सोहमनी जशी शून्याशी मैत्री केली तशीच आज सईची गोष्ट. सोहमला जसा शून्य आवडायचा नाही तसं सईला अक्षर लिहायला आवडायची नाही. काय ती अक्षर रोज रोज लिहायची तेही सगळी माहिती असताना अगदी कंटाळा यायचा तिला .
त्यापेक्षा ताई अक्षराला गोल करायला सांगतात ,अक्षरांचे शब्द देतात ते मस्त,मज्जा येते..
पण उगाच अक्षर लिहायची म्हणलं, की तिला अगदी रडूच यायच बरं का. मग ती कसही लिहायची पहिली काही छान, पुढची बरी मधली कशीतरी आणि शेवट शेवटची अक्षर समजायची पण नाही. सुरुवातीला ताईंनी समजावून सांगितलं, मग थोडं रागावून झालं, एकदा-दोनदा पानावर चूक म्हणून रेघेही ओढली पण सईने फार मनावर घेतलेच नाही.
आज ज्योतीताई सईची वही बघून खूप रागवल्या होत्या कारण आजतर तिने पूर्ण पान कसतरी लिहिले होते. त्यांना माहित होत की तीच अक्षर छान आहे मग ती असं का करते हे त्यांना समजत नव्हतं. त्यांनी जरा मोठ्या आवाजात तिला हाक मारली आणि वही दाखवून म्हणाल्या, "हे काय आहे?असं लिहितात का?तुझं अक्षर किती छान आहे मग का असं करतेस?"
सई हळूच पण थोड्याशा घुश्यात म्हणाली,"कंटाळा येतो मला तेच तेच लिहायला."
सईचा सूर ताईंनी बरोबर ओळखला आणि त्या तिला पुढे काहीच म्हणल्या नाही.त्यांच्या डोक्यात विचार सुरु झाला काय बरं करावे अक्षराचा सराव का करायचा हे सईला कसे पटवून द्यावे आणि त्यांना एकदम एक गंमत सुचली.
दोन दिवसानंतर सगळ्या बालवर्गाच्या मुलांना एकत्र बसवले.सुजाताताईंनी सांगितले आज आपण एक गंमत बघणार आहोत.इतक्यात बाकीच्या सगळ्या ताई गळ्यात आणि पाठीवर अक्षराचे चित्र घालून आल्या आणि मुलांभोवती ओरडत फिरु लागल्या,
ओळखा ओळखा मी कोण ?
प पानाचा कि फ फणसाचा
ब बदकाचा की व वडाचा
ल लसणाचा की ळ बाळाचा
एकदा समोरचे अक्षर दिसायचे एकदा पाठिमागचे पण नुसता गोंधळच. जरावेळ सगळ्या तेच तेच म्हणत फिरल्या आणि निघून गेल्या. अक्षरांची चित्र काढून परत आल्या मग सुजाताताईंनी सगळ्या मुलांना विचारलं ," सांगा बरं कोणत्या ताई कोणती अक्षर घालून आल्या होत्या? त्यांच्या पुढे कोणते आणि पाठीवर कोणते अक्षर होते?"
सगळेजण आठवू लागली.काहींनी प्रयत्न करुन सांगितले, पण पुढेचे आणि मागचे अक्षर इतके सारखे होते की नेमके आठवत नव्हते.
सुकृतने कविताताईनी पुढे व आणि मागे ब बरोबर ओळखले पण अजून कोणाचे आठवले नाही.आर्याला श्रद्धाताईंनी प आणि फ घातला हे समजलं पण पुढे कोण आणि मागे कोण आठवलं नाही.
मग ज्योतीताई पुढे आल्या आणि म्हणाल्या,"सई तू सांग बरं."
सई रडवेली होऊन म्हणाली,"सगळ्या अक्षरांना फिरताना बघून मला कसतरीच झालं काहीच आठवत नाही मला जशी काही सगळी अक्षरे मला चिडवतच होती."
सईला जवळ बोलवून ताई म्हणाल्या ,"सई असं का झालं माहितीये कारण तूला अक्षर आवडत नाहीत. ती लिहायचा, सराव करायचा कंटाळा येतो."
आता सुजाताताईंनी फळ्यावर फणस असं लिहिलं आणि म्हणाल्या,"मगाशी आर्याला जसं प की फ अक्षर आठवलं नाही तस जर मी फ च्या जागेवर प लिहिला तर पणस बरोबर होईल का ?"
सगळे ओरडले ,"नाही."
असे गोंधळ होणारे अजून शब्द त्यांनी फळ्यावर लिहिले आणि वाचून दाखवले ,
तरस त च्या जागी न नरस
अननस अ च्या जागी आ आननस
बदक ब च्या जागी व वदक
गरज ज च्या जागी च गरच
अक्षर चुकल्यावर होणारे शब्द ऐकून सगळया मुलांना हसू येऊ लागले.
मग ज्योतीताईनी विचारलं, " कळलं का अक्षर माहिती झाली तरी नीट लिहिली नाही तर कसा गोंधळ होतो?करणार का मग रोज एकदातरी सराव?"
"हो ताई न कंटाळता करणार." सगळ्यात आधी सई ओरडली कारण तिला चांगलच समजलं की सगळं ताई तिलाच सांगत होत्या.परवा तीच नाही का म्हणाली मला कंटाळा येतो म्हणूनच ताईनी ही गंमत केली असणार.
आता सई रोज न कंटाळता सराव करते. तिचे अक्षर आधीपेक्षा पण जास्त सुंदर झाले आहे.
मग काय तुम्ही पण तुमचे अक्षर सुंदर करणार ना?
**********************************


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome