समाप्ती की नवी सुरुवात..?
पुरुषोत्तम मास, मराठी कालगणनेत दर तीन वर्षानंतर येणारा, हा अधिक महिना..
या काळात स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी, ठरवून काही नियम केले जातात..
असे नियम करून पूर्ण महिना त्यावर अंमलबजावणी करणे, वाटते तितके सोपे नसते..
कारण त्या गोष्टी आपल्या दैनंदिन सवयीच्या नसतात, त्यामुळे अनेकदा या कृती करताना अडचणी येतात..
पण जेव्हा त्यावर मात करुन, तो नियम पूर्ण महिनाभर पाळता येतो, त्यावेळी विशेष आनंद होतो..
या वर्षी हा अनुभव घेण्याचे ठरवले होते..
त्यानुसार एक जाहीरपणे सांगून व दुसरा जमल्यास करु, असे दोन नियम केले होते..
त्यापैकी पहिला म्हणजे नियमित काहीतरी लेखन करणे..
सांगायला विशेष आनंद होतो, की २९ दिवस हे लेखन प्रयत्नपूर्वक केले..
लेखनाचा मुख्य विषय, माझ्या दैनंदिन अध्ययन अध्यापन कामात घेतलेले अनुभव आणि माझे विविध शैक्षणिक प्रयोग असा होता..
माझे लेखन नियमित वाचणाऱ्या अनेकांना वाटेल की, यातले बरेचसे लेखन जुनेच होते, जे अगदीच योग्य आहे..
पण तरी ते पुन्हा पाठवताना, त्याचे पुनर्वाचन, पुनर्मांडणी, नव्याने काही गोष्टींची भर इ. संस्करण जाणीवपूर्वक केले..
काही विषय वेळ नाही, असे कारण पुढे केल्यामुळे, लिहायचे राहिले होते ते या निमित्ताने लिहून झाले..
एकूणच महिनाभर या अनुभवाने भरपूर समृद्ध केले..
आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करतो, तेव्हा ती निश्चित यशस्वी होते हा अनुभव खूप काही शिकवून गेला..
म्हणूनच कदाचित असे म्हणतात की, एखादी गोष्ट करायचे ठरवणे, म्हणजे अर्धे काम पूर्ण होण्यासारखे आहे..
यापुढे रोज लेखन चालू ठेवायचे ठरवले, तर ते जमेल असे नक्कीच वाटते..
या सोबतच दुसरी गोष्ट ठरवली होती ती म्हणजे रोज साडी नेसणे..
ही गोष्ट तर अजिबात सोपी नव्हती, कारण एकतर मला ते आवडत नाही, अतिशय बंधल्यासारखे होते..
शिवाय इतक्या साड्या माझ्याकडे नाही..
अजून भर की, सकाळी आठ आधी शाळेत असायला हवे, वेळ गाठताना सकाळी सकाळी साडी नेसणे, त्यावर साजेसा, शाळेत शिक्षिका म्हणून योग्य दिसेल असा शृंगार करणे.. (टिकली पासून ते गळ्यात, कानात, हातात छोटेसे, रंगसंगती हा एक मोठा कार्यक्रम असायचा)
दिवसभर साडीमध्ये अध्यापन करणे, माझ्या बाल मित्रांबरोबर नाचणे गाणे म्हणणे हे सारेच अवघडच विषय होते..
पण कर्मधर्म संयोगाने साऱ्या गोष्टी जुळून आल्या आणि ठरवलेले दोन्ही नियम पूर्णत्वास गेले..
आता या दोन्ही मधून काय साधले..?
हे सांगण्यापेक्षा अनुभवणे जास्त परिणामकारक आणि आनंददायी होते..
आज अधिकमास संपताना एक निश्चित सांगू इच्छिते की, आपण स्वतः एखादी गोष्ट ठरवल्यास, ती पूर्ण करणे अजिबात अशक्य नाही..
ते काय म्हणतात ना की, जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवतो, तेव्हा ती पूर्ण करण्यास चराचरातील सर्व शक्ती आपल्याला मदत करतात..
आणि या साऱ्याचा समारोप करताना दोन ओळी आठवतात..
'नियम पाळावे, जरी म्हणशील, योगी व्हावे..'
योगी होणे ही तर खूप मोठी तपश्चर्य आहे..
पण आपल्यात चांगले बदल करायचे असले तर, त्यासाठी काही नियम करावे लागतात..
असे नियम यशस्वी केल्यास, नकळत त्याचे सवयीत रुपांतर होते..
आणि आपला प्रवास हळूहळू उत्तम, गुणाग्रही होण्याकडे होत जातो..
हा अनुभव जसा मी घेतला तसाच आपणही घ्यावा, याच शुभेच्छा..!
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome