Sunday, October 15, 2023

शांतता

अनुभव ते अनुभूती

मुलांसाठीच्या उपक्रमात आम्ही शिक्षक नव्याने काही ना काही शिकत असतो, स्वतःला घडवत असतो, शोधत असतो.. 


यातून दैनंदिन कामात थोडी विश्रांती, थोडा बदल तर मिळतो, पण त्याचबरोबर आपल्या कामाकडे मागे फिरुन बघण्याची संधी मिळते..


असाच काहीसा अनुभव आय ऑफ सी (Initiative of Change) पाचगणी यांच्या एका प्रशिक्षणात मिळाला..

गुरुवार १२ शुक्रवार १३ ऑक्टोंबर २०२३ हे दोन दिवस हे प्रशिक्षण होते..

शाळेतील सहशिक्षिका आदिती, सायली तसेच पाषाण येथील स्वधा शाळेचे प्रिया, संदीप हे दोन शिक्षक यांच्यासोबत काराने नियोजित वेळेत पाचगणी येथे पोहचलो..

सहभागी इतर शिक्षक येण्यास वेळ असल्यामुळे आम्ही परिसरात फिरलो..

आपण तारे जमींन पर या चित्रपटात जशी बोर्डिंग शाळा बघितली होती, तसाच काहीसा हा सारा परिसर होता..

त्यानंतर आम्ही आमच्या निवासाची व्यवस्था समजून घेतली, तिथे आमचे सामान नेऊन ठेवले, तोवर इतर सदस्य आले..

प्रशिक्षणाची सुरुवात ऑस्ट्रेलिया नावाच्या सभागृहात आय ऑफ सी संस्थेची माहिती चल चित्रफीत बघून घेतली..

या संस्थेची स्थापना १९६७ झाली, ज्यावेळी हा परिसर संपूर्ण ओसाड होता, जिथे फक्त एक ओक वृक्ष होता, हे ऐकून आश्चर्य वाटले..

अवघ्या पंचावन्न वर्षात ओसाड माळरानावर गर्द झाडी काही पट्टे, घनदाट अरण्ये वाटतील असे तयार करण्यात, नुसते काम नाही तर तितकाच प्रेरक विचार असणार हे जाणवले..


माणसा माणसामध्ये वाढत जाणारी असूया, द्वेष, तंटा, स्पर्धा, क्रोध, अहंकार, लोभ असे एक ना अनेक विकार दूर व्हायला हवे..

एकमेकांविषयी सहृदयता निर्माण व्हायला हवी, तरच शांतता नांदेल या उद्देशाने या संस्थेचे काम फक्त पाचगणी वा भारत नाही तर विविध देशांमध्ये चालू आहे..

अपेक्षित बदल घडण्यासाठी विविध स्तरातील लोकांसाठी विविध उपक्रम येथे चालतात..

त्यासाठी संस्थेचे वेगवेगळे विभाग आहेत, ज्यात प्रत्यक्ष कृतीयुक्त तर काही प्रबोधनपर काम चालते..

याद्वारे मंत्री, सरकारी ऑफिसर, कर्मचारी, स्वायत्त संस्था सदस्य अशा सर्वांसाठी शिबीर, सत्रे चालू असतात..

आम्ही अनुभवलेले प्रशिक्षण हे मुख्यत्वे शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांमधील गैरसमज, वैचारिक तफावत दूर करण्यासाठीच्या उपक्रमाची सुरुवात होती..

यात सदर उपक्रमासाठी शाळेत परत गेल्यावर मुलांकडून काय तयारी करुन घ्यायची याबद्दल काहीही नव्हते..

तर संस्थेचा मूळ हेतू समाजात शांतता, स्वस्थता यायला हवी यासाठी काय करता, कसे करता येईल आणि त्याची मुळात गरज काय हेच प्रत्येक सत्रातून मांडले..

प्रश्न, समस्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा अगदी राजकीय कोणत्याही असल्या तरी त्याचे निर्मूलन, निराकरण करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला हवी हेच पुन्हा पुन्हा मांडून बिंबवले गेले, जे अगदी योग्य आणि पटण्यासारखे होते..

दोन दिवसाच्या या प्रशिक्षणात सुमारे बारा ते पंधरा सत्रे झाली, परंतु कोणत्याही सत्रात नुसती व्याख्यान पद्धती नव्हती..

नवीन प्रकारानुसार पीपीटी दाखवा, समजावून द्या असेही नव्हते..

इतकेच नाहीतर कोणत्याही सत्राची पद्धत एकसारखी नव्हती आणि सत्र घेणारे सुद्धा एक नव्हते..

सर्व प्रशिक्षक हे उच्च शिक्षित, स्थानिक (पाचगणीच्या आसपास रहाणारे) आणि मराठी भाषिक होते, शिवाय त्यांना हिंदी, इंग्रजी येत असले तरी गरजेनुसार त्याचा वापर होता..

संस्थेचे क्रेंद कितीही अद्यावत असले, त्याचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असले तरीही कुठेच अनावश्यक इंग्रजी समावेश नव्हता..

स्थानिक भाषांचा अभिमान, आदर, वापर, उपयोगिता याचे उत्तम उदाहरण  यानिमित्ताने बघायला मिळाले..

यात सहभागी होणाऱ्या शहरी शाळा मुख्यत्त्वे इंग्रजी माध्यमाच्या असणार, ज्यांच्यावर नकळत जास्तीत जास्त इंग्रजी बोला, लिहा असेच बिंबवले जाते, या उपक्रमातून स्थानिक भाषांची गरज आणि मजा मुलांना नक्कीच अनुभवायला मिळेल..

आधी सांगितल्यानुसार बहुतांश सत्रे ही समस्या निराकरण याची सुरुवात स्वतः करायला हवी हे सांगणारी होती..

पहिल्या सत्रात प्रशिक्षणाला आलेल्या सर्वांची ओळख ही नाव, शाळेचे नाव व आपण शिकलो त्या शाळेची एक आठवण सांगून झाली..

प्रत्येकाचे ऐकताना लहानपण, शाळा याविषयी सर्वांच्या आठवणी चांगल्याच असतात असे नाही हे समजले, कदाचित यातून आपल्या घडणीत शाळा, शिक्षक किती महत्त्वाचे असतात हे यातून सुचवायचे असेल..

पुढचे सत्र इमारतीच्या बाहेरील मोकळ्या व्हरांड्यात, निसर्गरम्य वातावरण व जोडी पद्धतीने झाले..

साधारण आठ जोड्या झाल्या, त्यात चार प्रश्न होते, प्रत्येक प्रश्न वेगळ्या खुर्चीवर असल्याने बैठक व्यवस्था साधारण पाच मिनिटांनी बदलली जात होती, चारी प्रश्न झाल्यावर एकत्रित चर्चा झाली..


सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे केंद्रस्थान विश्वास (ट्रस्ट) होता, तो आपला इतरांवर, इतरांचा आपल्यावर, परिस्थितीवर असे मुद्दे मांडले गेले, ज्यामुळे काहीही झाले तरी आपण सकारात्मक कसे राहू शकतो याची प्रेरणा मिळाली..

मग आम्ही एक कोल्हा दुष्ट का असतो अशी गोष्ट बघितली याचा सारांश गैरसमज कसे पसरतात, त्यामुळे असंतोष, द्वेष कसे निर्माण होतात हा होता, ज्याद्वारे कोणी सांगितले म्हणून परंपरा आहे म्हणून कशावरही विश्वास न ठेवता अनुभव घेऊन मत व्यक्त करावे हे लक्षात आले..

त्यानंतर पाच जणांच्या गटात एकमेकांच्या पाठीला फळा समजून  अपेक्षित चित्र काढण्याचे सत्र होते, यात दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्यासाठी किती प्रकारे आपल्याला सजग राहावे लागते हे लक्षात आले..

प्रत्येक सत्राची वेगळी मांडणी, जागा बदल, अतिशय रुचकर भोजन यामुळे कुठेही थकवा, कंटाळा जाणवला नाही..

एका सत्रात सर्वांना एका सरळ आडव्या ओळीत उभे केले, मग काही प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर हो असल्यास एक पाऊल पुढे यायचे, नाही असेल तर आहे त्याच जागी उभे रहायचे..

प्रश्न हे आपल्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा, येणाऱ्या अडचणी यावर होते, ज्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर होते..

त्यावर चर्चा करताना कोण, कधी पुढे गेला, कोण मागे राहिला यावर मनात काय विचार आले, स्वतः बद्दल काय वाटले या आधारे झाली, ज्यातून स्वीकार फक्त स्वतःविषयी पुरेसा नसून इतरांबद्दल, परिस्थितीचा पण असायला हवा हे लक्षात आले..

पंचावन्न वर्षात ओसाड ते निसर्गरम्य परिसर कसा तयार झाला, हे समजून घेण्यासाठी आम्ही चालत सर्वत्र फिरलो, तेथील वास्तू, अगदी १९६७ पासूनच प्रत्येक इमारतीत केले जाणारे पर्जन्य जल संवर्धन, त्याचबरोबर सांडपाण्याचा सुयोग्य पुनर्वापर, या पूर्ण प्रवासाची साक्ष असणारा ओक वृक्ष, सर्व सदस्य, कामाची पद्धत या साऱ्याची माहिती घेतली..

निसर्ग नियमानुसार भोजन आनंद सात वाजता घेतला, त्यानंतर वॉशअप म्हणजेच भांडी घासणे, टेबल पुसणे या कामात मदत करण्याचा स्वेच्छेने आनंद घेतला, हेही एक सत्र होते..

ज्यातून कोणतेही काम विशिष्ट लोकांनीच करावे असा गैरसमज तयार न होण्यासाठी मदत होते, प्रत्येक कामाची ओळख, जाणीव व आनंद अनुभवता येतो..

 

प्रथम दिवसाचे सत्र फारच वेगळे व छान होते, ज्यात सोयीसाठी पुन्हा पाच जणांचा गट केला..

प्रत्येकाला एक कार्ड दिले, ज्यात एक विचार व त्याला अनुसरून एक विषय होता त्या विषयाला अधिक स्पष्ट करणारे तीन प्रश्न होते..

प्रत्येकाने आपला विचार वाचून दाखवायचा त्या संघाने येणारा विषय सांगायचा व कोणत्याही एका प्रश्नावर आपले अनुभव सांगायचे..

तेच कार्ड तोच विचार विषय व प्रश्न यावर प्रत्येकाने बोलायचे अशी एक वेडी झाल्यावर दुसऱ्या कार्डची सुरुवात करायची..

यामध्ये माझ्यातील कमजोरी, जमेच्या बाजू, आदर्श, अडचणी, विनोदी प्रसंग असे अनेक विषय होते..

साधारण दीड तास चाललेल्या या सत्रात प्रत्येकाच्या कार्डमधील एकच प्रश्न व त्यावरील मांडणी ऐकून झाली..

पाच जणांच्या गटातही प्रत्येकाचे ऐकताना असे वाटले की, आपण आपल्या आत किती गोष्टी साठवून ठेवत असतो..

ज्या अनेकदा आपल्याला आतून त्रस्त करुन, नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत होतात..

 

दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी सात वाजता निसर्ग रम्य परिसरात, कोणाशीही न बोलता, मोबाईल हातात न घेता, शांतपणे फेरफटका मारा..

परिसरातील वास्तूशी, झाडांशी बोला, त्यांचे स्पर्श अनुभवा व त्यातून जे सुचेल ते नोंदवून ठेवा अशा वेगळ्याच सत्राने झाली..

पंधरा मिनिटानंतर प्रत्येकाने आपला अनुभव थोडक्यात सांगितला, त्यावर संवाद झाला..

शिक्षण म्हणजे फक्त नियोजित पाठ्यपुस्तक इतके मर्यादित नसून, स्वतःहून स्वतःला निरीक्षण, स्पर्श, अनुभव यातून शिकता येते, याचे हे उत्तम उदाहरण होते..

यानंतर ग्रामीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ग्रामपरी विभागास भेट देऊन तेथील काम समजून घेतले..

मुलांची सत्रे व व्यवस्था याच ठिकाणी होणार आहेत, त्याबद्दल माहिती घेतली..

त्याच्या सुरुवातीला एक गमतीशीर खेळ खेळलो, ज्यात एकमेकांना अभिवादन म्हणजेच नमस्कार करायचा व लगेच आळस द्यायचा..

हे दहा वेळा हा विविध पद्धतीने करायचे होते..

नमस्कार करण्याच्या दहा पद्धती सुचल्या, पण आळस देण्याच्या दहा पद्धती आठवणे हे काहीसे अवघड गेले..

प्रशिक्षकांनी त्याविषयी मांडताना सांगितले की, नमस्कार यांच्या पद्धतीत जास्त करुन जाती धर्म डोकावला किंवा जुने नवे याचा प्रभाव दिसला..

पण कोणालाही ग्रामीण, आदिवासी पद्धतीची आठवण झाली नाही याचाच अर्थ आपल्याला एकमेकांविषयी विशेष ज्ञान नाही..

दुसरे म्हणजे प्रत्येकाला अभिवादन करुन पुढे जाण्याच्या गोंधळात, कोणीही समोरच्याला प्रतिसाद देत नव्हते, असेच काहीसे दैनंदिन कामात होते आपण स्वतःमध्येच इतके मग्न असतो की, इतरांना काही सांगायचे आहे त्याचा विसर पडतो, यातूनच गैरसमज पसरतात..

आळस विविध पद्धतीने न सुचणे या विषयी मला असे वाटले की, कंटाळा येण्यासाठी आपण तीच तीच कारणे देतो..

कंटाळा येणे सहज आहे, पण त्यासाठी कारणे तरी नवीन हवी..

मग एका सत्रात भूतकाळातील प्रत्येक गोष्टीतले काही ना काही आपण मनात साठवून नव्हे तर साचवून ठेवलेले असते, ज्याचा परिणाम वर्तमान व भविष्यावर होत असतो..

हे ग्लासमध्ये पाण्या व्यातिरिक्त अनेक गोष्टी असल्यामुळे फूल कोमेजते, या रूपकात्मक उदाहरणाने मांडले..

इतरांनी बदलावे म्हणजे परिस्थिती बदलेल, यापेक्षा मी परिस्थिती नुसार बदललो तर अधिक सहज, सोपे आहे याचा अनुभव या दोन दिवसात हसत खेळत मिळवला..

उपक्रमाच्या यानंतरच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांसोबत अजून नवी सत्रे, नवे अनुभव मिळतील..

पण या दोन दिवसांनी नवीन विचार नवे दृष्टिकोन मिळाले..

या संस्थेतर्फे असे प्रशिक्षण वैयक्तिक  कुटुंबांसाठी ही घेतले जाते, त्यांच्या वेबसाइटवर त्याची माहिती मिळेल, त्याचा जरुर लाभ घ्यावा..

या दोन दिवसात प्रत्येक सत्रात असणारी, एक मुख्य गोष्ट मुद्दाम राखून ठेवली होती..

ती म्हणजे शांतता वेळ, प्रत्येक सत्रात कधी सुरुवातीला, कधी मध्यंतरात तर कधी समारोप पाच मिनिटांचा शांतता वेळ असायचा..

ज्यात आपण स्वतः चालू विषयाचा पुन्हा एकदा अनेक प्रकारे विचार करावा.. 

काय राहिले, काय बदलायला हवे, काय नव्याने करायला हवे याचा मागोवा घ्यावा व तसे करण्याचे ठरवावे असे सुचवले जायचे..

प्रत्येक प्रशिक्षकांनी सांगितले की, मी आधी वेगळा होतो, त्रस्त होतो, निराश होतो पण या शांतता वेळेने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवून दिली..

प्रत्येक सत्रातील शांतता वेळाने, नवीन विचार करायला संधी दिली, प्रश्न समस्या याकडे उत्तरे शोधण्यासाठी बघायला हवे हा विचार दिला..

त्यापलीकडे जाऊन शांततेचा आनंद मिळावा, शांतता ही पूर्णपणे शांत म्हणजेच शून्यावस्था असावी, असा अनुभव एकदाही आला नाही..

याचा अर्थ अजूनही अनेक अनावश्यक गोष्टी मनात खोलवर साचून राहिल्या आहेत हे जाणवले..

ज्याचा निचरा होण्यासाठी रोज जमले तर उत्तमच, पण  आठवड्यातून किमान एकदा असा शांतता वेळेचा अनुभव घ्यायचा हे या निमित्याने ठरवले आहे, इतके सांगून आतासाठी विश्रांती घेते..




3 comments:

  1. वा! एकदम हटके, अफाट अनुभव, प्रशिक्षण आणि मंथन!!! साध्या सरळ भाषेत सोप्या पद्धतीने आमच्या पर्यंत छान पोचवलं. इथे इतरांना सहज भेटीला जाता येते का?

    ReplyDelete
  2. हो खरचं छान अनुभव होता..

    ReplyDelete

suggestions most wlcome