तासाची सुरुवात अतिशय छान, प्रसन्न, उत्साहपूर्ण, ताण विरहित व्हावी हा उद्देश..
वनस्थळी संस्थेचा बालभवन अभ्यासक्रम शिकताना, आम्हाला प्रत्येक पाठाची सुरुवात प्रार्थना म्हणून करायची हे बिंबवले होते..
का हे विचारायचे नाही, हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पिढीत वाढलेली मी आणि माझे सहकारी यांनी मनापासून ते ऐकले व त्याचे फायदेही अनुभवले..
पूर्व प्राथमिक, खेळगटाचे काम करताना, दहा वर्षे वेगवेगळ्या प्रार्थना, भक्तीगीते यांचा भरपूर वापर अभ्यासक्रमात करुन, त्यांचे शब्द, चाली, ताल, नाद, या साऱ्यांची सकारात्मकता पुरेपूर अनुभवली होती..
म्हणूनच नव्याने स्वीकारलेल्या प्राथमिक आणि त्यातही मराठी विषयात काम करताना, नित्य तासिकेची सुरुवात प्रार्थनेने करण्यावर भर राहिला..
माझी ही नवी सुरुवात कोरोना काळ वरदहस्त लाभला..
(जाणीवपूर्वक वरदहस्त या शब्दाचा वापर केला आहे, कारण या काळाने आपल्या सर्वांना निद्रीत अवस्थेतून जागे केले आहे, भविष्यात या दोन वर्षाच्या काळाला सुवर्ण इतिहास म्हणून अभ्यासले जाणार आहे, आणि आपण सारे त्याचे साक्षीदार आहोत)
त्याकाळात मुलांनी स्क्रीनकडे सतत बघू नये, काही मिनिटांची विश्रांती घ्यावी ही मुख्य भूमिका होती..
त्यासाठी कधी देवा तुझे किती, हीच अमुची प्रार्थना, तु बुद्धी दे या चलचित्र फितीचा वापर केला तर कधी दोन - चार ओळींचे श्लोक जसे आई माझा गुरु, वक्रतुंड, मनोजवं, चला शारदेला इ. म्हणणे,..
यामागे चित्रांमधून शब्दांचे अर्थ लक्षात यावे, तर दरवेळी अशी चित्रांची साथ हवीच असेही गरजेचे नाही, अशी विचारपूर्वक उद्दिष्टे टि.टी.सी, बी.एड. या अभ्यासक्रमाने बिंबवली आहेत..
मुलांनी प्रार्थनेचा नुसता स्वीकार केला असे नाही, तर मनापासून आनंद घेतला (या कालावधीमध्ये मुलांसोबत, असणारा पालक वर्ग हाही या प्रवासात उत्साहाने सहभागी असायचा, यात आईबाबा, आजी आजोबा तर कधी लहान मोठी भावंडे असायची)
शाळेच्या सामूहिक परिपाठासाठी अशाच काही श्लोकाच्या सार्थ चलचित्र फिती तयार झाल्या होत्या, त्या गटासोबत काम करण्याचा आनंद घेतला..
तास सुरु करण्यापूर्वी कदाचित प्रार्थना म्हणता येणार नाही असे एक जुने मराठी चित्रपट गीत, 'तू चाल पुढ तुला रे गड्या भीती कशाची' हे तर मुलांचे अतिशय प्रिय झाले होते, मुले हट्टाने ते लावायला सांगायची..
अनेकदा मुले त्यावर गाण्यामधल्या मुलाप्रमाणे नृत्यही करायची, यामुळे नकळत मराठी विषयाशी जोडली जायची,
त्यानंतर आमचा ठरलेला अभ्यास फारच म्हणजे मजेत आणि गमतीत चालायचा, ज्यामुळे नियोजित घटक मुलांना अधिक प्रभावीपणे समजायचा..
त्यात मला दुसरे उद्दिष्ट नकळत सापडले, ते म्हणजे प्रार्थना ऐकताना, म्हणताना, विद्यार्थी आधी सुरू असलेला विषय बाजूला ठेवून, नव्याने चालू होणाऱ्या विषयाशी स्वतःला जोडतात..
सकाळी साडेआठला शाळेत आलेली ही बच्चे कंपनी, साडेतीन पर्यंत शिक्षक म्हणतील, त्याप्रमाणे अतिशय सहज स्वतःला एका विषयातून दुसऱ्या विषयात नेत असतात, त्यात त्यांची इच्छा अनेकदा दुय्यमच असते..
म्हणूनच आजही माझ्या प्रत्येक तासिकेची सुरुवात प्रार्थनेने होते..
गेल्या वर्षी सलग दोन वर्षानंतर मुले शाळेत आली होती, तेंव्हाही हे सारे सुरु ठेवले फक्त त्यात विशेष भर घातली नाही..
२०२२-२३ शैक्षणिक वर्ष संपताना मराठी विभागाच्या आढावा बैठकीत, आपल्या शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी ताईंनी शिक्षकांनी मुलांचे आणि स्वतःचे उच्चार अधिक शास्त्रशुद्ध व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, असा विचार मांडला..
माझे स्वतःचे उच्चार ही कधीतरी चुकत असतील, नाकारणार नाही, पण जी किमान शुद्धता आहे, ती घरातील वातावरण, शालेय जीवनातील उत्तम श्रवण, वाचन याची देणगी आहे..
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत, मुलांना खूप कमी वेळ मराठी भाषा ऐकायला मिळते..
त्यात एकूणच कोणतीही भाषा शिकण्याच्या पद्धतीत अति तांत्रिकता सध्या दिसते, त्यामुळे भाषेची गोडी वाटण्याऐवजी भीतीच जास्त बसते..
भाषा ऐकायला मिळणे जिथे दुरापास्त, मग वाचन करावेसे वाटणार कुठून..?
पण ही सगळी झाली कारणे आणि ती पुढे करणे म्हणजे, मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा पळवाटा शोधण्यावर भर देणे..
इतिहास शिकताना, तानाजीचा धडा हा इतका रुजला, की लढायचं नसेल तर उड्या मारुन जीव द्या, पण पळून जाण्यासाठी परवानगी नाही, मग माझे मन पळवाट निवडणार कशी..?
मे महिन्यात काय बरे यावर करु या..?
हा प्रश्न सतत मनात घोळत होता आणि त्यावर वेगवेगळे राजा उपलब्ध संदर्भ बघताना लक्षात आले की सर्व भाषांची जननी संस्कृत भाषेला म्हणतात..
संस्कृत श्लोक गीतांचे श्रवण, पाठांतर यामुळे जीभेवर शुद्ध उच्चारांचे नकळत संस्करण होते..
मग यावर्षीच्या प्रार्थना आहेत काही संस्कृत लोकांचा सार्थ समावेश केला..
श्लोक नुसते म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेतला तर, ते म्हणताना अधिक ताकद येते म्हणून गोष्टी रूप अर्थ सांगण्यावर भर दिला..
उदाहरणादाखल
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
हा श्लोक म्हणताना, कृष्ण, देवकी, यशोदा, वसुदेव, नंद पासून ते कंस कोण यात शक्तिशाली कोण विचारी कोण असे अनेक संदर्भ मुलांना प्रश्न विचारत त्यांच्याकडे असलेली माहिती ऐकून घेत गोष्टी रुपात समजावून सांगितला, हे करताना काही संदर्भ आजचा अभ्यास पूर्ण झाल्यावरती गोष्टीतून ऐकूया असे सांगितले..
अर्थात त्यामुळे त्या दिवशीचा अभ्यासक्रम नियोजित वेळेपेक्षा लवकर आणि तरीही नीट लक्षात राहील असा झाला कदाचित कृष्णाचे आशीर्वाद लाभले असतील..
असे हे श्लोक, गोष्ट यात विद्यार्थ्यांसोबत होणारे, विचारांचे आदान-प्रदान हे अनेकदा मुलांना आपल्यापेक्षा अधिक माहिती आहे का?, असे नव्याने विचारही करायला लावतात..
आणि पुढच्या वेळी अधिक तयारीने वर्गात जावे लागेल याची जाणीव करून देतात..
यात तोच तोच पणा येऊन, प्रार्थनेचा कंटाळा निर्माण होऊ नये म्हणून जुलै महिन्यात एक उडत्या चालीचे भक्तीगीत ही समाविष्ट केले (जे बालभवनमध्ये काम करताना मुलांचे सर्वात आवडते होते)
ते घेताना फार विचार केला नव्हता, पण शिकविणे, म्हणणे या प्रक्रियेमध्ये अश्विनीताईंना उच्चाराविषयी वाटणाऱ्या तळमळीचे उत्तर सापडले..
ते गाणे होते,
कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून..
काय पाहिजे बाळा तुला देते मी आणून.. धृ
आई मला वाघ दे आणून,
त्याचा घोडा दे करून..१
आई मला साप दे आणून,
त्याचा चाबूक दे करून..२
आई मला चंद्र दे आणून,
त्याचा चेंडू दे करून..३
आई मला चांदण्या दे आणून,
त्याच्या लाह्या दे फोडून..४
असलं रे कसलं मागणं तुझं,
जगाच्या वेगळं..,
कृष्ण घालितो लोळण..
हे गाणे शिकवताना शब्दांचे उच्चार जाणीवपूर्वक सांगितले, चुकीचे म्हणण्याचे परिणाम ऐकविले..
सोबत गाण्याचे सार्थ स्पष्टीकरण की कृष्णाप्रमाणे सर्वांहूनी निराळ्या गोष्टींचा हट्ट, मागण्या करणारे व्हा असे सांगितले, ज्यामुळे मुलांना हे म्हणताना फारच मजा येते..
(कृष्णाची मोहिनीतून लहान वा थोर कुणीच सुटू शकत नाही, त्यामुळे पहिली, दुसरी, तिसरी सगळ्याच वर्गात शिकवले, अर्थ - गोष्ट यात थोडे कमीजास्त झाले)
या गाण्यात ल, न, ळ, ण इतक्या वेळेला आणि विविध जागी आला आहे, लोळण यात तर त्याचे कमालीचे सख्य आहे, अशा शब्द रचनांना इंग्रजीत टंग ट्विस्टर म्हणतात..
असे शब्द, वाक्य, गाणी जर सतत म्हणली गेली तर उच्चार आपोआप शुद्ध व प्रमाण भाषानुरुप होत जातात, हे लक्षात आले..
आता सध्या अशी प्रार्थना, श्लोक, गाणी शोधण्याची धडपड सुरु आहे..
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादाने त्यास नक्कीच यश येईल, ही खात्री..
अशी माझ्या या प्रार्थना प्रयोगाची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफळ संपूर्ण..
पुरुषोत्तम मास, प्रथम पुष्प मनःपूर्वक अर्पण..
तुम्हा सर्वांचे संबंधित अनुभव ऐकायला, समजून घ्यायला आणि त्याची माझ्या दिनक्रमात भर घालायला नक्की आवडेल..
त्यासाठी प्रतिसाद, प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome