Sunday, May 10, 2020

स्वावलंबन


मास्टर जिनियसची उन्हाळ्याची सुटी सुरु झाली. सुरवातीचे काही दिवस वेगवेगळी शिबीरे, नवीन गोष्टी शिकण्यात गेले. 

मग निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे छान गुणांनी मास्टर जिनियस पुढील इयत्तेत गेला.

आता मात्र दिवसाचे चोवीस तास संपणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसले होते. बरेच मित्र कुठे ना कुठे फिरायला गेले होते. आईची नोकरी, बाबाचा व्यवसाय, आजी आजोबांचा नेहमीचा दिनक्रम  यामुळे जिनियस बराच वेळ एकटा असायचा. 

सारखे वाचन तरी किती करणार? टीव्ही , कॉम्प्युटर दिवसातून एक तास हा नियम ( जो त्याच्या भल्याचा होता आणि तो मनापासून पाळायचा) यामुळे आता त्याला सुटीचा कंटाळा येऊ लागला होता.

पण अचानक गंमत झाली. नीलू मावशी जी गावाकडे असायची. गावी म्हणजे छान सुधारलेले पण शेती आणि तशा अनेक गोष्टी अजूनही सांभाळून ठेवलेले. 

मावशीचा मुलगा पुष्कर जिनियसपेक्षा एक वर्षानी मोठा तर मुलगी सानिका एक वर्षानी लहान होती.एकत्र आले कि या  भावंडांचे छान मेतकूट जमायचे.

मावशीने फोन करुन आईला सांगितले की काका दोन दिवसांनी काही कामासाठी पुण्यात येणार आहेत. परत येताना  त्यांच्यासोबत जिनियसला सुट्टीसाठी गावी पाठव.  

हे ऐकल्यावर स्वारी खूप खूष झाली. आनंदाने घरभर नाचू लागली. गावाला जाऊन काय काय करायचे हे सगळ्यांशी गप्पा मारुन ठरवू लागली. 

आईने हाक मारली, " शौनक एरवी मी, बाबा किंवा आजी आजोबांपैकी कोणी ना कोणी तुझ्यासोबत असतो. तू पहिल्यांदाच असा एकटा जाणार आहेस. त्यामुळे नीट रहायचे. कोणालाही त्रास होईल असे वागायचे नाही, भांडण करायचे नाही आणि सगळ्यात महत्वाचे आपण ज्या चांगल्या गोष्टी रोज करतो त्या तिथेही करायच्या."

"
हुकूम सर आँखोपर ! खरं म्हणजे हे सगळे सांगायची गरज नव्हती माते पण तरीही आपल्या अपेक्षांचा भंग होणार नाही याची खात्री हा जिनियस देतो. उलट नवीन काहीतरी शिकून येईन हेही आश्वासन देतो." शौनकच्या या नाटकी आवाजात पण मनापासून दिलेल्या उत्तरला सगळ्यांनी कौतुकाने हसून दाद दिली.

या सगळ्यात दोन दिवस कसे गेले कळलेच नाही. काका त्याला घ्यायला आले, त्यांना फार वेळ नसल्याने जेवण करुन रात्रीच्या गाडीने दोघे निघणार होते. आपली बॅग आईच्या देखरेखी खाली पण स्वतःहून भरुन साहेब तयार होते.

झोपेत आठ तासांचा प्रवास कधी संपला हे कळलेही नाही. साधारण सहाच्या सुमारास दोघे घरी पोहचले.

शौनकला बघून घरातील सर्वांनाच आनंद झाला. प्रवासाचा शीण जावा म्हणून मावशीने आंघोळ करायला सांगितल्यावर त्याने पटकन कपडे घेऊन बाथरुमकडे धूम ठोकली.

काहीवेळातच स्वारी बाहेर आली. हातात प्रवासात घातलेले कपडे धुवून, पिळून आणले होते. वाळत घालण्यासाठी मावशीला जागा विचारु लागला.


       

"
अरे तू का धुतले? इथेही बाई आहे, मशीन आहे. नाहीतर तुझी मावशी पण आहे." आजी (मावशीची सासू) म्हणाली.

"
यावर्षीच मी हे शिकलो आहे. घरीसुद्धा धूतो, मशीन असले तरी कारण हे मला यायला पाहिजे असे आईला वाटते आणि मलाही पटते." हसत डोळा मारत त्याने उत्तर दिले आणि मावशीने दाखवलेल्या दोरीवर कपडे वाळतही घातले.

त्यानंतर दूध पिऊन कपही छान विसळून ठेवला. नाष्टा झाल्यावर ताटली उचलून ठेवली, मग मात्र स्वारी सानिका-पुष्करसोबत खेळायला पळाली.


मावशीला हे सगळे माहिती होते त्यामुळे तिला काही वाटले नाही. पण तिच्या सासूबाई थोड्या जुन्या वळणाच्या असल्याने त्यांना मुलाने अशी कामे करणे आवडले नाही. त्या तसे बोलल्या नसल्यातरी त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणवत होते.

दुपारी जेवणानंतरही त्याने आपले ताट उचलले. आता मात्र  आजी त्याला म्हणाली, " अरे हे सगळे तू तुझ्या घरी करत असला तरी इथे  करु नको. तुझी आई नोकरी करते पण मावशी असते घरी त्यामुळे ती करु शकते आणि मदतीला मी, सानिका आहोतच."


यावर गोड हसत तो आजीजवळ गेला, "आजी हे सगळं मी का करु नको त्याचे एक कारण सांग. मी नाही करणार."

"
अरे ही मुलांची कामे नाहीत. आणि घरात आम्ही तिघी असताना तू हे सगळं करायची गरज नाही." 

