पण काही गोष्टी अशा घडतात, की त्यावर जरा मनातले लिहावे असे वाटले..
झाले असे की अशीच वेशभूषा स्पर्धा होती, साहजिकच जवळच्या मैत्रिणींचे मुलांसाठी काहीतरी सुचव, थोडेसे लिहून दे अशी हक्काची मागणी आली..
स्पर्धेचा विषय काहीसा जड वाटला, यावर वेशभूषा काय करावी असा विचार चालू झाला..
त्यातून काही विषय निवडून, काही लेखन करत मैत्रिणींना मदत केली..
आणि मग वाटले आता यावर थोडं लिहावे..
अर्थात हे माझे मत आहे, खोडायची, बदल सुचवायची, पटले नाही हे सांगण्याची पूर्ण मुभा आहे..
वेशभूषा स्पर्धा ऐकल्यावर मनात पहिल्यांदा येते की, सहभाग घेतलेले मूल किंवा व्यक्ती काहीतरी वेगळी दिसणे, तिचा पेहेराव (ड्रेस, दागिने इतर), रुप यात नखशिखांत वेगळेपण असणे..
थोडक्यात बघणे व आधीचे अनुभव यातून, डोळ्यासमोर कोणाचे तरी प्रतिरुप उभी राहिले पाहिजे..
मग त्याला संवादाची जोड नसली, तरी हरकत नाही..
लहान वयोगटाला मुले फळे, फुले, भाज्या, वाहने, व्यावसयिक असे त्यांच्या विश्वातील विषय सहज देता येतात आणि त्यांनी ते मांडलेले छान वाटतात..
त्याहून थोडा मोठा वयोगट वीर पुरुष, आदर्श नेते, खेळाडू, निसर्गातली प्रतिरुपे (वारा, ढग, झाड, नदी, समुद्र असे अनेक) या वेशभूषेत शोभतात..
आपल्यासारख्या मोठ्यांसाठी काही हरवत चाललेले विषय जसे पारंपारिक, प्रांतीय पोशाख, चालीरीती चपखल बसतात..
हे झाले फक्त रुपात बदल करण्याविषयी..
कारण मला तरी वेशभूषा स्पर्धा म्हणून विचार करताना सर्वात आधी आणि सर्वात जास्त यालाच महत्त्व द्यायला हवे असे वाटते..
त्यात अधिक बारकावे बघायचे असले तर, किती सूक्ष्म निरीक्षण करुन वेश घेतला आहे, विषय निवडताना नवे काय, काल सुसंगती असे, अजून उपमुद्दे विचारात घेता येतील..
यावर मला लेखन करता येणार नाही, कारण ती प्रत्यक्ष कृती आहे..
या स्पर्धेचा दुसरा भाग असतो, विषयाला धरुन काहीतरी बोलणे..
अर्थात हा संवाद होणार नाही कारण एकतर्फी असते..
यावर लेखन करताना असे वाटून गेले, की ही एक अफलातून संधी आहे..
परकाया प्रवेशाची..
मांडत असलेला विषय आपल्या विचारांनी फुलवायची, सजवायची, कालानुरुप मांडण्याची..
याला दोन्ही बाजू असणार, त्या व्यक्तीचे एक गुण, अभिमान, वैशिष्ट्ये तर दुसरी त्याच्या कामातील वेदना, अपेक्षा..
थोडक्यात मी जर ती वस्तू, व्यक्ती आहे तर मला कसे वाटेल, आज काय म्हणावेसे वाटेल..
उदाहरणातून सांगायचे तर, शिवाजी महाराज आत्ता इथे आलेच तर पूर्वी घडून गेलेलेच बोलतील की सभोवती बघून त्यावर काही आनंद, दुःख व्यक्त करतील..?
सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रुप बघून, लो. टिळक, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क सांगत बसतील की, कचऱ्यातून रस्ता शोधताना मी कचरा केला नाही तर मी का स्वच्छ करु, हेच म्हणतील..?
माझ्यामते तरी असे नक्कीच होणार नाही..
म्हणूनच विषय बोलण्यातून मांडताना, त्याला चालू घडामोडींची जोड असली तर ते अधिक प्रभावी होईल, हे माझे मत..
यासाठीच वयोगटाला साजेसे विषय हा पहिला अट्टाहास हवा, म्हणजे मग उगाच लहान मुलांच्या तोंडी न पेलणारे, न रुचणारे, सामाजिक सुधारणा अशी गहन मांडणी असणार नाही..
अनेकदा असाही अनुभव येतो, की काहीजण एखाद्या व्यक्तीची अतिशय हुबेहूब नक्कल करतात, त्याचे बोलणे, आवाज, चालणे, हावभाव इतकच कशाला नुसता कटाक्षही देऊन त्या व्यक्तीची छबी नकळत आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते..
याला कोणतेही बाह्यरूप, पेहेराव कशाचीही गरजच नसते..
पण अशी कला फार थोड्यांना उपजत असते किंवा काहीजण निरिक्षणातून ती विकसित करतात..
यात अभिनय कला ठासून भरलेली असते..
हे वेशभूषेत असावे की नाही यावर एक ठाम मत मांडू शकत नाही..
याला प्राधान्य क्रमात घेताना काहीतरी रुप बदलही असावा हे नक्की..
उदाहरण द्यायचे झालेच तर हवा येऊ द्या यात अनेकदा रामदास आठवले सादर होतात, तेव्हा त्यांचा विसंगत पेहराव, शारीरिक ठेवण याचा विचार दिसतो..
दुसरे जर हिमेश रेशमिया, लता मंगेशकर किंवा मायकल जक्सन (मोठ्यांसाठी) यापैकी कोणाच्या आवाजाची नक्कल जमत असेली तरी त्यांचे दिसणे, कपडे, केशरचना हेही करायला हवे..
पण बाह्यरूप जराही न बदलता फक्त अभिनय या एकाच गुणावर (अनेकदा उपजत) कलते माप मिळाले तर ज्यांनी बाह्यरुपावर खूप मेहनत घेतली, त्यांच्यावर अन्याय होईल..
खरे तर हा कलेचा वेगळा प्रकार असल्याने यासाठी वेगळा रंगमंच हवा असेही वाटते..
त्याला कोणत्या नावात बसवता येईल ते काही सुचत नाही, सुचवले तर नक्कीच आवडेल..
अजून एक महत्त्वाचा विचार की जर अशी स्पर्धा गंमत म्हणून नसेल तर एखाद्याची नक्कल, प्रतिरुप सादर करताना काही वैचारिक मांडणी झाली का..?
त्यातून सादर करणारा किंवा बघणारे प्रेक्षक यांना त्या व्यक्तीच्या कामाची माहिती, त्यातून प्रेरणा, नवा विचार, नवे ध्येय, नवे स्वप्न दिसले का..?
असे काही घडले तर असे उपक्रम अधिक अर्थपूर्ण होतील..
पुन्हा उदाहरणार्थ निसर्ग सादर करताना त्याची काजळी घेणारा खराटा होऊन स्वच्छतेचा संदेश द्यायला हवा असे काहीसे..
या सगळ्याला ज्यामुळे सुरुवात झाली ते काही विषय व त्यावरचे लेखन सोबत देत आहे..
(यातले काही विषय पूर्ण माझे तर काही मैत्रिणींनी मांडलेल्या विचारांना मुलांनी मांडण्यासाठी सहज व सोपे केले आहेत..)
फुलपाखरू
ओळखले ना मला..
फुलाफुलावर बागडणारे..
हाती कधी ना सापडणारे..
पंख हे माझे रंगीबेरंगी..
फुलपाखरू मी आनंदी..
आज जरी मी खूप सुंदर असलो ना तरी, काही दिवसांपूर्वी असा नव्हतो..
आधी मी एक छोटी आणि कशीतरी दिसणारी अळी होतो.
मला सगळे चिडवायचे, घाण म्हणायचे, कसातरी दिसतो, आम्हाला आवडत नाही म्हणायचे.
मला खूप वाईट वाटायचे, पण मी कुणाशी भांडलो नाही.
फक्त कुणाशी बोलायचो नाही, खेळायचो नाही एकटा राहायचो आणि सारखी झाडाची पाने खायचो..
एक दिवस मी खूपss खूपss खूप पाने खाल्ली, इतकी इतकी की मला भलतीच झोप आली..
मग मी माझ्याभोवती घर तयार करून झोपून गेलो..
एक नाही, दोन नाही, खूप दिवस झोपलो आणि जेंव्हा उठलो तेंव्हा तर गंमतच झाली होती..
मला हे छान रंगीबेरंगी पंख मिळाले होते, उडता येत होते..
पण मी ठरवलं आपण कुणाला त्रास द्यायचा नाही, नाव ठेवायचे नाही..
आपण छान वागलो की त्याचे बक्षीस बाप्पा आपल्या देतोच, हो की नाही..?
जुळी बहिण / भाऊ
गार्गी.... गार्गी...अहो आमच्या गार्गीला बघितले का तुम्ही?
काय म्हणाला मीच गार्गी (हसून)...फसलात ना तुम्हीपण
अहो मी तिची जुळी बहीण वार्गी /सार्गी
आम्ही सारख्या दिसतो फक्त ती थोडी उंच आणि एक नंबरची आगाऊ, बडबडी आणि खोडकर आहे.
पण हुशार, शहाणी , गुणी म्हणाल तर ती मीच बरं का, म्हणूनच ती मला कुठे कुठे नेत नाही मग तिचे कोणी कौतुक च करणार नाही ना.
आज हळूच आले तिच्यामागे लपूनछपून आणि कुठे हरवली काय माहीत. मी छान बोलते, नाचते, गाते.. म्हणून दाखवू सा..रे..ग..म.. अहो अशी गात बसले तर तिला कधी शोधू ? आत्ता जाते मी परत कधीतरी म्हणेन गाणे.
तुम्हला दिसली गार्गी तर सांगा मी तिला शोधत आहे... बाय टाटा येते मी.
पर्जन्य दूत.
मी कोण काय विचारता?....मी आहे पर्जन्य दूत.
वरुणराजाने मला पाठवलं तुमच्याशी बोलायला.
तुम्ही सारखे ओरडत आहात ना की यावर्षी पाऊस वेडाच झाला आहे. सारखा पडतो आहे. कधीही, कुठेही.
नदीला पूर आला, धरणे भरली, गावात पाणी शिरलं घरांमध्ये भरलं, जनावर वाहून गेली. खूप खूप नुकसान झालं. अहो पण हे सगळं आमच्यामुळे झालं का?
तुम्ही माणसांनी जंगले तोडली, बघावं तिकडे घर बांधली, रस्ते बनवले, नवीन झाडे पण लावली नाही. हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण सगळा सगळा निसर्गच तुम्ही खराब केला. त्याचा समतोलच बिघडवला मग आता कुठेतरी वादळ येतात, कमी दाबाचे पट्टे तयार होतात.
वरुण राजाने प्रयत्न केला तरी कुठेही कसाही पाऊस पडतोच. यापुढे तुम्हाला असे नको असेल तर आता तरी प्रयत्न करा. झाडे लावा. प्रदूषण कमी होण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतरी आम्हीही तुमची मदत करु शकणार नाही. येते मी काळजी करु नका काळजी घ्या. निसर्ग वाचवा.
आभा भागवत (चित्रकार)
हे ब्रश, हे रंग, हा रोलर, बघून ओळखलं असेल ना मला?
अरे बालमित्रांनो मी आभा,आभा भागवत. तुमच्या वर्गातल्या भिंती तुमच्या ताई दादांसोबत रंगवून बोलक्या करणारी तुमची चित्रकार मैत्रिण आभा !
तुम्हाला आवडते चित्रकला. माझ्यासोबत अनुभव घ्याल तर नक्की आवडेल. कारण मी माझ्या आवडीने चित्र काढते... रंगवते.. त्याचा मनापासून आनंद घेते.
आता तुम्ही म्हणाल हे रंग ,ब्रश ठीक पण हातात या काळ्या पिशव्या कशासाठी? ती ना माझी दुसरी ओळख बरं का..
अहो फिरायला, निसर्गाचे चित्र डोळ्यात साठवायला टेकडीवर गेले होते, पण तिथे दिसला वृक्षा रोपणाचा हा प्लास्टिक कचरा...
निसर्गाचे चित्र खराब करणारा...वेचताना दमछाक होते, पण मला निसर्ग हवा तुमच्या माझ्यासाठी ,माझ्या चित्रांसाठी ,मग तो स्वच्छ ठेवण्याची सुरुवातही मीच नको का करायला?
आणि हो सोबत सीताफळ, काटेसावर, बोर, बाभळीच्या बियाही आहेत त्याही लावायच्या आहेत.
तुम्ही कराल मदत? नक्की या... मी वाट बघते..
रामदास स्वामी
जय जय रघुवीर समर्थ !
रामा माझ्या श्रीरामा धाव,
हे पवनसूत, श्रीरामभक्त हनुमान तूही पुन्हा अवतार घे.
ही चिमुकली मुले खेळ, मैदान विसरली आहेत. कॉम्प्युटर, मोबाईल यात आरोग्य बिघडवून बसली आहेत.
कलीचे साम्राज्य फारच वाढले आहे. हा माणूस आता स्वतःचाच शत्रू झाला आहे. जंगले नष्ट कर, निसर्गाचा नाश कर, कचरा, प्लॅस्टिक एक ना हजार प्रश्न....आणि फक्त माणूसच नाही तर सारी सृष्टीच नष्ट होऊ लागली आहे.
बालमित्रांनो, मी रचलेले मनाचे श्लोक पाठ करण्याऐवजी तसे वागण्याचा प्रयत्न केला तरी यातले निम्मे प्रश्न सुटतील.माझा श्रीराम तुमच्यात आहे त्याला शोधा, जागे करा.
चांगले वागा, निसर्गाची, पाण्याची, धरणी मातेची काळजी घ्या. बघा कली घाबरुन निघून जाईल पुन्हा रामराज्य येईल.
उठा बालमित्रांनो उठा... माझ्या श्रीरामांनो उठा.
जय जय रघुवीर समर्थ !
थोडे म्हणता म्हणता खूपच मांडणी झाली. प्रतिसाद, सूचना यांचीही वाट बघत आहे.
***************************



No comments:
Post a Comment
suggestions most wlcome