध वाटते आहे, असा नम्र प्रस्ताव आला..

यावर सर्वप्रथम त्यांच्या नम्र विनवणीचे कौतुक वाटले..

तोच धागा पकडून म्हटले, सांगायचा एक मुद्दा असा आहे की कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे , ती पहिली ते तिसरीची म्हणजे लहान वयोगटाची मुले आहेत, त्यानुसार अगदीच छान आहे चिऊताईची कविता..

कणा कविता अनेकदा मोठ्यांनाही समजत नाही, मग उगाच सादरीकरण भारी होते, म्हणून तीच हवी हा अट्टाहास कशाला..?

याउलट वयानुरूप गाणी, गोष्टी समजून, उमजून अधिक छान मांडता येतात..

आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी तुम्हाला पाठवलेला दुवा ( गाण्याची ॲनिमेटेड लिंक) यामुळे चिऊताईची कविता जरी छोट्यांसाठीची वाटली, तरी त्यातल्या प्रत्येक शब्दामागे असणारा भावार्थ खूप मोठा आणि गहन आहे..

बघा हं, मला उमजला गर्भित अर्थ मांडते..

उठा उठा चिऊताई .. सारीकडे उजाडले 

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

सूर्योदय होऊन न उठणारी चिऊताई निसर्गात सापडणे केवळ अशक्य..

ती सापडेल ती मानवी विश्वात..

मग इथे चिऊ.. चिमणी असेल किंवा चिमणा..

त्यांच्या न उठण्याचे कारण काय  बरं असेल..?

कंटाळा, आळस, हार की निराशा..?

थोडक्यात नित्याच्या भाषेत सांगायचे ताण तणाव.. डिप्रेशन..?

अशा मानसिक, भावनिक आंदोलनांना सामोरी जाणारी ही चिऊताई एक तर या त्रासाच्या ग्लानीत आहे किंवा झोपेचे सोंग घेत आहे..

सोनेरी हे दूत आले, घरट्याच्या दारापाशी,

डोळ्यांवर झोप कशी, अजूनही, अजूनही..?

आता लहान मुलांच्या कवितेत सोनेरी दूत म्हणजे रवी किरण, सूर्यप्रकाश..

पण अधिक खोलवर विचार केल्यास..

तणावाच्या अंधाराला दूर सारण्यासाठी मदत करणारे, पहिले स्वतःचे मन, नंतर नातलग, मित्रमंडळी, उत्तम वाचन, श्रवण आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत हे सारे सोनेरी दूत नाहीत का..?

इतके सगळे आले तरी चिऊताईची झोप संपत कशी नाही..?

लगबग पाखरे ही, गात गात गोड गाणे,

टिपतात बघा दाणे, चोहीकडे, चोहीकडे..!

इथे चिऊताईला नकळत सुचविले आहे, की तू स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरीही त्याने इतरांना फार काही फरक पडणार नाही, त्याचे दिनक्रम चालू आहेत आणि राहतील, त्रासात फक्त तू आहेस..

झोपलेल्या अशा तुम्ही, आणायाचे मग कोणी,

बाळासाठी चारापाणी, चिमुकल्या, चिमुकल्या..?

चिऊताईला दिलेली ही हाक, तिच्या सोंगरुपी झोपेवर अंतिम वार आहे..

तू स्वतःचे प्रश्न, समस्या, दुःख इतकं मोठं करून बसली आहेस, की तुला तुझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, प्रेमी आप्तजन या सगळ्याचा विसर पडला आहे, तुझ्या या वागण्याने त्यांना होणारा त्रास याला तू आणि तूच कारणीभूत आहेस..

समेला येताना..

बाळाचे घेता नांव, जागी झाली चिऊताई,

उडोनिया दूर जाई, भूर भूर, भूर भूर..!

आणि आधी म्हणल्याप्रमाणे वार शेवटचा असला तरी, तो नेमका वर्मी बसल्याने, दुःख.. चिंता.. अपयश एक ना अनेक प्रश्न समोर उभे ठाकले, तरी त्या साऱ्यांना चोख उत्तर देण्याची प्रेरणा चिऊताईला मिळाली आहे..

आणि सगळ्या गोष्टींवर आपली आपण उत्तरे शोधायला, ती घरट्यातून बाहेर पडली आहे..

आता सांगा बरे, वरवर सहज, सोपी शब्द रचना असणारी ही बाल कविता वेगळ्या प्रकारे समजून घेतली, तर मानवी जीवनाची मोठी लढाई सुचवून जाते की नाही..?

अर्थात हे सारे मला भाषेच्या उण्यापुऱ्या ज्ञानाने झालेले आकलन, अधिक अभ्यासू मंडळी यात नक्कीच भर टाकू शकतील..

पण यातली  गंमत इथे संपलेली नाही..

त्यानंतर  इयत्ता दुसरीच्या वर्गात दैनंदिन अभ्यास करून दहा मिनिटे वेळ शिल्लक होता..

अगदी सहज मी हे गाणे मधे मधे थांबवून नव्याने येणारे शब्द, जसे की  सोनेरी किरण, पाखरे, चहुकडे, लगबग, टिपणे इ. त्यांचे अर्थ, संदर्भ सांगत मुलांना दाखवले..

मुलांनी गाण्यासोबत गुणगुणत, डोलत मनसोक्त आनंद  घेतला,  त्यानंतर मी उगाच गमतीशीर प्रश्न विचारला..

ही चिऊताई कोण आहे माहिती आहे का.. ?

माझ्यासाठी झोपलेली चिऊताई म्हणजे तुम्ही सगळे आहात..!

जी शिक्षक शिकवत असताना, कुठेतरी वेगळ्याच गोष्टी करणारी झोप काढतात (पेन्सिलीला टोक कर, गप्पा मार, वेगळ्या वही पुस्तकात..वेगळेच काहीतरी कर..) आणि जसे शिक्षक स्टिकर स्टार देईल असे आमिष दाखवतात, तसे सगळ्यातून जागे होत तुम्ही चालू गोष्टींकडे लक्ष देता..

आई बाबा सांगतात की रोज अभ्यास कर, तेंव्हा कंटाळा, आळस, दुर्लक्ष अशी झोप घेणारे तुम्ही परीक्षा आली असे म्हणाल्या बरोबर जागे होता.. 

आहात ना मग तुम्ही म्हणजे ही चिऊताई..उगाच झोपेचे सोंग घेणारी..?

आश्चर्याची गोष्ट इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या, मराठी भाषेचे फार कमी शब्द भांडार असणाऱ्या माझ्या या बालमित्रांना मी जे बोलत होते ते सारं नुसतं समजत नव्हते, तर मनापासून पटत होते आणि त्याची गंमत वाटत होती, मनापासून हसत नाही नाही आम्ही असे नाही करत अशी दाद त्यांच्याकडून मिळत होती..

असे हे जेष्ठ, श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण मला एक वेगळा आनंद आणि उर्जा देऊन गेले..

त्यात तुम्हाला सामील करावे असे वाटले म्हणून आज हा लेखनाचा घाट घातला..

जमला का सांगायला विसरू नका..

Sunday, February 08, 2026

प्रकट दिन

 


देव असतो का..? कुठे असतो..? कसा दिसतो..? अमूर्त की मूर्त..? मूर्त असेल तर, त्यातल्या कोणत्या मूर्त स्वरूपाची भक्ती करायची.. ? का करायची..? कशी, कधी करायची..?


असे कोणतेही प्रश्न ना कधी पडले, ना यापुढे पडतील..!


चराचरातील चल वा अचल, प्रत्येक बाब ही एका शक्तीची निर्मिती आहे..


आणि आपल्या निर्मितीचा सांभाळ, प्रगती या साऱ्याची जबाबदारी ती शक्ती प्रेमाने करते, ही भावनाच  किती सुंदर आहे ना..!


अशा शक्तीकडे आपली सुख-दुःख, यश-अपयश ही सारी ओझी सोपवली की आपण किती निश्चिंत होऊ शकतो, हा कुणी सांगण्याचा नाही, तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे..


या अनुभवांना अनुभूती म्हणतात..


अमूर्त, अज्ञात शक्तीचे खऱ्या स्वरूपाचे दर्शन व्हावे, जसे श्रीकृष्णाने यशोदा मातेला, अर्जुनाला दिले..


गुरु रामकृष्ण परमहंसांचे मार्गदर्शन नि स्वतः पराकोटीची ध्यान धारणा केल्याने स्वामी विवेकानंदांनी अनुभवले..


तसे आपल्या सारख्या अति सामान्य मानवास होणे, केवळ अशक्यच..


पण जर आपण वेद, उपनिषद, भगवद्गीता यात सांगितल्याप्रमाणे सत्कर्म, सद्वर्तन, सहृदयता या मार्गाने चाललो, तर त्याचे फळ म्हणून शक्तीची प्रचिती नक्की मिळते, हा स्वानुभव आहे..


कधीही न सुटू शकणाऱ्या समस्या सहज संपतात..


कठीण परिस्थितीत तन, मन, धन सर्व प्रकारे सहाय्य लाभते..


मग विषय पुन्हा मूळ पदावर.. की ही शक्ती कोणत्या मूर्त रूपात बघायची, पुजायची..


अंदाजे सहस्र कोटी संख्या, सोबत काळानुकाळ सांगूनही संपणार नाहीत अशा रंजक कथा यांनी समृद्ध असलेल्या आपल्या आर्य जन्मभूमीच्या संस्कृतीत खूप सारी भव्य, दिव्य सगुण, मोहून टाकणारी मूर्त रूपे आहे..


तुम्ही त्यातल्या कोणत्याही एक वा प्रसंगानुरूप अनेकांची निवड करू शकता..


त्याने काहीच फरक पडत नाही, कारण निस्वार्थ प्रेम, भक्ती, साधना इतकीच अपेक्षा असणारी ही मातृ पितृ स्वरूप शक्ती, तुम्ही निवडलेल्या प्रत्येक मूर्त स्वरूपात वास करते..


फक्त तुमची भक्ती निस्वार्थ आणि हाक आर्त असायला हवी..


आधी म्हटल्याप्रमाणे, शक्ती आहे, नि तिच्या अस्तित्वाची प्रचिती वेळोवेळी अनुभवली आहे.. 


त्यामुळे प्रसंगानुरूप ती शक्ती विविध रुपात बघायला आवडते..


एकादशीला विठोबा संगती संत मंडळी, महाशिवरात्रीला शंकर, गोकुळाष्टमीला बाळकृष्ण, गणेशोत्सवात लाडका बाप्पा, नवरात्रीत रोज नव्या रूपातली देवी, कुळाचार करताना कुलदैवत इथपासून ते अनारोग्य रोखणारी वेशीवरची मरीआई ही देखील प्रेमाची आहे..


पण..


जेंव्हा सण नाही, उत्सव नाही, रोजमितीला ज्यांचा नामजप नेहमी आनंद, मनःशांती देतो, समस्या निराकरण करण्यासाठी लढण्याचे बळ देतो, यशात पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी देतो, सुख द्विगुणित करतो, थोडक्यात सांगायचे तर..


किती वर्णू सांग माझ्या, दैवताचे गोडवे..

नाम स्मरता नुसते, बळ हत्तींचे संचारे..


ते दैवत, गुरुपद म्हणजे, शेगाव निवासी श्री गजानन महाराज.. 🙏🏻🙏🏻


आता ओघाने येणारा प्रश्न, ही निवड केली कशी, कधी, कोणी..?


त्याला मिळणारे पटकन उत्तर..


पूर्वसंचित..


लहानपणी आईबाबांसोबत वर्षातून एकदा शेगाव वारी असायची, तेंव्हापासून त्या परिसरातील उर्जा, शांतता, स्वस्थता अनुभवली आहे..


अनेक वेळा तोबा गर्दी असूनही काही तासच दर्शनासाठी लागत, त्यावेळी तिथे असणाऱ्या जमावाला ना घाई असायची, ना त्रस्तता, अखंड नामजप करत, वेळ अगदी सहज निघून जायचा, लहान वयात त्या रांगेत बागडायला मजा यायची..


सिंधू आजी म्हणजे बाबांची आई तिच्याबरोबर घराजवळ असल्या महाराजांच्या मंदिरात अनेकदा सकाळ, संध्याकाळ आरतीसाठी जायचे, तो अनुभव तर अजूनच वेगळा, टाळ वाजवणारे ते चिमुकले हात, त्या नादमय वातावरणात रंगून मनसोक्त नाचणाऱ्या त्या बालपणीची आठवण आजही खूप आनंद, ताकद देते..


अशाप्रकारे लहान वयात या गुरूची, दैवताची तोंड ओळख झाली..


मंदिरात जाणे, जप करणे याचे आधी फक्त अनुकरण केले, त्याचे सवयीत रूपांतर कधी झाले कळले देखील नाही..


शेगाव आणि घराजवळील मंदिर या दोन्ही ठिकाणी नियमित जाणे होते, आहे आणि राहील, तिथल्या अनेक आठवणी, घटना या आजवरच्या प्रवासाला नवीन वाट, यश, आधार देणाऱ्या आहेत..


तिथले महाराजांचे (अमूर्त शक्तीचे) वास्तव्य नक्की अनुभवास येते, फक्त तशी हाक हृदयातून आली पाहिजे..


या पलिकडे जाऊन इतर शहरात जिथे गजानन महाराजांची मंदिरे आहेत, जसे की चिंचवड, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर इ. त्या सर्व वास्तू देखील, अस्वस्थ मनाला स्वस्थ करणाऱ्या, अशांत जीवाला शांतता देणाऱ्या, थकलेल्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत..


याचे कारण समान व्यवस्थापन व्यवस्था, महाराजांची सर्व भक्त मंडळी एका वेगळ्या नियोजनाने एकमेकांशी जोडलेली आहेत..


नव्याने कुठेही मंदीर स्थापन झाले की त्यांना या व्यवस्थेचा भाग व्हावे लागते, समान नियमावली, पद्धती राबवावी लागते..


ज्यात दर्शन वा इतर कोणत्याही बाबतीत आर्थिक गणिते (दर्शन पास ) कोणालाही प्राधान्य देत नाहीत..


प्रत्येक भक्ताचा संत परंपरेनुसार आदर करणे, सूचना देताना प्रथम माऊली ही हाक देणे, नियमांचे पालन करण्यासाठी प्रेमाने सुचवणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत..


असे वाटेल की लहान मंदिरांच्या जागी हे करणे सोपे असेल, तर हा अनुभव एकदा शेगावी जाऊन नक्की घ्या..


आजच्या आंतरजाल युगात यां विषयीची माहिती गुगलवर जरूर बघा..


फक्त भारतीयच नाही तर अनेक परदेशी व्यवस्थापन शिकविणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांना उत्तम व्यवस्थापन कसे असते, कोणताही आर्थिक मोबदला मिळत नसून, सेवा करण्याची इच्छा, व्रत, नवस यासाठी महाराजांची भक्त मंडळी अनेक कामे सुनियोजित, विना सक्ती, ना सूचना, ना दुराग्रह तरीही मनापासून शांतता, स्वस्थता, आदर भावनेने करत असतात..


मंदीर परिसरात रांगेत जा उगाच गर्दी करू नका, भोजनगृहात पोटभर खा पण टाकू नका, स्वच्छता राखा, तेथील अन्न वाढप, त्यानंतर उष्टी ताटे आवरून त्यांची स्वच्छता, शिवाय भक्त निवास व्यवस्था.. किती आणि काय काय कामे चालू असतात पण कुठेही आरडाओरडा नाही, की गोंधळ नाही..


देणगी स्वीकारण्याची पण वेगळीच पद्धती, त्यातही सहजता, शिस्त.. 


जमा झालेल्या अर्थाचा विविध सामाजिक कामांसाठी वापर..


अजूनही अनेक गोष्टी सांगता येतील, पण त्यापेक्षा त्याचा अनुभव घ्यावा हेच अधिक योग्य वाटते..


चांगले विचार, उन्नतीची दिशा, भक्ती मार्ग दाखविण्यासाठी अमूर्त शक्ती गजानन महाराजांच्या रूपात शेगावात माघ वद्य सप्तमी शके १८०० मध्ये प्रकट झाली..


आज ती तिथी म्हणजेच प्रकट दिन..


तर सांगायचा मुद्दा असा की माझ्यासारखी अति सामान्य व्यक्ती, मानवी जन्म अनुभवताना, माझा मीपणा संपून जावा, नि विश्वाचा पसारा वाहणाऱ्या शक्तीने मला आपलेसे करावे..


या माझ्या मानवी देहाद्वारे सदैव सत्कर्म होण्याचे दान पदरी टाकावे यासाठी ज्यांना गुरुस्थान दिले, त्या गजानन महाराजांच्या चरणी आजची लेखनसेवा..


मी आणि माझे कुटुंब यांच्यावर जशी महाराजांची सदैव कृपा होते, तशीच तुम्हावरही होवो हीच सदिच्छा..


जय गजानन..🙏🏻

Friday, February 06, 2026

रसग्रहण

भाषा शिकताना फार लहान वयात कवितेच्या ओळी सोदाहरण स्पष्ट करा, रसग्रहण लिहा, भावार्थ सांगा.. अशा प्रश्नांची ओळख हीच अनेकदा मुलांना कविता, गाणी या साहित्य प्रकारापासून दूर नेतात कदाचित..

परवा गप्पा मारताना असाच विषय झाला, गंधार संभाजी महाराजांच्या एका महाकाव्याविषयी सांगत होता, आणि ते ऐकणारी माझी मैत्रिण पटकन म्हणाली, मला नाही झेपत कविता.. 

लहानपणी शाळेत कवीला काय म्हणायचे, असे बाईंनी विचारल्यावर मी म्हणाले होते की मी तर कवींना भेटले नाही, मला कसे माहित असेल त्यांना काय म्हणायचे आहे..इति मैत्रिण..

एकीकडे मला तिच्या या सहज प्रतिसादावर मनापासून हसू आले, आणि दुसरीकडे शिक्षक कसे चुकीच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापनाचे प्रश्न प्रकार यामुळे नकळत त्या विषयाची नावड, भीती निर्माण करण्यास कारणीभूत होतो हे जाणवले..

पण सगळेच शिक्षक किंवा त्यांच्या विषय शिकवण्याच्या पद्धती अशा सदोष नसतात हे सांगणारा आजचा अनुभव..

विषय - कविता रसग्रहण... कविता - प्रेम कर भिल्लासारखं

कवी - कुसुमाग्रज ... रसग्रहण शिकविणारे शिक्षक - जोर्वेकर सर

शाळेतून कॉलेज असा प्रवास सुरू झाला, तो पहिला आठवडा.. 

तास ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स (ओसी)..

शिकविणारे जोर्वेकर सर वर्गात आले आणि म्हणाले की सर्वत्र गुलाबी रंग दिसणाऱ्या तुम्हा सर्वांचे स्वागत, पण या रंगाला, मी एक दिशा देणार आहे..

माझा ओसी विषय मी वर्षभर मनापासून शिकवणार आहेच, पण आज मराठी साहित्यातील एक दैवत, कवी कुसुमाग्रज यांच्या एका प्रेम कवितेची खास मांडणी तुमच्यासाठी करणार आहे.. (अर्थात सर त्यांच्या विषयात तितकेच पारंगत हे वेगळे सांगायला नको)

मग सरांनी सुरुवात केली, कवितेची एकेक ओळ, आवाजाचे अचूक चढउतार करत अशी काही सादर केली, की हे सारं कधी संपूच नये, त्यांनी सांगत राहावे आणि आम्ही ऐकत, असे वाटत होते..

ते कवितेचे फक्त सादरीकरण नव्हते तर, प्रत्येक शब्दातल्या बारीक सारीक अर्थ छटा, त्यांची जीवनात अनुभवायला मिळणारी मार्मिक तरी गमतीशीर उदाहरणे होती..

वयाच्या अतिशय नाजूक टप्प्यावर असणाऱ्या आम्हाला, स्वप्नातून जागं करणारी प्रेम या विषयाची व्यावहारीक पण तरीही तरलता जपणारी ओळख सरांनी त्यादिवशी करून दिली..

पुढे जाऊन खऱ्या अर्थाने प्रेमात पडताना, सरांचे शब्द वेळोवेळी आठवत होते, त्यांनी नाट्यरुपात, गमती करत सांगितलेला अर्थ, भावार्थ.. ते पडणे सुसह्य आणि अधिक जाणिवेने झाले..

या कवितेत कुसुमाग्रजांनी खूप नेमक्या शब्दात, प्रेमाच्या गुलाबी रंगासोबत येणाऱ्या जबाबदारी , कर्तव्ये, बंधने अशा एका ना अनेक व्यावहारीक रंगांच्या साऱ्या छटा एकेका शब्दाने बखुबी गुंफल्या आहेतच, पण सरांनी त्या अधिक जिवंत केल्या..

या घटनेला २७ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, पण आठवण अगदी आज दुपारी घडल्याप्रमाणे आहे..

कविता सरांच्या संदर्भासहित , नाट्य पद्धतीत आणि सोबत माझ्या प्रेमाचे किस्से ऐकत अनुभवायची असेल तर नक्की सांगा, तशी एक मैफील भरवू या..

आजचा अध्याय समाप्तीला एकच विनंती करेन..

भाषा जितकी सहज, सोपी.. तितकीच खोल, गहिरी असते..

ती अनुभवताना काही चुकीचे अनुभव, चुकीच्या व्यक्ती, प्रश्न प्रकार, परीक्षा असे अडथळे मधे  येऊन वाट अडवतील..

पण त्यास त्यांच्या मर्यादा समजून, एका प्रबोधन गीतात म्हणल्याप्रमाणे..

मर्यादांना मर्यादून..?    छे ss त्यांना उल्लंघुनी..

पुढे पुढे चालणे असू दे .. हेच ध्येय तव मनी.. 

हेच ध्येय तव मनी.. 

स्वतः स्वतःची पद्धत शोधा, वाट बनवा.. पण प्रवास थांबवू नका..

तुम्हाला नवी पद्धत लाभो, नवे उत्तम शिक्षक, मित्र मिळोत आणि..

भाषाभ्यासाचा ध्यास लागो, हीच सदिच्छा..!

Monday, February 02, 2026

श्रवण

 

श्रवण, संभाषण, वाचन आणि सर्वात शेवटी लेखन हे भाषा आत्मसाद करण्याच्या पायऱ्या आहेत.. 

भाषेची ओळख होते तेच, श्रवण म्हणजेच ऐकण्यातून..

सामान्य मूल खूप लहान वयातच विशेष प्रयत्न न करता, फक्त ऐकणे आणि निरीक्षण करणे यातून घरात, परिसरात बोलल्या जाणाऱ्या एक वा त्यापेक्षा अधिक भाषा सहज शिकते..

त्यात अधिक नेमकेपणा, समृद्धता हवी असेल, तर त्यासाठी तशा पद्धतीचे ऐकावे लागते..

मी लहान असताना म्हणजे साधारण ३५-४० वर्षांपूर्वी, भाग्य म्हणावे की काय माहित नाही, पण प्रसार माध्यमे नेमके आणि उत्कृष्ट दर्जाची होती..

दूरचित्रवाणी ( फक्त दूरदर्शन), आकाशवाणी आणि टेपरेकॉर्डर, इतक्याच साधनांच्या मार्फत दैनंदिन कामाव्यतिरिक्त गोष्टी ऐकण्यास उपलब्ध होत्या..

त्याद्वारे लहानपणी छान छान गोष्टी, नंतर थोडे मोठे झाल्यावर चित्रपट गीते, कथाकथने भरपूर ऐकली, त्यांची पारायणे केली..

त्यात निखळ मनोरंजन होते, नि सोबतच येता जाता चांगल्या विचारांची पेरणी होती..

आज स्टँडअपचे आलेले खूळ.. अत्रे, पुलं, वपु यांच्या सारख्या दिग्गज मराठी साहित्यिकांनी फार पूर्वीपासून यश शिखरावर नेऊन ठेवले आहे..

त्याचा दर्जा इतक्या उच्च प्रतीचा आहे की शिव्यांच्या जागी फक्त फुल्या फुल्या हे शब्द देखील अचूक भावना सांगतो, त्याकरता जिव्हा आणि वाणी दूषित करण्याची गरजच नाही..

अशा उत्तम श्रवणाने फक्त कान नाही, तर आचार.. विचार.. वृत्ती सर्वांवर संस्कार झाले..

पुलं आणि वपु यांचे कथाकथन त्या वयात पूर्णतः कळले नसले तरी, मनोरंजना सोबतच भाषेची गोडी लागली, समृद्धता लाभली..

आजही ती कथाकथने ऑडीओ, व्हिडिओ स्वरूपात युट्यूब व इतर माध्यमात उपलब्ध आहेत आणि त्यांचे संदर्भ तितकेच काल सुसंगत आहेत..

नव्या वा बदलत जाणाऱ्या श्रवणीय गोष्टींना कडाडून विरोध नसला तरी, जुन्या सुवर्णाची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठीच आजचा लेखन प्रपंच..

असे उत्तम दर्जाचे ऐकण्यास मिळाले तर फार आटापिटा न करता, हसता हसता माय मराठी अनेकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय बनेल असे देखील मनापासून वाटते..

म्हणूनच लेखना सोबत पुलं ( पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) आणि वपु (वसंत पुरुषोत्तम काळे) यांच्या निवडक कथाकथांची लिंक देत आहे..

https://www.youtube.com/watch?v=AyBmI61Jrus&list=PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm

https://www.youtube.com/watch?v=JflwJiPw4LU&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=TcmLHaJaEnI&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=nhf2odF8h1Y&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl

https://www.youtube.com/watch?v=kbpoczrrVeQ&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl0gcJCZEKAYcqIYzv

https://youtu.be/XoVzdHsKdr0?si=ZAOGB0sgTHTq1ykC 

यांनतर क्रोनोलोजी अजून भरपूर पर्याय देईलच..

शिवाय आता एआयच्या जमान्यात प्रत्येकाने आपल्या आवडीचे, सोयीचे काहीही ऐकले तरी चालेल, त्यातून भाषा शिकण्यास, रुजविण्यास आणि वृद्धिंगत करण्यास मदतच होईल, हे नक्की..

तुम्ही काय ऐकता, सांगण्यास विसरू नका..

आणि नेहमीचे अभिप्राय, सुधारणा यांचे स्वागत..

Wednesday, January 21, 2026

विश्रांती







विश्रांतीची कहाणी..


ऐका महाराजा, तुमची कहाणी


आटपाट नगरात सुरू झाली शाळा, नाव तिचे सिटी प्राईड. बघता बघता नगरातील प्रमुख शाळांपैकी एक बनली. शाखा विस्तार होत, १ एप्रिल २०२५ रोजी चौथे अपत्य नावारूपास येऊ लागले..


जुन्या शाखांमधील मोजके सदस्य वगळता, सर्वकाही नवीन होते. तरी प्रत्येकजण मनापासून कामाच्या पद्धती, प्रणाली समजून घेत होते.


जुन्यांना शाळेच्या पद्धतीचा अनुभव असला तरी परिसर, इतर सदस्य, विद्यार्थी आणि पालक सगळं नवीनच होत.. 


सारेजण हसत खेळत एकमेकांना सोबत आनंद, उत्साहात काम करत होते,  दिवसांमागून दिवस जात होते..


सुरुवातीच्या काळात नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी मिळणारा  वेळ, विचार , सुख दुःखाची देवाण घेवाण हळूहळू कमी होऊ लागली..


कामाचा पसारा, एकामागून येणारे एक पायाला चाक लावून येणारे उपक्रम, परीक्षा, इतर कामे यात सगळ्यांचे जणू यंत्र बनू लागले..


त्यामुळे वातावरण बदलू लागले, एक अस्वस्थता प्रत्येकाला त्रास देऊ लागली, काहीतरी हरवत आहे, निसटत आहे असे वाटले तरी नेमके काय हे लक्षात येत नव्हते..


त्यातच पालकांची मासिक बैठक, क्षेत्रभेट, स्पर्धा, परीक्षा, स्नेहसंमेलन असा एक संपण्यापूर्वी दुसरा अध्याय दत्त म्हणून उभा रहात होता..


विद्या प्रांगणाच्या वास्तू देवतेला हे सारे दिसत होते, आपल्या लेकरांची तगमग जाणवत होती, त्यावर हळूच फुंकर घालावी असे ठरवून, त्या अज्ञात शक्तीने जादूची कांडी फिरवली..


दिवस संक्रांत सणाचे, हेच निमित्त साधून सदस्यांना तिळगुळ समारंभ करण्याची बुद्धी दिली..


प्रस्ताव मांडला, परवानगी मिळाली, आवश्यक साहित्य, अर्थकारण साऱ्यावर चर्चा आणि नियोजन झाले..


इतक्यात मधे माशी शिंकली, नकार घंटा वाजवत विश्वव्यापी सायकल स्पर्धा आडवी आली, त्यासाठी मुलांना दोन दिवसाची सक्तीची सुटी जाहीर झाली..


तोंडावर आलेले सलग उपक्रम, त्यांचा सराव, राहिलेली ढीगभर कामे बघता, समारंभ रद्द करावा लागला..


पण देवतेला हे मंजूर नव्हते, तिने एका सदस्यास नकळत ऊर्जा दिली, येतील अनेक प्रश्न, अडचणी पण हे कार्य माझी इच्छा आहे, मनापासून काम करणाऱ्या माझ्या लेकरांना कामात थोडा बदल हवा आहे, (आजकाल काय म्हणतात ते आईस ब्रेक)..


कामाचा एकसुरीपणा, अडचणी यावर विश्रांतीची गरज आहे, जशी शरीराला झोप तशी मनाला उगाच हसण्याची, नाचण्याची गरज आहे..


अदृश्य शक्तीचा जणू आदेश झाला आणि सदस्य त्याच्या नकळत अनेक गोष्टी करून गेला..


२० जानेवारी मंगळवार, मुलांना सुटी असली तरी शाळेचे शिक्षक, कर्मचारी कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर आले..


सदस्याने वरिष्ठांना केलेली तयारी सांगितली, पुढच्या साऱ्या उपक्रमांची कामे मिळून करूया पण त्याआधी एक तास थोडा वेगळा अनुभव घेऊ या असे गाऱ्हाणे मांडले..


वेळ उपलब्ध होता आणि हा बदल खरच आवश्यक आहे, हे जाणवून वरिष्ठांनी लगेच परवानगी दिली..


झाले, आता देवता त्या एकाच नाही तर तेथील अनेक सदस्यांच्या अंगी संचारली, बघता बघता अवघ्या अर्धा पाऊण तासात एका सुरेख समारंभाची जय्यत तयारी झाली..


तिळगुळ समारंभाला शोभेशी आरास साऱ्यांना छायाचित्र काढण्यास प्रवृत्त करू लागली, सर्वांनी एकमेकांसोबत या सुखद आठवणी आपल्या भ्रमणध्वनीत मनसोक्त टिपल्या..