मावशीने खुणेने काही बोलू नको असे सांगितले. आजी आजोबा जुन्या वळणाचे आहेत हे आईने त्याला सांगितले होते. त्यांना उगाच काही बोलू नको असेही बजावले होते. आपली बाजू कशी सांगावी यावर क्षणभर विचार करत तो म्हणला,

"
माझी ही काम जरावेळ बाजूला राहू दे. आज आम्ही आपल्या शेतावर जाऊन आलो. ते किती मोठे आहे आणि छान आहे. शिवाय काकांनी खूप नवनवीन यंत्रांनी अगदी आधुनिक केले आहे. हे सगळं बघताना मला खूप छान वाटले. एरवी पुस्तकातून शिकतो आम्ही पण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून खूप काही नवीन समजलं."

"
हे तर छानच झालं. हे सगळे केले तरच शेत टिकवता येईल बाबा.... नाहीतर नोकरीच करावी लागेल. तुझ्या काकांनी हट्टाने हे शिक्षण घेतले. इथे अनेक बदल केले आणि करतात म्हणूनच आज हे सगळे बघायला मिळते आहे नाहीतर बाकीच्यांसारखी शेती विकून टाकावी लागली असती."

"
आजी म्हणजे काळाप्रमाणे बदलायला हवे हे तुला पटते तर."

"
यात न पटण्यासारखे काय ?"

"
मग मुलांनी कोणती कामे करावे आणि मुलींनी कोणती यात बदल नको? खरतर अशी कोणतीही कामे विशिष्ट कुणाची नसतात.

मी ही काम करतो कारण मला हे सगळे करता यायला हवे.ही कामे मला स्वावलंबी बनवतात. आत्मविश्वास देतात. हे केल्यावर घरातही किती कामे असतात याची माहिती मला होते. 

आई नोकरी करते म्हणून मी हे करत नाही तर ही कामे माझी नाहीत असे वाटून मला इतरांवर अवलंबून राहण्याची सवय लागू नये म्हणून आहेत. आईने मला ही सवय लावली असली तरी मलाही ते पटते.

मावशी नोकरी करत नाही पण तिचाही फळ प्रक्रियेचा व्यवसाय आहेच ना. तिथे कामाला बायका असल्यातरी लक्ष द्यावे लागते शिवाय बाकीची कामे असतातच ना.

सानिका लहान असून तुम्हा दोघींना मदत करते का तर मुलगी आहे आणि पुष्करदादा मात्र यातले काही करत नाही हे मला फार पटत नाही. उद्या शिक्षणासाठी त्याला शहरात किंवा दुसऱ्या ठिकाणी जावे लागले तर यामुळे त्याचेच हाल नाही का होणार? उलट या सवयी आताच लावून घेतल्या तर त्याला खूप सोपे होईल.

आजी मी अजूनही खूप काही करतो. माझे अंथरुण आवरतो, धुतलेली भांडी लावतो, माझे कपाट नीट ठेवतो, आईला दुकानातून छोटे सामान आणून देतो.

इतकेच नाही तर आता हळूहळू थोडाफार स्वयंपाकही शिकणार आहे. सध्या मी आईसोबत कधी पोहे तर कधी भाजी करतो, कधी कुकुरही लावतो.

शिवाय ही कामे करताना मजा येतेच आणि सगळ्यांकडून कौतुकही होते. मी तर हे सगळे करतो म्हणून मित्रांमध्ये खूप भाव खातो. आणि एखाद्या वेळी कंटाळा आला म्हणून नाही केले तर लगेच कोणी मला ओरडत नाही. 

आजी रागवू नको. माझे चुकत असेल तर तसे सांग. पण मी तरी माझी ही सवय मोडणार नाही."

"
नाही रे, तुझे अजिबात चूकत नाही. आम्ही कधी पुरुषांनी अशी कामे केलेली बघितली नाही म्हणून मला ते आवडले नव्हते.

पण तू काकांनी आजची गरज म्हणून शेतीसाठी नवे पर्याय वापरुन ते कसे छान बनवले हे सांगत... पुष्कर किंवा तुला ही कामे करुन काय फायदे होतील हे सांगितले तेव्हा मला ते पटले. 

तू तुझी सवय अजिबात सोडू नको आणि पुष्करलाही हे सगळे शिकव. कदाचित हे सगळं ऐकल्यावर तो स्वतःच करेल. 

मागे पुष्करची मुंज झाल्यावर तुझ्या मावशीने हे सुचवले होते पण मीच नको म्हणले होते. तेव्हा तीनेही सांगितले होते बाहेर गेल्यावर हाल नको पण तुझ्यासारखे कोणते उदाहरण न दिल्याने तितकेसे पटले नव्हते. 
त्यासाठी मी तिचीही माफी मागते."

"
माफी कसली आई. आपण राहतो तिथे बदल व्हायला वेळ लागतो आणि त्यासाठी थांबायची माझी नेहमीच तयारी असते. तुम्हाला पटले की तुम्ही बदलता हे मला माहिती आहे. आणि आज तुम्ही ते दाखवून आणि या साहेबांनी तुम्हाला छान पटवूनही दिले."

"
उगाच नाही मला मास्टर जिनियस म्हणत. आता हे स्वावलंबन पुरे झाले. सानिका आणि पुष्करदादाकडून बागकाम शिकायचे मी ठरवून आलो आहे त्यामुळे आम्ही आता पळतो ......."

काय मग ?

गाव किंवा शहर , मुलगी किंवा मुलगा....आपली काही कामे आपल्याला स्वतःला यायला हवी, स्वावलंबी बनायला हवे... हे मास्टर जिनियसचे म्हणणे तुम्हालाही पटले ना?

चला तर मग ऊठा आणि लगेच सुरुवात करा. मला कळवायला विसरु नका.

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome