Thursday, April 30, 2020

नागपंचमी


एक होत गाव. त्या गावात रामू नावाचा शेतकरी रहात होता. तो दिवसभर शेतात आनंदाने काम करायचा. शेतात भरपूर पीक यायचे. त्या शेतात एक खूप मोठ्ठ आंब्याचे झाड होते. काम करुन दमल्यावर रामूदादा झाडाखाली आराम करायचा.
त्या झाडावर चिमणीकावळा, घार, पोपट, कोकिळा अशा खूप पक्ष्यांची घरटी होती. घरट्यात छोटी पिल्ले चिवचिवाट करत असायची. सगळीकडे आनंदीआनंद होता.

पण एकदा काय झाले कुणास ठाऊक? शेतामध्ये खूप उंदीर झाले. पिकांची नासाडी करु लागले. रामुदादाने खूप उपाय केले पण तेवढयापुरते उंदीर कमी व्हायचे. त्याला काय करावं समजेना.

इकडे आंब्याच्या झाडावर एक नाग यायचा. पक्षी घरट्यात नाही बघून घरट्यातील अंडी, पिल्ले खाऊन टाकायचा. पक्षी किलबिलाट करायचे पण नागाशी मुकाबला कसा करणार?  बिचारे खूप त्रासले होते आणि उपाय तर सापडत नव्हता.

त्या झाडावर एक हुशार पोपट राहायचा. त्याला रामूदादाचे आणि झाडावरच्या पक्ष्यांचे दुःख बघवत नव्हते. काय बरं करावे?... तो विचार करू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली.

तो नागाकडे गेला आणि म्हणाला, "नागदादा आम्ही पक्षी तुला काही त्रास देत नाही. तरीही तू आमची अंडी, पिल्ले का बरं खातो? "

नाग म्हणाला, "अरे ते माझं अन्न आहे. मी खाल्लं नाही तर जगणार कसा?"

पोपट :- माझ्याकडे एक उपाय आहे. बघ तुला चालेल का?

नाग :- सांगून बघ. जमलं तर नक्की करेन .

पोपट :- आपल्या या रामुदादाच्या शेतात खूप उंदीर झाले आहेत ते पिकांच नुकसान करतात. रामूदादांनी खूप उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. तू ते उंदीर का नाही खात ?

नागाला पोपटदादाचे म्हणणे पटले. मग तो त्रास देणारे उंदीर खाऊ लागला.

त्याच्या भीतीने उंदीरही पळून गेले आणि आले की त्याचे भोजन होऊ लागला. सगळीकडे आनंदी आनंद झाला.

तेव्हापासून नाग आणि शेतकरीदादा मित्र झाले. शेतकरीदादा त्याची काळजी घेऊ लागला. 

त्यांची ही मैत्री लक्षात रहावी म्हणून नागपंचमी सण साजरा होऊ लागला.

 






   

गोष्ट - बघण्यासाठी .. 

https://youtu.be/LNUfuIhCnq0 
 


2 comments:

suggestions most wlcome