इन्व्हिजिलेशन, प्रेरणा नव्या स्वप्नांची
अनुभवासारखा गुरु नाही हे वाचत असतो, अनुभवत असतोच पण...
कधीतरी हे अनुभव आपल्या समोर नवनवीन प्रश्न तयार करतात, ज्याची उत्तर आपली आपल्यालाच शोधावी लागतात, त्यातून नवे विचार, नवे शोध, नव्या संधी, नव्या वाटा तयार होतात...
असाच एक अनुभव, दहावी बोर्ड परीक्षेचे
पर्यवेक्षण, इन्व्हिजिलेशन...
(invigilation हा शब्द समजून घेताना अनेक प्रकारचे शिक्षण झाले, तरी आजही उच्चारताना बोबडी वळते, आणि अनेकदा समोरचा म्हणजे काय म्हणून बघू लागला की त्याचीही शाळा घ्यावी लागते ही एक वेगळीच गंमत...)
यावर्षी दहावी सी बी एस सी बोर्ड परीक्षा दोन सत्रात झाल्या, त्यात करोना नियमावली, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कदाचित यामुळे ही संधी मिळाली...
शक्यतो कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही आणि त्याकडे एक मजा, शिक्षण, संधी म्हणून बघायचे हे मूळातच पक्के असल्याने त्यात एक वेगळीच मजा अनुभवली...
काय करायचे, काय नाही याचे अनेक प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (काही नियम म्हणून, तर काही आपले काम सहज-सुरळीत करण्याच्या हेतूने) शिक्षण झालेच...
पण...
साधारण पाच तासाचा, तीन वेळा घेतलेला तो अनुभव, अनेक नवे प्रश्न मनात गोंधळ निर्माण करुन गेले...
परीक्षा नेमक्या कशासाठी व कोणासाठी असतात...?
त्याचे वातावरण इतके भयावह का असते...?
नियम, अधिकार, हक्क, कर्तव्य ही लांबलचक यादी मी परीक्षार्थी असताना शिक्षक आणि शिक्षण केंद्री होती, ती आता विद्यार्थी केंद्री झाली यात प्रगती आहे की अधोगती..?
विद्यार्थीदशेत परीक्षा नसती तर हा विषय मी स्वतः लिहिला, वाचला तर होताच...
पण एक शिक्षक म्हणून ताण विरहित कायमस्वरुपी परीक्षण, निरीक्षण आणि त्याआधारे आवश्यक बदलांची शिक्षण पद्धती मी जगली आहे, तशी संधी देणाऱ्यांची नक्कीच ऋणी आहे, पण ही गोष्ट करणे फार काही अवघड आणि अशक्य नक्कीच नाही अशी श्रध्दा, समजूत आहे (कदाचित अंधश्रद्धा, गैरसमज असेल) मग ते सर्वत्र होण्यासाठी नेमकं काय करावे लागेल...?
थोडक्यात परीक्षण पुढे नेणारे नसेल तर ते किती उपयुक्त आहे...?
त्यात प्रगतीचा आलेख किती आणि मार्कंसाठी अनावश्यक रस्सीखेच किती..?
बरं १००% मार्क मिळूनही गुणवत्ता सिद्ध होतेच असे नाही की मार्क नाहीत म्हणून शून्यता येते असेही नाही मग ही धडपड कशासाठी...?
कमियाब नहीं काबील बनों...
हे चित्रपट बघून सोडून द्यायचे, तर मग बघायचेच कशाला...?
आज कालची पिढी कशी परीक्षार्थी होत चालली आहे, यावर फक्त वैचारिक देत राहून ही परिस्थिती बदलेल...? (वैचारिक देणारे उत्तम वक्ते बनतील, त्यावर भरपूर पैसाही कमवतील)
अशा अनेक प्रश्नांनी सध्या भंडावून सोडले आहे...
नियमित निरीक्षण, नोंदी, स्वयं मूल्यमापन, प्रकल्प पद्धती, कृतियुक्त शिक्षण, ओपन बुक असे अनेक उपयुक्त आणि अभ्यासपूर्वक पर्याय तज्ञ अभ्यासकांनी सुचवलेले आहेत...
आज ते सक्तीने शिक्षणव्यवस्थेत राबवले जातात, पण फक्त कागदोत्री...
त्यातला मूळ हेतू - उद्देश लक्षात न घेतल्याने, त्याची पूर्तता टिक मार्क इतकीच दिसते...
आधीच म्हटलं, तसे यातून नवी दिशा, नवी स्वप्न बघते आहे..
शिक्षक असणे हे अर्थाजन साधन असेल तरी, त्यासोबत येणारी जबाबदारी - कर्तव्य विसरुन चालणार नाही...
ज्या उद्याच्या पिढीला सुशिक्षित बनवण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहोत, ती सक्षमही होईल, असे प्रयत्न हवे...
हे बदल मी माझ्या स्तरावर तर नक्कीच करु शकते, त्यासाठी पूर्णपणे तनमन अर्पण करुन प्रयत्न करण्याची इच्छा, जिद्द आहे...
त्यासाठी शुभेच्छा, आशीर्वाद आणि मिळेल त्यांची सोबत हवी आहे...
त्या प्रतीक्षेत...
गरज आहे, ती सर्वांच्या शुभेच्छा, सहविचार, मार्गदर्शन, सहकार्य जे जे मिळेल त्याची..
त्या साऱ्याचा प्रतिक्षेत...

So true.. very nicely articulated
ReplyDeleteThanks
Deleteयात बदल करता येतील तेंव्हा लेखन पूर्ण आणि उपयुक्त होईल