एक एक करून सारे जमा झाल्यावर विद्यादात्री देवी सरस्वतीचे पूजन झाले, सर्वांनी मिळून तिचे आवाहन केले, हे देवी, दैनंदिन कामात आलेली यांत्रिकता दूर सारून आनंद, मैत्री, उत्साहाचे वारे वाहू दे..


उद्याचे भविष्य घडवू इच्छिणाऱ्या आम्हाला चैतन्य, नावीन्य, चिकाटीचे दान दे..


त्यानंतर सर्वांनी मिळून हसावे, खेळावे, बागडावे यासाठी गमतीशीर खेळ, बालगीतांवर नृत्य करण्यात आले..


त्यावेळी जी काही धम्माल, दंगामस्ती झाली की त्याच त्याच गोष्टी करून यंत्र होऊ बघणारे सारे सदस्य पुन्हा एकदा फुलपाखरासारखे रंगबेरंगी झाले..


सोबत अल्पोपहराचा आस्वाद घेताना मनमोकळ्या गप्पा झाल्या, शाळेचे नाव उखण्यात घेताना मनातले प्रेम, लटका राग व्यक्त करताना निरागाठी सुटल्या..


समारोप करताना प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ देऊन प्रेमाने मिठीत घेताना आपण सारे एक कुटुंब आहोत, इथले फक्त यश, आनंदच नाही तर प्रश्न, समस्या याही आपल्या साऱ्यांच्या आहेत आणि आपण मिळून त्यांना पार करणार आहोत असा आश्वासक आधार शब्दाविना दिला आणि मिळवला..


हा आणि असाच अनुभव सेवक कर्मचाऱ्यांनी देखील अनुभवला तेंव्हा   त्यास अधिक पूर्णत्व लाभले..


कामात थोडा बदल म्हणजे साऱ्यांनी एकत्र येऊन गप्पा टप्पा, खेळ, नाच याची अधून मधून फोडणी हवी तरच नित्य दिनक्रम अधिक आनंदी आणि उत्साही होईल हे एकमताने ठरले..


आपल्या लेकरांची काळजी घेणारी, ती अज्ञात शक्ती जशी सिटी प्राईड प्राधिकरण शाखेस लाभली, तशी ती तुम्हा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


अशी ही विश्रांतीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण..


अभिगंधशाली




Tuesday, January 13, 2026

ब्लॅक_ब्यूटी

 पुस्तक परिचय  

लेखिका - अँना सिवेल... अनुवाद - स्मिता लिमये.


ही एका घोड्याची आत्मकथा आहे. प्राचीन काळापासून जगभरच्या संस्कृतीचा भाग व मानवाचा लाडका प्राणी घोडा.. 

बुद्धीने तल्लख, प्रेमास उत्तम प्रतिसादी आणि ईमानी..

प्राणी जीवनावरील  एक यशस्वी कादंबरी..

घोडागाडीचे काम करणाऱ्या कथेच्या लेखिकेला, या प्राण्याविषयी कमालीची आत्मीयता वाटते.. 

स्वतःच्या आजारपणावर विरंगुळा म्हणून आपल्या घोड्याची आत्मकथा लिहावी, या कल्पनेतून पुस्तकाची निर्मिती झाली आहे..

पाळीव प्राण्यांना उत्तम मालक मिळाल्यास ते मृत्यू शय्येवरून बाहेर उठून, दीर्घायुष्यी कसे होतात, हे कथेत भावपूर्ण गुंफले आहे..

कथेच्या शेवटाकडे येताना घोड्याला पुन्हा एक नवा चांगला मालक मिळतो..
 
मरणासन्न ब्लॅक ब्युटी पुन्हा धट्टाकट्टा होऊन,अधिक वीस वर्षे कसा जगतो, यातून पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे अनेक संदर्भ लेखिका मांडते.

पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी

● पाळीव प्राण्यांचे जीवन व त्यांचे प्रश्न याची कथारूप मांडणी. 

● पाळीव प्राणी जीवनातील छोटे छोटे बारकावे.

 ● स्मिता लिमये यांनी इंग्रजी कथेचा अतिशय सुंदर केलेला भावानुवाद.

● पाळीव प्राण्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन.

● लेखिकेच्या लेखनाची एक वेगळीच शैली... घोड्याच्या जागी  स्वतःला ठेवून केलेले लिखाण.

● थोडक्यात प्राणी प्रेमिकांनी आणि ज्यांना प्राणी सांभाळायचे आहेत त्यांनी तर जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@

Saturday, April 05, 2025

श्रीराम


रामासी शरण निघा रे | राम होऊनी राम गा रे ॥१॥
राम कैसा हे विचारा | नका कर्म करू व्यभिचारा ॥२॥
हा दुस्तर भव हराया | तुम्ही जोडा सखा गुरुराया ॥३॥
म्हणे माणिक राम पहावा | तया लागी हृदयी जपावा ॥४॥

माणिक प्रभू यांची ही रचना दैनंदिन जीवनाची दिशा सुचवते.

रामासी शरण निघा रे 

राम म्हणजे परमेश्वराला शरण जा, समर्पित व्हा कारण दुःख, संकट, भय, वेदना अशा साऱ्याचे उपाय फक्त त्याच्याच जवळ आहेत..

त्यातही दशावतारांमधील राम हा मानवाच्या सर्व मर्यादा पाळणारा अवतार.. 

या अवतारात दैवी शक्ती, चमत्कार, युक्ती,  इ. कोणत्याही गोष्टींचा वापर प्रभू श्रीरामांनी कधीही केला नाही..

मानव जन्म प्राप्त झाल्यावर सर्वोत्तम असण्याचे सर्व निकष त्यांनी सदैव सांभाळले आणि येणाऱ्या पिढीसाठी आदर्श स्थापन केले, अशा प्रभू रामाला शरण जा, असे रचनाकार सुचवतात..

राम होऊनी राम गा रे 

राम हा परमेश्वरी अवतार होता, असे म्हणत त्यांनी केलेल्या गोष्टी मला शक्य नाही अशी पळवाट शोधून चालणार नाही..

रामाची आरती, गाणी, भजन इ. पोकळ स्तुती करून उपयोग नाही..

त्याआधी रामाचे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न हवा, सत्य वचन, नीतिमत्ता, धर्मपालन असे एक ना अनेक गुणांचा अंगीकार करा..

थोडक्यात आधी राम व्हा, मग त्याचे गुणगान करा..


राम कैसा हे विचारा 

रामाची मंदिरात स्थापना करून पुरेसे होणार नाही, मानवी जीवनाची आदर्श मूर्ती असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या कथा ऐका..

एक राजा, पुत्र, बंधू, पती म्हणून ते कसे होते, इतकेच काय शत्रू असूनही दशग्रंथी राजा रावण याचा त्यांनी कसा मान राखला, हे सारे समजून घ्या..

नका कर्म करू व्यभिचारा 

व्यभ म्हणजे चुकीचा, आचार म्हणजे वर्तन, कोणतेही कर्म करताना व्यभिचार म्हणजे चुकीचे वर्तन करू नका..

कर्म करताना असत्य, अनैतिक, अधर्म या साऱ्या गोष्टी जबाबदारीने दूर ठेवा, त्यासाठी प्रभू श्रीरामांचे संस्कार, संयम, सद्भावना, साहचर्य, संतुलन असे गुण स्वतःच्या आचरणात येऊ द्या..


हा दुस्तर भव हराया 

राम होणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही, याची पूर्ण जाणीव रचनाकार माणिक प्रभू यांना आहे,म्हणूनच ते म्हणतात, हा दुस्तर म्हणजे पार करण्यास अवघड, भव याचा अर्थ स्थिती..

मला राम कसे होता येईल, त्यांचे गुण माझ्यात येण्यासाठी मी काय करायला हवे, हे मला खरंच जमेल का, अशी अवघड स्थिती निर्माण झाल्यावर, नेमके काय करायला हवे, हे सांगताना ते म्हणतात..

तुम्ही जोडा सखा गुरुराया 

आपल्या संस्कृतीत सर्व श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या गुरु परंपरेची कास धरा, राम समजून घेण्यासाठी, त्यांच्यासारखे होण्यासाठी गुरुंचे सहकार्य घ्या..

मग ती व्यक्ती असेल, ग्रंथ संपदा असेल, जीवनानुभव असतील, त्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, फक्त मनात तशी इच्छा ठेवून मार्गक्रमण करत प्रभू श्रीराम आपले गुरु, सखा होण्याकडे प्रवास घडो..

यातून हा कठीण वाटणारा प्रवास हळूहळू सुकर होत जाईल.. 

म्हणे माणिक राम पहावा

काव्याच्या अंतिम चरणाकडे येताना माणिक प्रभू ईश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात..

तेहेतीस कोटी देवांची परंपरा असणाऱ्या, आपल्या समृद्ध संस्कृतीत सर्वच देवतांचे इतके विलोभनीय वर्णन केले आहे, की प्रत्येकाला अशी दैवी शक्ती एकदा तरी, याची देही याची डोळा बघण्याची आसक्ती आपोआप निर्माण होते..

पण प्रभू राम म्हणजे षड्रिपुंवर विजय मिळवलेली मानवी दैवी शक्ती, मग त्यांना बघण्याची आसक्ती निर्माण होऊन कसे बरे चालेल, या आसक्तीवर मात करण्यासाठी उपाय एकच..

तया लागी हृदयी जपावा

रामासारखे बनून रामाला कोणत्याही मंदिर, मूर्तीमध्ये न शोधता, त्याला आपल्या हृदयात स्थापन करा, अगदी तसा जसा रामभक्त हनुमानाने स्व हृदयात स्थापिला..

आता राम  सदैव आपल्या सोबत राहील, आपल्याला संसार रुपी भवसागर पार करण्यासाठी प्रेरणा देईल, दुःख, भय, संकट सारे निभावून नेईल, यासाठीच ..

राम होऊनी राम गा रे..  

रामासी शरण निघा रे..

सदर रचना ही माणिक प्रभू यांची असून हा एक राम निरंजन, भक्तीगीत प्रकार आहे..

राम होऊनी राम गा रे..

सोबत दिलेल्या दुव्यात या गीताचे स्वर बांधणी व सुरेल गायन पंडित प्रभाकर कारेकर यांनी केले आहे. त्याचाही जरूर आनंद घ्या..

भावार्थ कसा वाटला, प्रतिसाद द्यायला विसरू नका..

आपण सर्वांनी रामामय व्हावे याच शुभेच्छा..